Born at Omerga, Learnt at Latur, Living in Aurangabad.
Last active 3 hours ago
Don't wanna be here? Send us removal request.
Text
हमीद...
१९६९-७० साल असावे. बैठकीत एक किडकिडीत मुलगा रोज आलेला दिसायचा. डोक्यावर गांधी टोपी, विजार अन सदरा घातलेला तो मुलगा ओसरीवर उखळाशेजारी बसून जेवण करायचा. आई ताट वाढून त्याच्या समोर ठेवायची. दोन पायावर उकड बसून खाली मान घालून शांतपणे झटपट जेवण उरकायचा. मांडी घालून बसलेलं त्याला आम्ही कधी पाहिले नाही. जेवण झाले की ताट अंगणात मोरीवर धुऊन उखळाशेजारी खांबाला टेकवून ठेवायचा अन झर्रकन बैठकीत निघून जायचा. काहीच बोलायचा नाही. बैठकीत आम्ही जायचो तेव्हा तो कपाटातल्या फाईली काढून काहीतरी खरडत बसलेला दिसायचा. रात्री बैठकीतच झोपायचा.
तो कोण होता हे कळायचे आमचे वय नव्हते पण लवकरच तो आम्हाला आवडू लागला. कारण हात धरून तो आम्हाला बाजारात घेऊन जायचा. दोन पैशाची लिमलेटची गोळी घेऊन द्यायचा. आम्ही त्याच्यावर प्रचंड खुश होतो. त्याच्याशी बोलायला आम्हाला आवडू लागले. सर्वांचे ऐकून आम्हीही त्याला हमीद या नावाने हाक मारू लागलो. तोही आता बराच खुलला होता. पण फक्त आमच्यापुढेच. दादा, आई आणि तात्यांसमोर तो खाली मान घालूनच उभा असायचा. तोंडातून शब्द फुटायचा नाही. संध्याकाळी बैठकीत आम्ही त्याला बोलत बसायचो. बैठकीच्या खिडकीत तो आम्हाला उचलून बसवायचा अन गमती जमती सांगायचा.
हमीद आमच्या घरी आला तेव्हा पंधरा वर्षाचा होता. आमच्या घरीच रहायचा. सांगेल ती कामे करायचा. बैठक साफ करणे, फाईली तयार करणे, कोर्टाची डायरी लिहिणे, पक्षकारांना तारखा देणे, सकाळी बैठकीतले काम आटोपले की फायलींचा गठ्ठा घेऊन कोर्टात जाणे हे त्याचे नित्याचे काम. हे काम करणार्याला मोहरीर म्हणतात असे मोठेपणी समजले. याव्यतिरिक्त आईने सांगितलेले सामान बाजारातून आणून देणे, कधी बबर्या आला नसेल तर जनावरांना चारा टाकणे, पाणी भरणे, ओसरी झाडून देणे, रासणीला शेतात जाणे ही कामेही तो आनंदाने करायचा. सणासुदीला बुंदीचे लाडू खायला त्याला फार आवडायचे. हक्काने म्हणायचा ‘पोली नको, और लाडू वाडो’.
वाड्यासमोर असलेली ओमीताईंची बालवाडी संपून मी आणि बाळूने भारत विद्यालयात प्रवेश घेतला. आमच्या प्रवेशाचे काम हमीदनेच केले. त्यावेळी माझी जन्म तारीख गुरूजींनी विचारली. मी तोंडातल्या तोंडात एकोणीस जानेवारी सांगितली. लगेच हमीद गुरूजींना म्हणाला ‘उन्नीस बिन्नीस कुछ नही जी, छब्बीस जनवरी लिखो. अपना प्रजासत्ताक दिन है इतना अच्छा.’ गुरूजींनीही त्याचे ऐकले अन माझा नवीन वाढदिवस साजरा केला. नशीब वर्ष बदलले नाही. बाळूची मात्र तारीख बरोबर ठेवली पण वर्ष ��ाझेच टाकले. हमीद कृपेने आम्हा दोघा भावांच्या वयाचे अंतर फक्त तीन महिनेच राहिले!
आम्हाला शाळेत सोडवायलाही सुरूवातीला हमीद यायचा. उमरगा त्यावेळी लहान गाव होते. पण शाळा हायवेच्या पलिकडे असल्यामुळे आई हमीदला पाठवायची. पुढे काही दिवसातच आम्ही आमचे जायला लागलो.
आम्ही कधी कधी त्याच्यासोबत शेताला जायचो. झाडाखाली बसून तो मुकेशची गाणी म्हणायचा. ‘आ लौट के आजा मेरे मीत...’ हे त्याच्या आवडीचे गाणे. खूपदा तो तेच गाणे ऐकवायचा. त्याकाळी रेडीओ ऐकणे अन राजश्री थिएटरमध्ये सिनेमा पाहणे हीच करमणुकीची साधने होती. त्यात हमीदच्या गाण्याची भर पडली.
दिवाळी आली की आम्ही हमीद बरोबर जनता किराणा भांडारमध्ये जायचो. दोन पोते भरून सामान आणले जायचे. सामान लिस्टप्रमाणे तपासणे, बील चेक करणे आणि ते पोते घरी पोहोचवणे ही कामे हमीद करायचा. त्याकाळी आजच्यासारखे कोणतेही सामान कधीही मिळत नसे. दिवाळीतच सुवासिक तेल, उटणे, मोती साबण, विशिष्ट आगरबत्त्या, धुपबत्त्या मिळायच्या. दुकानात हे साहित्य पहायलाच आम्हाला मजा यायची. सामान आणणे झाले की आमचा तगादा सुरू व्हायचा फटाक्यासाठी. हमीदच आम्हाला भारत विद्यालयाच्या ग्राऊंडवर असलेल्या दळगडेच्या एकमेव स्टॉलवर घेऊन जायचा. काय काय घ्यायचे हे तोच ठरवायचा. त्याप्रमाणे सर्व फटाके घेऊन उड्या मारतच आम्ही घरी यायचो. घरी आल्याबरोबर प्रवीण, मी व बाळूचे वाटे व्हायचे. मग धुमधडाका!
दिवाळीचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे नवीन कपडे. ही जवाबदारीही हमीदचीच असायची. तो आम्हाला घेऊन अनिल ड्रेसेसमध्ये जायचा. त्याकाळी आतासारखी भरपूर व्हरायटी नसायची. सणासुदीला फक्त नवीन स्टॉक यायचा त्यातून आम्ही कपडे निवडायचो. त्यातही ‘ये तुमको अच्छा दिखताय जी’ म्हणत हमीद त्याच्या मनाचे घ्यायला लावायचा. नव्या कपड्याचा गठ्ठा घेऊन तो घरी येईपर्यंत आम्ही नाचतच घरी पोहोचायचो.
शेतात डवारा असला की हमीद आणि आम्ही शेतात झोपायला जायचो. रासणीच्या आदल्या दिवशी शेतातच अन्न शिजवले जायचे. गडी माणसे, आजुबाजूचे शेतकरी आणि आम्ही एकत्र जेवायचो. आई शिधा बांधून द्यायची. गार वार्यात बसून गड्यांनी बनवलेली भाकरी अन पिठलं खायला खूप मजा यायची. त्यात हमीदच्या गाण्याची आणि विनोदी किस्से सांगायची भर असायची.
हळूहळू हमीद घरचा महत्वाचा व्यक्ती झाला होता. आजारपण असो, दवाखाने असो, बाजार असो, पेरणी रासणी असो, लग्न कार्य असो, सणवार असो, त्याच्याशिवाय पान हलायचे नाही. सो��ापूरहुन दादांनी गॅस कनेक्शन घेतले होते. तिथूनच सिलेंडर भरून आणावे लागायचे. हे कामही हमीदच करायचा. क���ी कधी आम्ही त्याच्यासोबत सोलापूरला जायचो ते केवळ ऑटोरिक्षात बसायला मिळावे म्हणून!
आमच्याकडे निळ्या रंगाची हिल्मन कार होती. हमीद अर्धा मेकॅनिकच झाला होता. गाडीला हँडल मारणे, रेडिएटरमध्ये पाणी घालणे, कधी रस्त्यात पेट्रोल संपले तर एखाद्या ट्रकमध्ये जाऊन कॅनमध्ये पेट्रोल भरून आणणे अशा कामासाठी दूरच्या प्रवासात हमीदला सोबत घेतल्याशिवाय जमायचेच नाही.
हमीदचे लग्न गुलबर्ग्याला झाले तेव्हा प्रवीण त्या लग्नासाठी गेला होता. मोठा भाऊ दिलीप तिथेच इंजिनिअरिंगला होता. ते दोघे मिळून लग्नाला उपस्थित होते. लग्न झाल्यावर त्याने एक खोली भाड्याने घेऊन स्वतंत्र संसार सुरू केला. तोपर्यंत आमच्या घरीच रहायचा. दर ईदला आम्ही त्याच्या घरी जायचो. तिथेच आम्ही पहिल्यांदा शिरखुरमाचा आस्वाद घेतला. तसा शिरखुरमा परत कधी प्यायला मिळाला नाही.
आमच्या सर्वांचे बालपण, शैक्षणिक प्रवास अन लग्न हे सर्व हमीदच्या साक्षीने झाले. पुढे आम्हा सर्वांची मुलेही त्याच्या अंगाखांद्यावर खेळली. आमच्या सहवासात राहून त्याला आमची आवड निवड समजली होती. लग्नासाठी आलेल्या स्थळासोबत नाते जमेल की नाही हे ती आलेली पाहुणे मंडळी पाहुनच तो ओळखायचा. माझ्यावेळेस मुलगी आणि तिचे आईवडील पाहुनच तो म्हणाला ‘यहां पे जमताय देखो, तुम लिख के लो’. अन खरेच जमले!
असा हा हमीद. दादानंतर प्रवीणसोबतही मोहरीर म्हणून काम करत होता. कोर्टाचे काम करत करतच त्याने आपला प्रपंच सांभाळला. अंगात सदैव एकच ड्रेस. चप्पल कधी असायची कधी नाही. स्वत:वर खर्च न करता त्याने मुलांना वाढवले. खूप कष्ट केले. अन एक दिवस अचानक वयाच्या साठाव्या वर्षी हार्ट अॅटॅकने जग सोडून निघून गेला! आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटले. जवळपास पंचेचाळीस वर्ष अगदी प्रामाणिक सेवा देणारा अन सर्वांशी जीव लावणारा हमीद, अनेक आठवणी मागे ठेऊन काळाच्या पडद्याआड निघून गेला...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
5 notes
·
View notes
Text
घुमते रह जाओगे....
पूर्वीच्या काळी प्रवास म्हणलं की एक वेगळीच उत्सुकता असायची. बस, ट्रेन मिळेल की नाही, जागा मिळेल की नाही, प्यायला खायला मिळेल का नाही अशा अनेक समस्या असायच्या. जेवायचे ताट वाटी, शिधा, पाण्यासाठी पितळेचा फिरकीचा लोटा हे सर्व साहित्य सोबत ठेवावे लागायचे. जेवायखायच्या तक्रारी नसायच्या. जिथे जे मिळेल ते खायचे, जे पाणी मिळेल ते प्यायचे. पूर्वी स्वत:ची गाडी फार क्वचित कुणाकडे तरी असायची. सायकल असणे ही सुद्धा मोठी बाब. मोटरसायकल, स्कुटर दुर्मिळ होत्या. त्या काळी पायी किंवा बैलगाडीत जास्तकरून प्रवास करावे लागायचे. बसेस सुद्धा डायरेक्ट नव्हत्या. बदलून बदलून आपल्याला पाहिजे त्या स्थानाला जावे लागायचे.
आज मात्र सर्व सोयी झाल्या आहेत. ज्या प्रवासासाठी आठ पंधरा दिवस लागत होते, ते आता दोन तीन दिवसांवर आले आहे. जाणे येणे, खाणे पिणे, राहणे याच्या उत्तम सोयी झाल्या आहेत. रस्ते चांगले झाले आहेत. नवीन पिढीला याच सुखसोयीची सवय आहे. त्यांना पूर्वीच्या काळातल्या गैरसोयीबद्दल सांगितले की आश्चर्य वाटते.
१९६०-७० मध्ये जन्म घेतलेल्या जवळपास सर्वांना गैरसोयीतील प्रवासाच्या तसेच अत्याधुनिक सोयीसुविधातल्या प्रवासाचासुद्धा अनुभव आहे. टेलिफोन ते स्मार्टफोन हा बदलसुद्धा त्यांनी पचवला आहे. तरी जुन्या काळातील आठवणी अजूनही त्यांच्या मनातून जात नाहीत.
अगदी लहानपणी आम्ही सायकल चालवायला शिकलो. सायकलवर उमरग्याच्या जवळपास असणार्या अनेक गावांना गेलो होतो. तुरोरी, मुळज, जकेकुर, अमृतकुंड अशा गावी मित्रांसोबत जातांना खूप मजा केली. १९८५ साली लातूर ते तुळजापूर १६० कि.मी. जाणेयेणे सायकलस्वारी आम्ही चार मित्रांनी केली. खूप मजा आली होती. हे अनुभव विसरता येणे शक्य नाही.
बैलगाडी तर हक्काचे वहान! येळअमावस्या, रासणी, पेरणी अथवा एरवीसुद्धा ��ेतात जाण्यासाठी बैलगाडी ठरलेलीच. गच्च भरलेल्या कडब्याच्या पेंड्यावर बसून अथवा धान्याच्या पोत्यांवर बसून अंबारीत बसल्यासारख्या भाव चेहर्यावर असायचा. रेड्याच्या खटा��्याचा तसेच घोडागाडीचाही अनुभव घेतला.
पाच दहा किलोमिटर पायी चालणे काहीच वाटायचे नाही. पर्याय सुद्धा नव्हता. आता अनेक पर्याय उपलब्ध असूनही त्यावेळच्या आठवणी ताज्या करण्याचा मोह होतो. २००३-४ साली आम्ही काही मित्र औरंगाबाद ते खुलताबाद पायी गेलो होतो. निमित्त होते हनुमान जयंतीचे. रात्री साडेनऊला निघून पहाटे सहा वाजता हनुमान जन्माच्या वेळेस भद्रा मारुती मंदिरात पोहोचलो. रस्त्याने हजारो भाविक सोबत होते. अनेक लोकांनी भाविकांसाठी खाण्यापिण्याचे मोफत स्टॉल्स लावले होते. सर्वांना ते आग्रह करत होते. हे पहात पहिल्या तासभराचा प्रवास काहीच वाटला नाही. पण खरी मजा दौलताबाद घाटापासून सुरू झाली. पायच ओढेना! कसेबसे घाट चढून गेलो. पुढे एखादा स्पीड ब्रेकर जरी लागला तरी पीडब्लूडीला शिव्या घालायचो. मंदिरात पोहोचल्यावर रांगेत शेवटी शेवटी तर बसूनच सरकत होतो. दर्शन घेवून बसस्टँडकडे कसे पाय ओढले आमचे आम्हालाच माहित! बसमध्ये तुडुंब गर्दीत उभे राहुनच प्रवास करावा लागला. घरी आलो तर माझे अवघडून चालणे पाहुन शेजार्यांना वेगळीच शंका आली. पत्नीला फोन करून विचारून त्यांनी खात्री करून घेतली आणि मगच निश्वास सोडला! पुढे चारपाच दिवस ‘वाकडे पाय पडणे’ याचा ‘तसा’ नाही पण त्या अर्थाचा शब्दश: अनुभव घेतला!
सायकल झाली, पायी प्रवासही झाला. बसचा तर लहानपणापासून अनुभव होताच. बसेस आजच्या सारखे स्लिपर किंवा लक्झरी नव्हत्या. लाल परी! आजकाल तिला लाल डब्बा म्हणून हिणवले जाते, पण आमच्यासाठी ती परीच होती. तीन सिट एकीकडे आणि दुसरीकडे दोन सीट आणि मागे पुढे संपूर्ण बाकडे अशी पन्नास प्रवाशांची सोय असायची. रात्रीच्या प्रवासाची बस म्हणजे रातराणी. स्वच्छ धुतलेली आणि एकही सिट फाडून स्पंज बाहेर न निघालेली लाल परी. या बसमध्ये संपूर्ण तीन सीटचे बेंच रिकामे मिळाले तर त्यापेक्षा दुसरे सुख नसायचे. लांब पाय करून ताणून द्यायचा अनुभव ज्यांनी घेतला आहे त���यांना आजच्या स्लिपर कोचचे काहीच विशेष वाटणार नाही.
रेल्वेचा पहिला प्रवास १९७५ साली झाला. तिरूपती बालाजीला आई वडील आणि भावंडांसोबत गुलबर्ग्याहुन रेणीगुंठाला ��ेलो होतो. रिझर्वेश बिजर्वेशन काही नाही. जनरल ड्ब्यातून प्रवास. लाकडी पट्या ठोकलेले बर्थ होते. त्यावरच दाटीवाटीने प्रवासी बसायचे. स्टेशनवरच्या नळातून फिरकीचा तांब्या भरून पाणी घेऊन ते पुढच्या स्टेशनपर्यंत पुरवले जायचे. एखाद्या स्टेशनवर केळीच्या पानावर मिळालेले ईडली वडा सांबर गर्दीत बसून खाण्याची मजा काही वेगळीच असायची. पुढे अत्याधुनिक रेल्वे, मेट्रो हा प्रवासही केला, पण ती पहिली आठवण अजुनही मनात आहे.
एका मित्रासोबत १९९४ साली सहकुटुंब अलिबागला गेलो होतो. अर्थात लाल परीने. तिथे अचानक एक योग जुळून आला. मांडवा धक्क्यावरून गेटवे ऑफ इंडीया रात्रीच्या वेळी दिसते, हे पाहुन बोटीने तिथे जावे असे ठरले आणि दुसर्या दिवशी बोटीचा अनोखा प्रवासही घडला. बॉब क्रिस्टो हा विलन नट त्यावेळी भेटला होता. अथांग सागरात, चारी बाजूला पाणीच पाणी, खवळलेल्या लाटा पार करत आम्ही गेटवेला पोहोचलो. तिथे असलेल्या बग्गीचा आनंदही लुटला. डबल डेकर बसने स्टेशन अन मग लोकलने बोरीवलीतील बहिणीकडे जात असंख्य आठवणी मनात साठवून तो प्रवास संपला.
लहानपणी हिल्मन या कारने आम्ही बरेच फिरलो होतो. पण अगदीच लहान असल्यामुळे फारसे कळत नव्हते. पुढे स्वत:च्या कारने तिरूपती, गोवा, गुजरात आणि महारष्ट्रभर प्रवास झाला. स्वत: चालवत फिरण्याचा अनुभव आणि मजा वेगळीच असते.
२००८ साली विमान प्रवासाचा पहिला अनुभव घेतला. अहमदाबाद ते मुंबई हा आयुष्यातील पहिला विमान प्रवास. खूप उत्सुकता होती. काय होईल, कसे होईल ही धाकधुक होती. पण काहीही वाटले नाही. अगदी सराईत प्रवाश्याप्रमाणे, जसे काही रोज विमान प्रवास करतो अशा अविर्भावात तो प्रवास केला. पुढे अनेकदा दिल्ली प्रवास घडला, तसेच कायम लक्षात राहिल असा चेन्नई ते कोलंबो आणि परत असा प्रवासही घडला.
कारने आरामात फिरत असलो तरी एक इच्छा मनात होती की आपण मोटरसायकलवर भारत भ्रमण करावे. त्या इच्छेने जोर धरला आणि सुझुकी झियस ही नवीकोरी मोटरसायकल विकत घेतली. पण योग जुळून आला नाही. सोबत यायला कुणीच तयार होईना. मग २०११ साली उमरग्याला मोटरसायकलवर जाऊन दुधाची तहान ताकावर भागवली. नितीन काजवे हा मित्र सोबत आल्यामुळे हा योग जुळून आला. आमच्या घराण्यात मांजरसुंब्याच्या घाटाचे वेगळेच महत्व आहे. १९६४ साली वडील आणि काका, काकांच्या नव्या कोर्या जावा कंपनीच्या मोटरसायकलने औरंगाबादहुन उमरग्याला निघाले होते. घाटात त्यांचा मोठा अपघात झाला आणि ते थोडक्यात वाचले होते. जखमी अवस्थेत�� ते तुळजापूरमार्गे उमरग्याला कसे पोहोचले ही माझ्या जन्माच्या अगोदरची ही गोष्ट ऐकून आम्ही हरखून जायचो.
१९८० साली मोठा भाऊ मित्रासोबत अल्विन पुष्पक या स्कुटरने उमरग्याला निघाला होता. त्याचाही मांजरसुंब्याच्या घाटात अपघात झाला होता. हा घाट पार करणे आपल्यासाठी धार्जिन नाही हे ओळखून तो परत फिरला होता. मी मात्र मोटरसायकलवर हा प्रवास पूर्ण करण्यात यशस्वी झालो. बहुतेक इजाबिजा टळली असावी!
घरी कळू न देताच आम्ही निघालो होतो. बीडच्या घाटात थांबून अंदाज्यानेच वडलांच्या व भावाच्या अपघात स्थळाला नमस्कार केला आणि मजल दरमजल करत उस्मानाबादला एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. अचानक तुफान पाऊस आणि विजांचा गडगडाट सुरू झाला. आम्ही बसलो होतो त्याच्या बाजूला असलेल्या खोलीचे पत्रे उखडून हवेत कागदासारखे उडून गेले. आमच्या डोक्यावरच पत्रेही जोर जोरात तांडव करत होते. पण नशीबाने उडाले नाहीत. जेवण आटोपून आम्ही संध्याकाळी उमरग्याला पोहोचलो. वहीनींनी आमची खूप खरडपट्टी काढली. घरी बायकोलाही माहित नव्हते. त्यांनी मोबाईलवर आमचा प्रताप सांगितला त्यावेळी तिनेही डोक्यावर हात मारून घेतला. (अर्थात मनातल्या मनात ते दृश्य दिसले!).
दुसर्या दिवशी सकाळी लवकर निघून परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत एका हॉटेलमध्ये पेपर वाचला तेव्हा मोठी बातमी होती की उस्मानाबादला काल झालेल्या भीषण पावसात वीज पडून दोन व्यक्ती दगावल्या! लगेच पेपर बाजूला ठेवला आणि संध्याकाळी सुखरूप घरी पोहोचलो. वाटेत त्याच मांजरसुंब्याच्या घाटातले सीताफळे आठवण म्हणून घरी घेऊन आलो.
नंतरच्या काळात गिअरवाले स्कुटर जाऊन ऑटो गिअरवाले स्कुटरेट्स निघाल्या. या छोट्या गाड्या शहरात फिरण्याच्याच सोयीसाठीच बनल्या आहेत. हे माहित असूनही नुकताच २०२२ च्या १ जुलैला एक धाडसी निर्णय घेतला. मुलीला तिची अॅक्सेस स्कुटर पाहिजे होती. ती पोहोचवण्यासाठी एका ट्रांस्पोर्टच्या ट्रकमधून स्कुटर पुण्याला पोहोचवून येतो असे सांगून घरून निघालो आणि तडक त्याच अॅक्सेसवर पुण्याकडे प्रयाण केले. सोबत अर्थातच नितीन काजवे हा मित्र. वय वर्षे सत्तावन्न अठ्ठावन्न असलेले आम्ही दोन ‘तरूण’ मित्र अगदी मजेत, कसलाही त्रास न होता आरामात सहा तासात पुण्यात पोहोचलो. तिथे गेल्यावर मुलीला आणि तिच्या मार्फत बायकोला आमचा प्रताप कळला, आणि नेहमीप्रमाणे तिने कपाळावर हात मारून घेतला (परत काल्पनिक दृश्य!).
थोडक्यात सांगायचे तर पायी, बैलगाडी, खटारा, टांगा, बग्गी, बस, रेल्वे, कार, सायकल, मोटरसायकल, स्कुटर, विमान, बोट अशा सर्व प्रवासी माध्य��ांचा वापर करायला मिळाला हे आमचे भाग्यच! फक्त आम्हाला ट्रामचा अनुभव घेता आला नाही ही खंत आहे. मिळेल त्या साधनांचा आनंद घेत प्रवास केला तरच घुमते रह जाओगे हे मात्र खरे आहे!
अजून हेलिकॉप्टर, पॅरा ग्लायडिंग आणि सबमरीन बाकी आहे. बघूत नशीबात असले तर...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
साप...
सन १९७१-७२ चा काळ. गावात हळूहळू सुधारणा होत होत्या. विजेचे खांब लागले होते. त्यावर मिणमिणते बल्ब लटकले होते. त्यामुळे रस्त्यांवर मंद उजेड पडू लागला. अंधाराची सवय झालेल्या गावाला सुखाचे दिवस आले. पण हे सुख जास्त दिवस टिकायचे नाही. बल्ब शॉट होणे किंवा कुणीतरी दगड मारून फोडणे हे ठरलेलेच असायचे. मग परत अंधार. गल्लीतले रस्ते कच्चेच होते. अजून डांबरीकरण झाले नव्हते. आमच्यासाठी ती चांगली गोष्ट होती. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात उड्या मारणे, चिखलात रॉड खोचत लांबवर जाणे, चिखलापासून वेगवेगळ्या वस्तु बनवणे ही मजा असायची. कुणी घसरून पडले की फजीती पहायलाही मजा यायची.
घरांमध्येसुद्धा म्हणावे तसे लाईट्स नव्हते. ४० व्हॅटचे बल्ब खोल्यात लावलेले असायचे. खोली मोठी असो वा छोटी, या बल्बवरच सर्व भार असायचा. गिझर, फ्रिज वगैरे तर माहितच नव्हते. स्वैपाकासाठी वा आंघोळीसाठी सर्व घरांमध्ये लाकडे, गोवर्या कोपर्या कोपर्याने रचून ठेवलेल्या असायच्या. किडे, मुंग्या, घुशी, साप, विंचू यांना लपायला भरपूर जागा असायची. केरोसीन, कंदील, चिमण्या प्रत्येक कोनाड्यात तयार ठेवाव्या लागायच्या. मेणबत्त्यासुद्धा फारशा वापरात आल्या नव्हत्या. लाईट संपूर्ण वेळ कधी टिकायची नाही. त्याची सवय पडली होती. लाईट गेले की गोंधळ न करता शांतपणे चिमणी किंवा कंदील पेटवले जायचे. कंदीलाची काळी झालेली काच कपड्याने साफ करतांना फार छान वाटायचे. बोटाने त्या काजळीवर चित्र काढायला मजा यायची.
अशा त्या काळात, अंधारात - खाचखळग्यात खेळलं तरी कुणी आमच्यावर फारसे ओरडायचे नाही. फक्त ‘विंचू किडे असतात, सांभाळून!’ एवढीच सूचना असायची. अनवाणी पायाने आम्ही कुठेही खेळायचो. घरी आल्यावर हाता पायावर पाणी ओतले की झाले. आजकाल घरातही चप्पल घालून फिरायचा जमाना आहे, पण त्याकाळी बाहेरसुद्धा चप्पल न घालताच आम्ही खेळायचो. बुट तर अजून पाहिलेही नव्हते.
मी दुसरी तिसरीत असेन. जेवणे आटोपून आम्ही झोपायला वरती माडीत गेलो. रात्री उशीरा बैठकीतले काम आटोपून दादा वरती यायला निघाले. ओसरीवर मच्छरदाणीत तात्या झोपले होते. ढेळजातले लाईट बंद करतांना दादांनी सहज तात्यांच्या पलंगाकडे पाहिले तेव्हा त्यांना तिथे काही हालचाल जाणवली. मंद उजेडात काही स्पष्ट दिसले नाही. वरून टॉर्च आणून त्यांनी पाहीले तर काय! एक नाग फणा काढून तात्यांच्या पलंगाजवळ बसलेला दिसला! दादांनी आईला आवाज दिला. तिच्याबरोबर आम्हीही पळत खाली गेलो. तोपर्यंत साप झोपाळ्याखालून स्वैपाकघरात गेला होता. आम्हाला तर दिसलाही नाही. दादांनी ओसरीवरचा बल्ब चालू केला आणि टॉर्चच्या उजेडात आत जाऊन पाहिले, पण साप गायब झाला होता.
आवाजामुळे तात्या उठून बसले. त्यांना काही कळू न देता धावपळ चालली होती. समोरचे दार उघडून मदत मिळते का हे आईने पाहिले. बाहेर अंधारच होता. गल्लीत घराबाहेर ओट्यावर बसून गप्पा मारणार्या बायका व माणसांना काहीतरी गडबड आहे हे लक्षात आले. साप निघालाय आणि तो फणाधारी नाग आहे हे कळल्यावर सर्वांनी ओट्यावरच पाय वरती ओढून घेतले. ‘अरे बापरे’, ‘ये यव्वा’ असे आवाज त्यांच्या तोंडून निघत होते. हळूहळू गल्ली जागी झाली. जो तो आपापल्या परीने उपाय सुचवू लागला.
‘नाग विषारी असतो हो बाबा, चावला तर माणूस गेलाच म्हणून समजा’
‘शुभ शुभ बोला हो’ घाबरून एकाची प्रतिक्रिया.
‘मी एकदा नाग पाहिला होता. सळ्ळकन माझ्या पायावरून गेला. नशीब चांगले म्हणून वाचलो’
‘ते तर काहीच नाही, मी दोन नागांना खेळतांना पाहिले. त्यांना कुणी डिवचलं तर ते डुख धरतात, म्हणून हालचाल न करता एकाच जागी दोन तास न हालता बसून राहिलो’
‘विष उतरवणारा एकजण मला माहित आहे’
‘तेच्यानं काय बी होत नाही, सोळा इंजेक्शन घ्याव लागतं’
‘ते काय कुत्रं आहे का सोळा इंजेक्शन घ्यायला? त्याचं औषध वेगळं असतं’
‘काय असतं?’
‘वेगळंच असतं!’
अशा वायफळ गप्पांना ऊत आला होता. सर्वांचे अनुभव, कुणाचे खरे, कुणाचे मनाचे सांगून झाल्यावर नागाला कसे पकडायचे याच्या गप्पा सुरू झाल्या.
‘अवनिग हाल कुडू, स्वयम होगत्याद’ (त्याला दूध द्या, आपोआप निघून जाईल) कानडीतून एका म्हातारीने उपाय सुचवला.
त्यावर हसत एकजण म्हणाला ‘हं, तो काय दूध प्यायला आलाय का? द्या माय दुध...पिऊन गुपचुप जातो...’ हे ऐकून भीतीच्या वातावरणातही सर्वजण हसले.
‘एक पोतं घ्या, साप दिसला की पटकन त्याच्यावर टाका अन धरा’. एकाने ओट्यावर सावध उभे राहून सल्ला दिला.
‘हे घ्या पोतं, अन व्हा पुढं’ दुसरा एकजण त्याच्या हातात पोतं देत म्हणाला. ते ऐकून सल्ला देणारा ‘अय, नगं रे बाबा...’ म्हणत अजून मागे सरकून उभा राहिला.
‘अरे पिरगाळांनो, पळा घरी, नाहीतर धरंल तुम्हालाच’ पोरासोरांना रागवत एकजण ओरडला. तशी पोरं धूम पळाली. फक्त गल्लीतल्या दारादारात बायका आणि ओट्यांवर माणसे उभी होती. पण समोर कुणी येत नव्हता. असा बराच वेळ गेला. त्या घोळक्यातून कुणीतरी म्हणाला की विष्णूपंताचा बापू साप पकडण्यात पटाईत आहे. पडत्या फळाची आज्ञा मानून लगेच दोघेजण पळत त्यांच्या घरी गेले. दार वाजवून अख्ख्या घराला त्यांनी जागी केले. विष्णूपंत आधी उठले. ‘कोण आहे रे या वेळी?’ म्हणत त्राग्यातच त्यांनी दार उघडले. ते दोघेजण एकत्रच ओरडले ‘साप निघालाय, चला लवकर.’
दार उघडत त्यांनी त्या दोघांना फैलावरच घेतले. ‘मी काय साप पकडणारा वाटलो का काय? चला पळा इथून.’
त्या दोघांनी त्यांना सर्व माहिती दिली. बापू साप पकडण्यात तरबेज आहेत असे कळले हेही सांगितले. ते ऐकून बापूपेक्षा विष्णूपंतांचीच छाती इंचभराने फुगली. साप कुणाकडे निघाला आहे हे कळताच त्यांनी बापूला आवाज दिला. प्रसंगाची गांभीर्यता ओळखून तो लगेच काठी घेऊन बाहेर पडला आणि धावतच आमच्या घरी आला. त्याचा पवित्रा बघून बाकीच्यांना हिम्मत आली. त्याच्या मागे वरातीच्या मागे घोडे चालल्यासारखे एकेकजण दबकत दबकत आत येवू लागला. आधी साप कुठे दिसला अन कसा होता यावर चर्चा झाली. तो ज्या दिशेने गेला त्या दिशेला बापू बॅटरी हातात घेवून मागच्या स्वैपाकघरात गेला. चिडीचुप शांतता पसरली होती. कुणाच्या पायाचा आवाज आला तरी दचकायला होत होते. आवाज करणार्याकडे बापू रागाने पहात होता. त्यालाही मनातून भीती वाटत होती, पण अनुभव असल्यामुळे तसे जाणवू देत नव्हता.
घरभर शोध मोहिम सुरू झाली होती. खाच खळग्यांना घरात तोटा नव्हता. सावधपणे काम चालले होते. मी तात्यांच्या पलंगावर मच्छरदाणीत बसून सारे पहात होतो. या आधी मांडूळ जातीचे साप पाहिले होते. ते काही वेळा घरात निघाले होते. दादांनीच काठीने त्यांना बाहेर लोटले होते. पण नाग कधी पाहिला नव्हता. विषारी अन बिनविषारी म्हणजे काय, काही कळत नव्हते. त्यामुळे भीती आणि उत्सुकता दोन्ही वाटत होती.
बर्याच वेळाने असा निष्कर्ष निघाला की साप स्वैपाक घरात असलेल्या न्हाणीतल्या मोरीत शिरला असावा. मोरी��ा नाली होती. ती ओसरीच्या खालून अंगणात निघत होती. त्या एवढ्याशा नालीत बॅटरी मारून बापूने दुरूनच पाहिले पण काही दिसत नव्हते. काठी आत घालून त्याने आवाज केला तरी परिणाम शुन्य! अंगणात जिथे नालीचे तोंड निघत होते त्या ठिकाणी ओसरीवर थांबून दुसर्या बॅटरीने काहीजण साप बाहेर येतो का हे पहात थांबले होते.
‘नालीत पाणी वता, साप बाहेर येईल’ एकाने सल्ला दिला. तो सर्वांना पटला. लगेच बादल्या बादल्याने हौदातल्या पाण्याचा उपसा सुरू झाला. आधीच गावात पाण्याचे दुर्भिक्ष, त्यात हौद रिकामा होत होता. त्यामुळे आईचा जीव कासावीस होत होता. पण पाण्यापेक्षा सापाला पकडणे महत्वाचे होते. तो सापडला नाही तर आम्हीच काय, त्या रात्री गल्लीही झोपली नसती एवढी दहशत पसरली होती.
न्हाणीघराच्या मोरीत धडाधड पाणी ओतणे सुरू झाले. नालीच्या अंगणातल्या तोंडाला काठीच्या सहाय्याने पोते लावून बापू थांबला होता. ‘नाग मारू नका बरं, डुख धरतंय’ या पोक्त सल्ल्यामुळे त्याने नालीवर पोत्याचे तोंड घट्ट दाबून धरले होते. तरी पोत्यात न तो जाता बाहेर आला तर ठेचून काढावे लागेल यासाठी दुसर्या हातातही काठी घेवून तो पवित्र्यात थांबला होता. काही वेळाने त्याला पोत्यात हालचाल जाणवली! ते पाहून दूर ढेळजत उभे राहून पाहणार्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. काहीजण बाहेर पडायच्या बेतात असतांनाच बापूने झपकन पोत्याचे तोंड दाबून धरले आणि ओलेचिंब झालेले ते पोते गरागरा फिरवत त्याचे तोंड बांधले.
सर्वांनी सुस्कारा सोडला. दोन तासापेक्षा जास्त वेळ केलेल्या परिश्रमाचे चीज झाले. बापूच्या चेहर्यावर विजयी भाव उमटले. गर्दीत मागे उभे असलेल्या विष्णूपंतांना पोराचा अभिमान वाटला. पोते घेवून बापू बाहेर पडला. पोते बांधलेले असले तरी बाकीचे लोक त्यापासून दूरच पळाले. रात्रीच गावाबाहेर कुठेतरी ते पोते सोडले असे दुसर्या दिवशी कळले. साप अध्याय संपला. बापूचे नाव गावभर झाले.
ओट्यावर उभे राहून पाहणार्या लोकांना हा विषय मिठ मसाला लावून गावभर सांगण्यासाठी पुढे काही दिवस पुरला.
मला मात्र एकच खंत वाटत होती, नाग प्रत्यक्ष पहायला मिळाला पाहिजे होता...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
मो. ९४२२२७८३१०
0 notes
Text
बबऱ्या...
‘बब्रू, माझी काठी आण रे...’ ‘बबर्या, हौदात पाणी भरले का?’ ‘धार काढली का रे?’ ‘अंथरूणं काढली का?’ ‘सडा टाक���न घे दारात लवकर’ ‘दोरीवरचे कपडे काढून आण रे बबर्या..’ ‘बब्बर, टॉवेल घेऊन ये इकडे’
अशा आदेशांच्या फैर्या बबर्याला नव्या नव्हत्या. बब्रू, बब्बर, बबर्या हे बभ्रुवाहनचे अपभ्रंश त्याच्या इतके अंगवळणी पडले होते की कुणी चुकून त्याचे खरे नाव घेतले तर तो प्रतिसाद देत नसे. रोज सकाळी पाच वाजल्यापासून त्याचे हात दहा दिशेला चालत असायचे. वाड्यात आल्याबरोबर गोठ्यात जाऊन जनावरांना चारापाणी करणे, ते झाले की स्वैपाकघर, देवघर, ओसरी, अंगण, दोन्ही ढाळज, बैठक अन दारासमोरचा रस्ता फड्याने झाडून शेणाचा सडा टाकण्याचे काम यंत्रवत चालायचे. यात आयत्या वेळच्या इतर कामाची भर पडायची ते वेगळेच!
आईची सडा रांगोळी दिवस उजाडायच्या आत पूर्ण व्हायची. त्यावेळी तात्या लाकडी खुर्चीत बसून चहा घेत असायचे. त्याच चहातल्या उरलेल्या पत्तीत पाणी मिसळून केलेला लाल चुटुक चहा कान तुटलेल्या कपातून फुरक्या मारत पितांना साक्षात अमृत पिल्याचा भाव बबर्याच्या चेहर्यावर उमटायचा. तृप्त होवुन तो नव्या दमाने आडातून शेंदलेले पाणी पितळेच्या घागरीने अंगणातल्या हौदात, न्हाणीघरातल्या बंबात भरून गोवर्या लाकडाने बंब पेटवायचा. यात त्याचा एक तास जायचा. तोवर सगळे घर जागी झालेले असायचे. दादा उठले की पेपर वाचत पलंगावर बसायचे. पलंगावर लोड चादर झटकून ठेवलेली असायची. सर्वांचे चहापाणी होईपर्यंत तो माडीवर जाऊन अंथरुणं काढून घड्या करून ठेवायचा. गाद्या गुंडाळून माडीतल्या खिडकीत रचून ठेवायचा. गाद्या उचलतांना आशाळभूत नजरेने चादरी झटकायचा. चुकून एखाद्या वेळी काही चिल्लर मिळायची. हळूच ती खिशात टाकायचा. तेवढीच तंबाखूची सोय. चिल्लर मिळाली त्या दिवशी त्याची कळी खुललेली असायची. रोजच्यापेक्षा एखादे जास्त काम करायला काही कुरकुर करायचा नाही. एरवी एखादे नित्याचे काम चालू असले तर कितीही आवाज द्या, हातातले काम संपल्याशिवाय तो ओ द्यायचा नाही. पुढे आम्ही मोठे झाल्यावर गावी गेलो की हळूच बक्षिसी मागायचा. आता मजल पन्नास शंभरापर्यंत गेली होती. ती मिळाली की लाख मिळाल्याचा आनंद याच्या चेहर्यावर झळकायचा!
केविलवाणा तेलकट चेहरा, पाठीला कुबड, लाल डोळे, खुरटी दाढी अन तसेच डोक्यावरचे खुरटे केस, त्यावर पांढर्याची पिवळी पडलेली चपटी गांधी टोपी तिरपी घातलेली, पायात कडक झालेले कातडी बुट – ज्याचा रंग कोणता हे पैज लावुनही ओळखणे कठीण! कधीतरी दादांनी द��लेली पँट अन शर्ट महिनो न महिने त्याच्या अंगावर असायची. धुतला तर शुभ्र पांढरा रंग दिसेल असे चुकूनही कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही असा गडद मातकट पिवळा झालेला शर्ट आणि कमरेला दोन तीन फोल्ड करून कडदोर्याने आवळलेली आणि तरीही घसरणारी निळ्या रंगाचा धुरकट करडा रंग झालेली पँट असा त्याचा पेहराव असायचा. फार क्वचित हा पेहराव बदललेला असायचा. कधी कधी एकावर एक दोन शर्ट घालायचा. फाटलेला भाग झाकला जावा हा उद्देश! पुढचा ड्रेस मिळेपर्यंत अंगावरच्या कपड्यांना (पावसात भिजलेले सोडून) पाणी लागलेले नसायचे.
पोळ्याला मात्र इतर गड्यांबरोबर त्याला नवीन पायजमा अन बुशकोट मिळायचा. तेवढ्याने त्याला स्वर्गसुख मिळाल्याचा आनंद होत असे. मग बैल पुजेत जोमाने ‘हरभला रे भगतरा जो हरभला... चांगो चांग भला...’ म्हणत जु उचलुन बैलांना फेर्या मारायचा. त्यानंतर मिळणारे पुरण पोळीचे जेवण ही तर वर्षभराची साठवण! इतर गड्यांबरोबर अगदी मन लावून खायचा, अन ‘दोन पोळ्या नेताव घरी’ असे हक्काने म्हणत बायको व आईसाठी डबा घेवून जायचा.
पोळा झाल्यावर दर वर्षी त्याच्या अंगात यायचे! ‘आवंदा कुणबीक करनाराव’ असा हट्ट करायचा. दिवाळी पाडव्याला रुसून बसायचा. शेवटी त्याच्या आईला बोलावून समजावून सांगावे लागायचे. मग परत त्याचे गुराख्याचे काम पुर्ववत सुरू रहायचे. एका वर्षी मात्र दादांनी त्याचा हट्ट पुरवला. गुराख्यापेक्षा जास्त पगार कुणबिक करणार्या गड्याला मिळायचा म्हणून तो खुश झाला. ��ण जेमतेम आठ दिवसात पस्तावला. भल्या पहाटे उठुन बैल जोडून नांगरणी करणे, वाफे तयार करणे, पाणी देणे, खुरपणे, कुळव मारणे अशी कामे आपल्या बसची बात नाहीत हे त्याला पटले आणि कुणबिक करायचा नाद त्याने कायमचा सोडला.
साधारण १९७०-७१ पासून तो घरचा सदस्य झाला होता. त्यावेळी त्याचे वय चौदा पंधरा वर्षाचे असावे. इमाने इतबारे दैनंदिन कामे करत पुढे जवळपास पंचेवीस वर्ष तो घरासाठी राबला. पडेल ती कामे करत राहिला, पण गुराखी असलो तरी त्याला मान असतो हे त्याने एकदा दाखवले! १९७८ ला भावाच्या लग्नात त्याने सर्व कामे केली, पण लग्नाला यायला तयार होईना! खोदुन खोदुन विचारल्यावर म्हणाला ‘कारड मिळाले नाही!’ शेवटी त्याच्या नावाचे ‘कारड’ दिल्यावरच गडी बसमध्ये चढला!
१९८० च्या आसपास त्याचे लग्न झाले. त्याच्या म्हातारीने जंग जंग पछाडून त्याच्यासाठी बायको मिळवली. घरचा प्रतिनिधी म्हणून लहान भाऊ सायकल घेवून लग्नाला गेला होता. त्याच्याच सायकलवर दोन्ही बाजूला दोघांनी आधार देवून त्याची वरात काढली होती. त्याकाळी युट्युब नव्हते, नाहीतर बाशींग बांधून सायकलवर तोल सांभाळत वरातीत निघालेल्या नवर्याची क्लिप चांगलीच व्हायरल झाली असती!
बबर्याचा दिवस सकाळी पाचला सुरू व्हायचा आणि रात्री नऊला संपायचा. घरी आला की सकाळची घरातली कामे आटोपून नऊ वाजता जनावरे घेऊन तो डुलत डुलत शेताकडे निघायचा. वाटेत असलेल्या त्याच्या घरातून चिरगुटात बांधलेली भाकर सोबत घेवून जनावरांना चारत चारत रमत गमत शेतात पोहोचायचा. शेतात गेल्यावर जास्त ताण नसायचा. बंधार्यावर बसून लक्ष ठेवणे एवढेच काम. पावसाळ्यात चिंता नसायची. सर्वत्र हिरवळ असायची. जनावरांना भरपूर खायला मिळायचे. पण उन्हाळ्यात मात्र हाल व्हायचे. चार्यासाठी वणवण फिरावे लागायचे. जास्त काळजी असायची पाण्याची. विहिरी आटलेल्या असायच्या. मग जनावरांना पाणी कसे पाजणार ही काळजी त्याला एका ठिकाणी बसू द्यायची नाही. वेगवेगळ्या शेतात हिंडून जिथे पाणी मिळेल तिथे तो त्यांना पाजायचा. जीव ओतून त्यांची काळजी घ्यायचा. मग समाधानाने सावली बघून भाकर खाऊन घ्यायचा.
दिवसभराचे हे काम आटोपून संध्याकाळी शेतातून येतांना डोक्यावर गवताची भलीमोठी भारी, हातात काठी, काठी खांद्याला टेकवून तिला अडकवलेली नायलॉनची पाठीवर ह
हेलकावणारी पिशवी, त्यात कैर्या, भाज्या, बेलपत्री अशा अवतारात जनावरांसहीत सहाच्या आसपास परत यायचा. जनावरांना गोठ्यात जागेवर बांधून आडातले पाणी शेंदून पाजणे, चारा टाकणे, धारा काढणे, शेण गोळा करणे, साफसफाई करणे ही कामे आटोपेपर्यंत आठ वाजून गेलेले असायचे. मग स्वैपाकघराच्या बोळीत किंवा ओसरीवर कोपर्यात बसून आईने दिलेली भाजी भाकरी खाऊन घ्यायचा. खाणे झाले की माडीवर, सज्जात गाद्या अंथरणे, बेडशीट, उशा, पांघरुणे व्यवस्थित ठेवणे हे काम बिनबोभाट करायचा. कधी कुणी पाहुणे आले तर बैठकीत अंथरुणे टाकावी लागायची. उन्हाळ्यात तिसर्या माडीवर (गच्चीवर) बिछायत घालावी लागायची. आम्ही लहान असतांना अंथरुणे टाकातांना त्याला फार त्रास द्यायचो. आम्हाला मजा वाटायची. उड्या मारून मारून आम्ही सगळं विस्कळीत करून टाकायचो. सर्व व्यवस्थित करतांना त्याची दमछाक व्हायची. आज आपापल्या घरी एखादी गादी टाकणे आणि काढणे हे किती जिकिरीचे काम आहे हे लक्षात आल्यावर त्या बिचार्याला आपण लहानपणी उगाच त्रास दिला याचे वाईट वाटते.
ही सर्व कामे झाल्यानंतर रात्री नऊच्या आसपास तो घरी जायचा. परत सकाळी पाचला येण्यासाठी!
असा हा बबर्या, आमच्या घरातील जनावरे कमी झाल्यामुळे पुढे दुसर्यांकडे काम���ला जायला लागला. तरी कधीही आम्ही गावी आलो ही खबर लागली की रात्री आपुलकीने भेटायला यायचा. डोळ्यात तीच केविलवाणी आस...बक्षिशी मिळण्याची! खायला दिले की बांधून न्यायचा...बायको अन मुलीसाठी!
शेवटपर्यंत सरकारी योजनेत घर मिळेल या आशेवर जगत राहिला अन २०२० साली आयुष्यभर अनेक घरांसाठी राब राब राबून अचानक देवाघरी निघून गेला...शेतकरी व्हायचे आणि बायका लेकरांसाठी घर बांधायचे स्वप्न मागे ठेऊन...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
मो. ९४२२२७८३१०
1 note
·
View note
Text
शास्त्रीय संगीत
श्रीपाल अन कृपाशंकर लहानपणापासूनचे दोस्त. एकत्र खेळणे, अभ्यास करणे आणि जेवणेसुद्धा एकत्र चालायचे. श्रीपालचे कुटुंब सधन होते. लाडाने त्याला सर्वजण शेरी म्हणायचे. या दोघांनाही संगीताची आवड होती. श्रीपालला पाश्चिमात्य संगीताची आवड होती तर कृपाशंकरला भारतीय शास्त्रीय संगीताची. गावातल्या गुरुकुलातील अंध गुरूंकडे कृपाशंकर मन लावून शास्त्रीय संगीत शिकत होता. त्याच्या नादाने शेरीसुद्धा जायला लागला. पण त्याला त्यात बिल्कुल रस नव्हता. ‘हे अंध शिक्षक मला काय शिकवणार?’ अशी त्याने खिल्ली उडवली आणि दोन दिवसातच संगीताचे शिक्षण बंद केले.
कृपाशंकरची परिस्थिती साधारण होती. वडील किर्तनकार होते. आई जात्यावरच्या ओव्या छान म्हणायची. त्यामुळे उपजतच त्याच्या अंगात संगीत भिनले होते. त्यावर गुरूकुलात संस्कार घडत होते. तिथेच राहुन पडेल ते काम करत त्याने दहा वर्ष संगीताची मनोभावे साधना केली अन गुरूजींच्या विश्वासास पात्र ठरला. त्यांच्या परवानगीने छोट्या मोठ्या मैफिलीत सहभाग नोंदवू लागला.
दरम्यान दुर्दैवाने त्याच्या वडलांचे निधन झाले. वडलांचा वारसा जपत गुरूच्या परवानगीने तो किर्तनाचे कार्यक्रम करू लागला. शास्त्रीय संगीताचे अंग असल्यामुळे किर्तनाला चांगली गर्दी जमू लागली. गावोगावची आमंत्रणे येवू लागली. यावरच त्याची उपजिविका चालू लागली.
एकदा गावात झालेल्या ऑर्केस्ट्रामध्ये लोकांनी त्याला जबरदस्तीने गायला लावले. आढेवेढे घेत सिनेमातले एक गाणे त्याने गायले अन खूप वाहवा मिळवली. काही लोकांनी बक्षिसही दिले. किर्तनामधून जी बिदागी मिळायची त्यापेक्षा कितीतरी जास्त प��ीने ते बक्षिस मोठे होते. त्याला आनंद झाला, पण मन खात होते. गुरूजी काय म्हणतील ही भीती वाटत होती. मित्रांनी त्याला समजावले की शास्त्रीय संगीत अन किर्तनाच्या कार्यक्रमापेक्षा अशा कार्यक्रमातून पैसा जास्त मिळतो. खंत वाटून घेवू नको, भविष्याचा विचार कर. तरीही त्याला अपराध्यासारखे वाटत होते. गुरुजींना कळू नये अशी त्याने देवाला मनोमन प्रार्थना केली.
एक दिवस तो गुरूकुलात गेला. गुरूजींनी त्याला जवळ बसवले अन त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले ‘तू ऑर्केस्ट्रात खूप छान गायलास असे कळले. बरे वाटले. माझा शिष्य आता तयार झालाय, मोठा झालाय याचा अभिमान वाटला.’
कृपाशंकरला बरे वाटले. आशीर्वाद घेण्यासाठी तो खाली वाकला तितक्यात त्याच्या कानाखाली काडकन आवाज झाला. दोन क्षण त्याच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. घेरी आल्यासारखी वाटली. डोळे किलकिले करून त��याने गुरूजींकडे पाहिले. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता!
‘ऑर्केस्ट्रात गातोस? गाढवा, एवढ्यासाठी तुला शिकवले? इतक्या वर्षाच्या मेहनतीची माती करायचीय? बजावून सांगितले होते असले काहीही गायचे नाही. पण चकाचक दुनियेला भुललास. माझा शिष्य व्हायची तुझी लायकी नाही, चल चालता हो इथून. पुन्हा मला तोंड दाखवू नको.’ गुरूजी कडाडले.
डोळ्यातून घळाघळा अश्रू ढाळत कृपाशंकर त्यांच्या पायाशीच बसला. इतर शिष्य घाबरून ते दृश्य पहात होते. कुणालाही काय करावे समजत नव्हते. रागाने थरथरत एका शिष्याच्या सहाय्याने गुरूजी आपल्या खोलीत निघून गेले. बाकीचे शिष्यही आपापल्या निवासात निघून गेले. कृपाशंकर एकटाच गुरूजींच्या आसनासमोर खाली मान घालून रडत बसला.
काही वेळाने खांद्यावर गुरूमायचा मायेचा स्पर्श त्याला जाणवला. त्याही अंध होत्या, पण केवळ स्पर्शाने शिष्याची घालमेल त्यांना समजत होती. त्यांच्या मांडीवर डोके ठेवून तो हमसून हमसून रडू लागला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत गुरुमाय काही न बोलता बसली. खूप वेळाने त्याला उठवत भोजन कक्षात नेले. काहीही खायचे मन नव्हते पण गुरूमायच्या आग्रहाखातर त्याने एक ग्लास दुध घेतले अन त्यांना वंदन करून बाहेर जायला निघाला.
‘थांब थोडं’ असे म्हणत गुरूमायने त्याला आपल्या कक्षात नेले.
‘गुरूजी क्रोधीत झाले आहेत, त्यांचा राग शांत झाला की मी त्यांना बोलते. तू आजची रात्र इथेच थांब.’ त्यांनी कृपाशंकरला समजावले.
त्याच रात्री गुरूमायने मध्यस्थी करून गुरू अन शिष्यात मिलाफ घडवून आणाला. यापुढे फक्त शास्त्रीय संगीताची साधना करण्याचे वचन घेऊन गुरूजींनी त्याला माफ केले.
त्या दिवसापासून कृपाशंकरने कानाला खडा लावला. गुरुजींच्या मार्��दर्शनात स्वत:ला संगीत साधनेत झोकून दिले. चरितार्थासाठी किर्तन चालू ठेवण्याची परवानगी गुरूजींनी दिली होती. ते सांभाळत शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत सहभागी होवू लागला. गुरूकुलाचे नाव करू लागला. कालांतराने त्याचे लग्न झाले. प्रपंच वाढला. पण कुठल्याही अमिषाला बळी न पडता मिळेल त्या बिदागीत सुखाने संसाराचा गाडा ओढू लागला.
इकडे श्रीपाल दहावीनंतर शहारातील मोठ्या कॉलेजला दाखल झाला. इंटरनेटच्या माध्यमातून अद्यावत विदेशी वाद्य वाजवण्यात पारंगत झाला. ‘शेरी बँड’ नावाने स्वत:चा ग्रुप तयार केला. पैशाची उणीव नव्हतीच. त्यामुळे बँड उभे करायला काहीच अडचण आली नाही. भव्य स्टेज, लाईट इफेक्ट्स, अद्यावत साऊंड सिस्टीम या माध्यमातून तो लोकांवर छाप पाडू लागला. हळूहळू त्याचे कार्यक्रम वाढू लागले. सर्वत्र त्याचे नाव झाले. बॉलीवुडमध्येही त्याची मागणी वाढू लागली. तरुणांच्या गळ्यातला तो ताईत बनला.
देशविदेशात कार्यक्रम करून त्याने अमाप पैसा कमावला. मुंबई दिल्लीत घरे घेतली. या धुंदीत गावाची नाळ मात्र तुटली. घर सुटले. आई अन वडील दोघेही काही अंतरात वारले. परदेशात असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीलाही तो उपस्थित राहिला नाही. तिथून परतल्यावर एकदा शेवटचे गावी गेला, त्यावेळी कृपाशंकरला भेटला. कृपाशंकर अजूनही त्याच दगडा मातीच्या घरात रहात होता. त्याची अवस्था पाहुन तो म्हणाला ‘अरे काय ठेवलंय शास्त्रीय संगीतात? कुणीतरी सरकारी कार्यक्रमात बोलावतं, कधी राजघराण्यातील लोक बोलावतात. बिदागीही अशी किती मिळते? तुमच्या कलेच्या मानाने ते काहीच नाही हे तुलाही माहित आहे. अंध गुरूच्या नादाने इथेच खितपत पडलास. माझ्याकडे बघ जरा. काय नाही माझ्याकडे? माझे माध्यम वेगळे असले तरी मी भरपूर पैसा कमावतो. रशीयन मुलीशी लग्न केले. तीही पॉप गायिका आहे. आमच्या दुनियेत किती मजा आहे तुला माहितच नाही. अजूनही तू गावातील पडक्या घरात राहतोस, कसेबसे भागते तुझे. चल माझ्याबरोबर, तुला खरी चमकदार दुनिया दाखवतो.’
चेहर्यावर मंद स्मित आणत कृपाशंकर म्हणाला ‘तुझी साधना वेगळी, माझी वेगळी. तुला जे जमते ते मला जमणार नाही. पैसा नसला तरी मला यात आनंद आहे, समाधान आहे. माझे गुरू मला पितृतुल्य आहेत. त्यांचा पाठीवर असलेला हात हीच माझ्यासाठी मोठी बिदागी आहे. मी काही तुझ्यासोबत येवू शकणार नाही. माफ कर.’
श्रीपालने तुच्छतेने त्याच्याकडे पहात निरोप घेतला अन निघून गेला.
पाहता पाहता तीस वर्ष निघून गेली. श्रीपाल चमकधमकच्या दुनियेत मिसळून गेला अन नकळत त्या दुनियेतील सर्व व्यसना��े ग्रासून गेला. अशी कुठलीही गोष्ट नसेल की ज्याचा आस्वाद त्याने घेतला नाही. अशा बेभरवशाच्या भपकेबाज दुनियेत जे व्हायचे तेच झाले. अय्याशीवर पैसा खर्च होत गेला. नशेबाज झाल्यामुळे कार्यक्रम कमी होत गेले. जेवढी कला अंगात होती ती संपली. नशेमुळे आवाजावर परिणाम झाला. गाणं तर सोडाच त्याला धड बोलताही येईना. बॉलीवुडमध्ये कुणी दारातही उभे करेना. रशीयन बायको त्याच्याच बँडमधल्या गिटारिस्टबरोबर पळून गेली. मुंबई दिल्लीतील घरे विकली गेली. नशेने त्याला पुरते घेरले. हताश होवून तो दिवस रात्र प्यायला लागला. पैसा संपला तसे त्याच्या अवतीभवती फिरणारे लोक कमी झाले. त्याच्यामुळे मोठे झालेले लोकही त्याला जवळ करेनात. अक्षरश: तो रस्त्यावर आला आणि लोकांसमोर हात पसरू लागला.
बारमध्ये गायचाही प्रयत्न केला, पण आवाज गेल्यामुळे तिथेही काम मिळेना. दरिद्री झालेला श्रीपाल मंदिरासमोर बसू लागला. नशेच्या सवयीने त्याला भिक मागायला प्रवृत्त केले होते. अस्ताव्यस्त केस, भुरकट दाढी, फाटके कपडे, कशाचेच त्याला भान नव्हते. पोट खपाटीला गेले होते. जे काही पैसे पुढ्यात पडतील त्याची नशा करून तो दिवस काढू लागला.
एक दिवस मंदिरात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले कुणी महाराज येणार होते. बरीच गर्दी जमली होती. जास्त पैसे मिळणार या आशेने अनेक भिकारी तिथे गोळा झाले होते. त्यात श्रीपालही होता. तो लोकांकडे हात पसरत केविलवाणा चेहरा करून भिक मागू लागला. तितक्यात हातात विणा, शुभ्र वस्त्र, डोक्यावर पगडी, तजेलदार चेहरा व तुकतुकीत कांती असलेले एक महाराज येतांना दिसले. सर्वजण त्यांच्या पाया पडत होते. नशेबाज श्रीपालही पुढे जाऊ लागला, पण दोन पाऊले पुढे जाऊन एकदम चपापला. एवढ्या गर्दीतही त्याने ओळखले. हातात विणा घेऊन येणारा दुसरा तिसरा कुणी नसून त्याचा परम मित्र कृपाशंकर होता! नजर चुकवुन तो मागे वळला. कृपाशंकरने आपल्याला पाहिले तर काय म्हणेल याची लाज वाटून तिथून निघून जायचा विचार त्याने केला.
लडखडत तो मंदीराच्या बाहेर आला त्याचवेळी ‘गोपालकृष्ण महाराज की जय...’ या जयघोषाने किर्तनाला सुरूवात झाली अन तो थबकला. हळूहळू श्रीकृष्णावरील सांगितिक किर्तन रंग भरू लागले. कृपाशंकरचा एकेक सूर श्रोत्यांच्या अन श्रीपालच्या काळजाला भिडू लागला. इच्छा असूनही त्याचा पाय तिथून निघेना. पायरीवर बसून तो किर्तन ऐकू लागला.
चार तास कसे निघून गेले श्रोत्यांना कळलेही नाही. कुणी साधी चुळबुळही केली नाही. कार्यक्रम संपूच नये असे लोकांना वाटत होते. शेवटी किर्तन संपवत ��ृपाशंकरने भैरवी सादर केली. टाळ्यांचा जोरदार वर्षाव झाला. श्रीपालच्या डोळ्यातून त्याच्याही नकळत घळाघळा पाणी वहात होते. भान हरपून तो उठला अन पाय खरडत सभामंडपाकडे गेला. भिकार्याला कुणी आत सोडेनात. तो रडत रडतच ‘महाराजांना भेटू द्या’ अशी विनवणी करू लागला पण कुणीच दाद देईना.
तो गोंधळ ऐकून महाराजांनीच त्याला आत सोडण्याची विनंती केली. वाकून समोर येत श्रीपालने त्या���च्या पायावर दंडवत घातले. महाराजांनी त्याला आदराने उठवले आणि चकित होवून ओरडले ‘श्रीपाल...?’ आणि त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
कळकट, मळकट, फाटक्या अवस्थेतल्या श्रीपालच्या तोंडाचा उग्र वास येत होता. अशा या भिकार्याची महाराज कशी काय गळाभेट घेत आहेत याचे सर्वांना आश्चर्य वाटत होते. काही क्षण असेच स्तब्धतेत गेले. श्रीपालनेच या शांततेला वाचा फोडली. तो म्हणाला -
‘मी भिकारी आहे. गेल्या दहा वर्षांपासून मंदीरासमोर बसून भिक मागणारा एक क्षुल्लक भिकारी. माझ्यासारख्या भिकार्याला या महाराजांनी जवळ घेतले हा त्यांचा मोठेपणा.’ एवढे शुद्ध आणि ओघवते बोलणारा भिकारी पाहुन सारे आचंबित झाले.
कृपाशंकरकडे बोट दाखवत तो पुढे म्हणाला ‘हे महाराज अन मी लहापणापासूनचे मित्र आहोत. आम्हाला दोघांनाही संगीताची आवड होती. फरक एवढाच की यांनी सरस्वतीची साधना केली अन मी लक्ष्मीची. मी खूप पैसा कमावला पण व्यसनाधीन होऊन सारे गमावले. याला तुच्छ समजत होतो. काय ठेवले आहे शास्त्रीय संगीतात? असे हिणवले. पण शास्त्रीय संगीतात काय ताकद आहे हे त्याने सिद्ध करून दाखवले. किर्तन खूप लोकं करतात, पण त्याला शास्त्रीय संगीताचा आधार मिळाला तर ते किती मनाला भावते याची प्रचिती मला आणि तुम्हाला सर्वांनाच आली आहे. हीच भारतीय शास्त्रीय संगीताची ताकद आहे अन हेच खरे संगीत आहे हे मला आत्ता कळले. पैशाने ज्ञान विकत घेता येत नाही, त्यासाठी गुरूच लागतात. पण मी गुरूंचीही खिल्ली उडवली, याची ईश्वराने मला मोठी शिक्षा दिली...’
त्याला पुढे बोलवेना. कृपाशंकरच्या खांद्यावर डोके ठेऊन लहान मुलासारखे रडू लागला. साठी ओलांडलेल्या दोन मित्रांची तीस वर्षानंतर झालेली अनोखी भेट, तीही अशा अवस्थेत पाहुन सारे सभामंडप स्तब्ध झाले होते. महाराजांनी सांगितलेल्या किर्तनातील सुदाम्याची गोष्ट आठवून कृष्णाला सुदामा भेटला की सुदाम्याला कृष्ण हा संभ्रम लोकांना पडला होता...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
मो. ९४२२२७८३१०
0 notes
Text
मायेचा आधार
राजू मेकॅनिकल इंजिनिअर झाला आणि आई वडीलांच्या आशीर्वादाने त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. खूप कष्ट करून आपले एक स्थान बनवले. डिझाईनमध्ये तर तो मास्टर होता. पण अनुभव नसल्यामुळे अन सरळ स्वभावामुळे व्यवसायातले छक्के पंजे त्याला जमत नव्हते. जे करायचे आहे ते ग्राहकाला व्यवस्थित समजावून सांगून सविस्तर माहिती द्यायचा. याचा फायदाही होत होता अन तोटाही. खरे तर तोटाच जास्त! कारण ग्राहकांना सर्व सविस्तर सांगितल्यामुळे ते स्वत:च एखाद्या कारागीराकडून ती वस्तू बनवून घ्यायचे. पण राजूला त्याचे काही वाटत नव्हते. जो देगा उसका भी भला और जो ना देगा उसका भी भला या तत्वावर त्याचे काम चालू होते. अर्थात स्वस्तात केलेले काम बिघडले की ते लोक राजूकडे येवून ‘गडबडीत आम्ही ते एकाकडून करून घेतले’ असे म्हणून त्याच्याकडून बिघडलेले काम सुधरवून घ्यायचे. मनात अढी न ठेवता राजू त्यांना मदत करायचा.
त्याचे मित्र त्याला हा स्वभाव बदलायला सांगायचे. ‘असे करू नको. हातचे राखून ठेवत जा. लोकांना तुझ्या बुद्धीचे काही देणेघेणे नसते. त्यांना केवळ स्वस्तात काम पाहिजे असते.’ पण कितीही प्रयत्न केला तरी त्याला स्वत:ला बदलता येत नव्हते.
कॉलेजच्या एका मैत्रिणीसोबत राजूने प्रेमविवाह केला. दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता, म्हणून कोर्ट मॅरेज केले. त्यामुळे दोन्ही घरे आणि नातेवाईक तुटले. शहरात जाऊन एकमेकांच्या आधाराने त्यांचा संसार सुरू झाला. कालांतराने त्यांना मुलगा झाला. प्रपंच वाढला तसे रोजचा खर्च भागवणे अवघड जावू लागले. घरभाडे, घरखर्च याचा मेळ बसवणे कठीण जावू लागले. दोघांनाही अशा परिस्थितीची सवय नव्हती, त्यात हक्काने व्यथा सांगावी असे जवळचे कुणीच नव्हते. पण त्याने हार मानली नाही. लोकांना भेटत राहिला. प्रामाणिकपणे त्यांचे काम करत राहिला. जे मिळते त्यात समाधान मानून राहू लागला. मनात चिंता मात्र होती. आजचे ठिक आहे, उद्याचे काय?
खिशात पैसे नसले तरी तो घरी ते जाणवू द्यायचा नाही. बायकोने काही आणायला सांगितले तर लगेच कपडे घालून बाहेर जावून ती वस्तू आणून द्यायचा. त्यासाठी दुकानदाराला काय विनवणी करावी लागायची त्याचे त्यालाच माहित. पण घरी आपल्या परिस्थितीची जाणीव तो होवू द्यायचा नाही. कित्येकदा बाईक घेवून बाहेर पडायचा अन एखाद्या ठिकाणी उभी करून पायीच फिरायचा. पेट्रोल भरायला पैसे नसायचे.
कितीही लपवत असला तरी त्याच्या बायकोच्या लक्षात ��ेत होते. एक दिवस ती त्याला म्हणाली ‘घरी बसून खूप कंटाळा येतोय. कुठेतरी नोकरी करावी असे वाटते’. राजू म्हणाला ‘मुलगा लहान आहे, कसे काय जमेल?’ तिने त्यावर तोडगा सांगितला ‘शेजारच्या काकू पाळणाघर चालवतात, त्यांच्याकडे तो खूप आनंदाने राहतो. त्याही मला म्हणाल्या मुलाला येथे सोडून तू काही काम करायला हरकत नाही.’
आढेवेढे घेत राजू तयार झाला. खरं म्हणजे मनातून त्याला बरे वाटले होते. तेवढाच हातभार लागला तर चांगलेच होते. दुसर्या दिवशी एका गॅस एजंसीमध्ये तो बायकोला घेवून इंटरव्ह्यूला गेला. खूप गर्दी होती पण तिला नोकरी मिळाली. महिना तीन हजार पगार होता. तेवढे तर तेवढे. निदान घरखर्चाचा ताण तर कमी होणार होता म्हणून ते दोघे राजी झाले. सधन कुटुंबात वाढलेली, कधी घराबाहेर न पडणारी ती, परिस्थितीमुळे नोकरी करू लागली.
रोज मुलाला शेजारी ठेवून बायकोला सोडून तो कामावर जावू लागला. कसेबसे दिवस जात होते. एक दिवस त्याला एका गृहस्थाचा फोन आला. कुणी मालपाणी साहेब होते. राजूला काही रेफरंस लागत नव्हता. काही कामासाठी त्यांनी त्याला ताबडतोब भेटायला सांगितले.
भीत भीतच तो दुसर्या दिवशी त्यांच्याकडे गेला. त्यांनी त्याचा परिचय आपल्या बायकोशी करून दिला. राजूने केलेल्या कामाबद्दल काही जणांकडून चांगल्या प्रतिक्रिया त्यांनी ऐकल्या होत्या, म्हणून त्याला बोलावले असे त्यांनी सांगितले. राजूला खूप बरे वाटले. त्यांनी एका नवीन मशीनची त्याला ऑर्डर दिली. त्या मशीनचे डिझाईनपासून ते मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत सर्व काम राजूलाच करायचे होते. अशी मशीन दिल्लीला तीस लाखापर्यंत मिळत होती. तेवढ्याच किमतीत त्यांनी राजूला ऑर्डर दिली अन तात्काळ त्याच्याकडे पाच लाखाचा चेक दिला.
तो चेक हातात घेतल्यावर कितीतरी वेळ तो त्याकडे पहात बसला. त्याला खरेच वाटत नव्हते. कसली गॅरंटी नाही, साक्षीदार नाही अन त्यांनी चक्क पाच लाखाचा चेक दिला होता. त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. सौ. मालपाणींनी चहा करून दिला आणि ‘ऑल द बेस्ट’ म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या.
घरी जात जात राजूने चेक बँकेत जमा केला. त्यापूर्वी मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढून ठेवला. एवढ्या मोठ्या रकमेचा चेक त्याला आतापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच मिळाला होता. घरी येवून त्याने मोबाईल देवासमोर ठेवून देवाला नमस्कार केला अन लॅपटॉप उघडून लगेच कामाला लागला. त्यांच्या मागणीप्रमाणे डिझाईनचे काम सुरू केले. संध्याकाळी बायको आल्यावर आनंदाने तिला हे सर्व सांगितले. तिलाही खूप आनंद झाला. कित्येक दिवसानंतर ते दोघे मुलाला घेवून रात्री एका हॉटेलमध्ये जावून जेवले.
आठ दिवसाच्या परिश्रमानंतर त्याला स्��त:ला समाधान वाटेल असे डिझाईन तयार झाले. गाडीला किक मारून तो मालपाणींच्या घरी गेला. त्यांना डिझाईन दाखवले. एवढ्या लवकर डिझाईन तयार झाले याचे त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनाही ते खूप आवडले अन त्यांनी मंजूरी दिली.
तात्काळ राजू कामाला लागला. एका मित्राच्या शेडवर थोडी जागा भाड्याने घेवून त्याठिकाणी काम सुरू केले. मित्राच्या ओळखीने सर्व साहित्य उधारीवर मिळवले. तीन महिने अविश्रांत मेहनत करून मशीन तयार झाली. राजूने स्वत: आधी ट्रायल घेतली. प्रॉडक्ट काढून पाहिले. खात्री झाल्यावर मालपाणी साहेबांना बोलावले. ते दोघे पती पत्नी आले आणि त्यांनी मशीन पाहून समाधान व्यक्त केले. तिथेच मालपाणींनी त्याला उरलेल्या पैशाचा चेक दिला. शेडचे भाडे, लाईटबील, मटेरियल, लेबर, पेट्रोल इत्यादी सर्व खर्च जाऊनही राजूला चक्क दहा लाख रुपये प्रॉफिट झाला होता!
त्या दोघांच्याही पाया पडून त्याने कृतज्ञता व्यक्त केली. दोन दिवसांनी मशीन मालपाणी साहेबांच्या फॅक्टरीत पाठवली. लवकरच त्या मशीनवर काम सुरू झाले. मशीनबाबत कसलीही तक्रार नव्हती. दिवसाला जेवढे प्रॉडक्शन आधी होत होते त्याच्या तिप्पट प्रॉडक्शन सुरू झाले होते, तेही कमी लेबरमध्ये, म्हणून मालपाणी दांपत्य खुश होते.
राजूने मिळालेल्या पैशात एक शेड भाड्याने घेऊन काम चालू केले. काही दिवसातच मालपाणी साहेबांनी त्याला तशाच आणखी पाच मशीन तयार करायची ऑर्डर दिली. आता त्याला दिवसरात्र फुरसतच मिळत नव्हती. बाहेरूनही चांगल्या ऑर्डर्स मिळू लागल्या होत्या. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती.
एक दिवस त्याला महाष्ट्र सरकारचे पत्र आले. त्यात त्याला ‘उत्तम तरूण उद्योजक’ पुरस्कार मिळाला आहे असे लिहिले होते. राजूला खरेच वाटले नाही. सर्व मित्रांना, बायकोला, मालपाणी साहेबांना त्याने ही आनंदाची बातमी सांगितली. ठरलेल्या दिवशी अनेक मित्र व बायको मुलासहीत तो मुंबईला गेला. राजभवनात राज्यपालांच्या हस्ते त्याला पुरस्कार देण्यात आला. आयुष्यात कधी कल्पना केली नव्हती असे सर्व घडले होते. आई-वडीलांच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले.
परत आल्यावर राजू सर्वप्रथम बायको मुलासहीत मालपाणी साहेबांकडे गेला. त्याने तो पुरस्कार त्या उभयतांच्या हाती देवून त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला ‘या पुरस्काराचे खरे श्रेय आपलेच साहेब.’
मालपाणी साहेब आपल्या पत्नीकडे पहात हसत म्हणाले ‘अरे हे तुझ्या श्रमाचे चीज आहे. यात आमचे काही नाही. अन पुरस्कार समर्पितच करायचा असल्यास ते तुझ्या बायकोला आणि सौ मालपाणींना कर.’ हे ऐकून राजू अचंबित होवून एकदा बायकोकडे अन एकदा सौ मालपाणींकडे पाहू लागला. त्या दोघी गालातल्या गालात हसत होत्या.
सौ. मालपाणी म्हणाल्या ‘तुझी बायको माझ्या मैत्रिणीच्या गॅस एजंसीमध्ये काम करत ��ोती. एक दिवस मैत्रिणीने तिची ओळख करून दिली. खूप मेहनती आहे असे सांगितले. वयाने लहान असली तरी आम्ही चांगल्या मैत्रीणी झालो. तिच्याकडून तुझ्याबद्दल कळले. आम्हाला फॅक्टरीत एक मशीन बनवून घ्यायचीच होती. मिस्टरांना तुझ्याबद्दल सांगितले. नेमके तुझे सासरे आणि माझे मिस्टर मित्र निघाले. तुझ्या सासर्यांनी यांच्या पडत्या काळात यांना खूप मदत केली होती. यांनी लगेच तूला बोलावून घ्यायला सांगितले. पण तुमचे अन त्यांचे संबंध ठीक नाहीत हे तुझ्या बायकोने सांगितले होते. तिच्याजवळ निरोप दिला त्यावेळी ती म्हणाली माझ्या बाबांची ओळख सांगून काम मिळाले तर ते कदाचित करणार नाहीत, म्हणून ओळख न सांगता तुम्हीच त्यांना बोला. मी वचन देते, ते तुमचे काम अगदी व्यवस्थित करतील. म्हणून आम्ही कसलीही ओळख न देता केवळ तुझ्या बायकोच्या विश्वासावर तुला काम दिले. तू त्यात खरा उतरलास.’
राजूने आश्चर्याने बायकोकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते. राजूचे डोळेही पाणावले. काही क्षण असेच निशब्द गेले, तितक्यात आतल्या खोलीचा दरवाजा उघडला. चमकुन सर्वजण तिकडे पहात असतांनाच आतून राजूचे सासू सासरे बाहेर आले. हा तर खूपच मोठा धक्का होता! आईवडीलांना दहा वर्षानंतर पाहून राजूची बायको रडत रडतच पळत जावून त्यांना बिलगली. दोघांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले.
त्यांना उठवत सासरे म्हणाले ‘आम्ही तुमच्यावर अन तुम्ही आमच्यावर नाराज होता. मुलीसाठी अन नातवासाठी आईचा जीव तुटत होता, पण मन कचरत होते. तुमची मेहनत, धडपड, अन संसारातल्या अडचणी आम्हाला बाहेरून कळत होत्या. इच्छा असूनही आम्हाला काही करता येत नव्हते. माझा बालमित्र मालपाणीने आम्हाला जावयाचे कौतुक पाहण्यासाठी येण्याचा खूप आग्रह केला. आम्हीही मनातुन अशा संधीची वाटच पहात होतो.’ नातवाला त्यांनी कडेवर घेतले अन मालपाणींकडे पाहून म्हणाले ‘मित्रा, आज तूझ्यामुळे आम्हाला जगातले सर्व सुख मिळाले. नातवाला कडेवर घ्यायचा आनंद जगातल्या सर्वश्रेष्ठ आनंदापैकी एक आहे. एकुलत्या एक मुलीला, जावयाला अन नातवाला भेटण्यासाठी मन खूप अधीर झाले होते, पण कसे भेटावे कळत नव्हते. आज जावयाचे कौतुक पाहण्याच्या निमित्ताने तू हे सर्व घडवून आणलेस. धन्यवाद मित्रा.’
नातवाकडे पहात ते पुढे म्हणाले ‘आम्ही तुमच्यासाठी अजून एक गंमत आणली आहे...’ असे म्हणत ते सर्वांना घेऊन आतल्या खोलीत गेले. आतले दृश्य पाहुन तर राजूला आश्चर्याचा आणखी एक सुखद धक्का बसला! आत सोफ्यावर साक्षात त्याचे बाबा आणि आई बसले होते. त्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंचे पाट वहात होते. राजू धावतच त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून धाय मोकलून रडू लागला. त्याला आणि सुनेला दोघांनी छातीशी कवटाळले. नातवाला कडेवर घेतांना तर त्यांचा आनंद ओसंडुन वहात होत���. याप्रसंगी काय बोलावे कुणालाच काही समजत नव्हते.
शांततेचा भंग करत मालपाणी साहेब म्हणाले ‘तुझ्या सासर्याला याचे श्रेय आहे राजू. मी त्याला आग्रहाने जावयाचे कौतुक पहायला बोलावले त्यावेळी तो म्हणाला, आमच्या आधी या कौतुक सोहळ्यावर राजूच्या आईवडीलांचा अधिकार आहे. आणि स्वत: त्यांच्याकडे जावून त्याने त्यांचे मन वळवले. तेही मनातून मुलगा, सून अन नातवाला पाहण्यासाठी अधीर झाले होते. आढेवेढे न घेता लागलीच ते यायला तयार झाले.’
हे सर्व ऐकून राजूला मालपाणी दांपत्यांचे आभार कसे मानावे हेच कळेना. त्याने दोघांनाही साष्टांग दंडवत घातला. त्याला उठवत सौ. मालपाणी म्हणाल्या ‘देवाने हे सर्व घडवून आणले आहे. आम्ही फक्त निमित्तमात्र आहोत. देवाचे आभार माना आणि सुखाने नांदा.’
या घटनेमुळे दोन दुरावलेल्या कुटुंबाचे मिलन झाले, दुभंगलेली मने जुळली, सर्व गैरसमज दूर झाले. मायेचा आधार हा पैशापेक्षाही खूप मोठा असतो. कसल्याही अडचणीतून मार्ग काढण्याची ताकद त्यात असते. तो आधार राजूला अन त्याच्या बायकोला तब्बल दहा वर्षानंतर लाभला होता...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
मो. ९४२२२७८३१०
1 note
·
View note
Text
माऊली...
उन चांगलंच तळपत होतं. चपलेतुन शिरलेला फुफाटाही ठिणगीचा चटका बसावा तसा तळपायाला चटकत होता. आगीपेक्षा फुफाट्याचा दाह किती असह्य असतो याची प्रचिती येत होती. दोन्ही बाजूला काळी जमीन अन मधून ही पाऊलवाट. ढेकळातून चालणे कठीण म्हणून या दाहक पाऊलवाटेशिवाय पर्याय नव्हता. एकाद दुसरे बाभळीचे बोडखे झाड सोडले तर कुठेही सावलीचा लवलेश नव्हता.
अशा त्या निर्जन वाटेवरून दिनू पाय ओढत चालला होता. किती वेळापासून चालत होता त्यालाही ठाऊक नव्हते. चार तासांपूर्वी एका नाल्यावर वाहणार्या ओहोळात त्याने मनसोक्त पाणे पिऊन घेतले होते. हात पाय धुतले होते. डोक्यावरचे फडके पाण्यात भिजवून घेतले होते. डोके थंड ठेवायला ते तासभर कामी आले होते. आता मात्र उन्हाचा चटका असह्य होत होता. डोळ्याची आग होत होती. त्यात पोटात कालवाकालव सुरू झाली होती. जवळ कालची उरलेली भाकरी होती, पण कुठेही पाण्याची चाहुल लागत नव्हती. ओठ कोरडे पडले होते. मृगजळाकडे पाहुन अजूनच शुष्क झाले होते. घामावाटे शरीरातील उरले सुरले पाणीही अट�� चालले होते. अशा कडक उन्हात कुठे बसताही येत नव्हते.
त्याला लहानपणीचे दिवस आठवले. आपल्या शेतातल्या गोलाकार बांधलेल्या दगडी विहीरीतल्या निळ्याशार पाण्यात आपण किती मनसोक्त पोहत होतो हे चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. आपले शेत? हो, आपलेच! आई वडील कसे असतात हे पाहिलेच नव्हते. काका काकूंनीचे सांभाळले होते. त्यांचं जे तेच आपलं! मी परका थोडाच आहे? पण गेल्या काही दिवसात वातावरण कसे काय बदलले? जाऊ दे! नको तो विषय! शरीरावरच्या आघातापेक्षा मनावरचा आघात घातक असतो. त्याने तो विचार झटकून टाकला अन परत विहीरीच्या आठवणीत स्वत:ला झोकून दिले.
कल्पनेनेच वीस फुट उंच असलेल्या बारीवरून त्याने पाण्यात सूर मारला. सपकन आत जाऊन सापसुरळी सारखे झपकन वरती आला. विहीरीला गोल गोल फेर्या मारल्या. दगडी पायरीवर बसून घटाघट पाणी प्याला. अगदी पोट तुडुंब भरेपर्यंत. विहीरीवर झुकलेल्या झाडाची पडलेली बोरे पाण्यावर तरंगत होती. ती मोत्यासारखी चमकणारी बोरे पोहत जाऊन त्याने काठाकडे आणली. पायरीवर बसून गोड गोड बोरे खातांना त्याला आपल्यापेक्षा श्रीमंत जगात कुणीच नसल्याचा आभास होत होता.
तितक्यात गाईच्या हंबरण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला तसा दिनू भानावर आला. या ओसाड माळरानात आलेल्या आवाजाने आशा चाळवली. जवळ कुठेतरी वस्ती असावी. आवाज खराच होता की भास? तो चालतच राहिला. काही क्षणात परत आवाज आला. आवाजाच्या दिशेने तो जोरात चालू लागला. दूर एक झाड दिसत होते. जवळ गेला तशी खात्री झाली की खरंच तिथे मोडकी तोडकी खोपटी अन एक गाय होती. दिनूला हायसे वाटले. तो झाडाजवळ गेला. गाईने कान टवकारले. दिनूने चुचकारून तिच्या पाठीवरून फिरवला. काही धोका नाही हे पाहुन गाय कडबा खाऊ लागली. गाईला पाणी पिण्यासाठी एक टोपले दिसत होते पण त्यात पाणी नव्हते. दिनू मटकन खाली बसला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येत होती. तो खाली लवंडला.
दूरून चालण्याचा आवाज आला. डोळे किलकिले करून त्याने पाहिले. एक म्हातारी डोक्यावर घागर घेवून येत होती. जीवाच्या आकांताने त्याने उठायचा प्रयत्न केला. पण शरीरात त्राणच नव्हता. तो तसाच पडून राहिला.
‘कोण हाय? ए बाबा...इथं का झोपलास?’ घागर खाली ठेवत म्हातारी विचारत होती. ऐकू येत होते पण उत्तर द्यायची त्याच्यात शक्ती नव्हती.
म्हातारीने टोपल्यात पाणी घातले. लपक लपक करून गाय पाणी पिऊ लागली. दिनूला आपणच गाईसारखे पाणी पितोय असे वाटू लागले. गळीतगात्र अवस्थेतही त्याची जीभ शुष्क ओठावरून फिरू लागली. म्हातारीने त्याला उठवायच��� प्रयत्न केला, पण तो हालचाल करण्याच्या परिस्थितीत नव्हता.
दिनूच्या तोंडातून फेस निघत होता. ‘साप बिप चावला की काय?’ म्हातारीने विचार केला. गडूमध्ये पाणी घेतले अन त्याच्या तोंडावर शिंपडले. त्याची मान वर करून त्याला पाणी पाजले. चांगले गडूभर पाणी पिल्यावर दिनू शुद्धीवर आला. काहीवेळाने त्याला तरतरी आली. उठून झाडाच्या बुंध्याला टेकून बसला.
‘लेकरा, थोडं खाऊन घे.’ कापडात बांधलेली अर्धी भाकरी त्याच्यापुढे ठेवत म्हातारी म्हणाली. दिनूने आपली शिदोरी सोडली. ‘आहे माझ्याकडे आज्जी’ असे म्हणून भाकरीवर तुटून पडला. म्हातारीने आग्रहाने तिची भाकरीही खाऊ घातली. घागरीत थोडेच पाणी होते. त्यातले पाणी पिऊन दिनू उठला.
‘आज्जी, पाणी कुठून आणले? मी घेऊन येतो.’ घागर हातात घेत तो म्हणाला. म्हातारी म्हणाली ‘अरे बाळा, चार कोस लांब विहीर आहे, तिथून पाणी आणावं लागतं. दिवसातून तीन खेपा मारते तवा माझं अन या लक्ष्मीचं भागतं’.
तिचे बोलणे संपेपर्यंत दिनू पळत सुटला. तासाभराने पाणी घेऊन परत आला. दिवस मावळत आला होता त्यामुळे उन्हाचा चटका बसत नव्हता. त्याने गाईला पाणी पाजले. म्हातारीकडच्या भांड्यात भरून ठेवले आणि परत एक खेप केली तोवर अंधार पडला होता.
‘कुठं राहते आज्जी तू?’ दिनूने विचारले.
‘हितंच राहते बाबा. ही ईस गुंठे जमीन आपलीच हाय. जवारी होते खाण्यापुरती. कडबा गाईला पुरवते उनाळाभर अन इथंच पडून राहते. रात्री बाजूच्या शेतावर जागल असते. तेवढाच आधार.’ म्हातारीने सांगितले. ‘पण तू कोण? कुठला? अन इकडं कुठं निघाला बाळा?’
‘शहराला निघालो. एसटीचे पैसे नाहीत. चालत निघालो.’ उठत म्हातारीच्या पाया पडत तो म्हणाला ‘लांबचा पल्ला आहे आज्जी, येतो.’
‘अरं अंधार पडलाय. रातीचं कुठं जातो इंचू किड्याचं. थांब आजची रात्र इथंच.’ म्हातारीने आग्रह केला. काही केल्या सोडेना. नाईलाजाने दिनू थांबला. रात्री म्हातारीने भाकर केली. दोघांनी गाईच्या दुधात कुस्करून ती खाल्ली. आता अंगात ताकद आली होती. बोलता बोलता त्याने आपली कथा सांगितली. आई वडलांविना वाढलो. काका काकूंनी सांभाळले, पण अचानक काकू बदलली. काय झाले माहित नाही. त्रास देवू लागली. काल तर चक्क घराबाहेर हाकलून लावले. डोळ्यात पाणी आणून दिनूने सर्व कथन केले.
‘भावकी लई बेक्कार रे बाबा...’ गोधडी अंथरत म्हातारी म्हणाली. गोधडीवर अंग टाकल्याबरोबर दिनूला गाढ झोप लागली. भल्या पहाटे तो उठला. दुरून म्हातारी पाणी घेऊन येतांना दिसली. ती आल्याबरोबर तिच्या पाय पडत म्हणाला ‘येतो आज्जी, ओळख राहू दे.’
‘शेरात माझा ल्योक राहतो. त्याचा नं��र देते. भेट त्याला. तो तुला मदत करील’ कमरेला खोचलेला एक कागद काढून म्हातारीने त्याच्याकडे दिला. निरोप घेऊन दिनू शहराकडे निघाला. म्हातारीने पहाटे उठून भाकर्या करून ठेवल्या होत्या, त्यातल्या दोन त्याला देत आशीर्वाद दिला ‘येश मिळू दे’.
पाणावल्या डोळ्याने तो पुढच्या वाटेला लागला. कोण कुठली म्हातारी, नात्यातली की गोत्यातली? तिने एवढे आपल्यासाठी केले, अन आपले जवळचे... मनातला विचार त्याने झटकला अन पुढे चालू लागला.
रात्र पडत असतांना दिवे दिसू लागले, मोटार गाड्या भिरभिरू लागल्या. तो शहरात पोहोचला होता. एका पुलाखाली बसून त्याने जवळ असलेले खाऊन घेतले. रात्र त्याच पुलाखाली काढली. सकाळी काम शोधण्यासाठी फिरू लागला. एकदम त्याला म्हातारीने दिलेला कागद आठवला. एका दुकानदाराला विनंती करून त्याने नंबर फिरवला आणि सर्व हकिकत सांगितली. त्या व्यक्तीने त्याला पत्ता सांगितला, त्याप्रमाणे तो तिथे पोहोचला. एक मोठी पाटी दिसली ‘माऊली कॉटन’. एवढ्या मोठ्या फॅक्टरीत गेटवरच्या वॉचमनने लगेच त्याला आत सोडले.
मळलेले कपडे, नायलॉनची फाटकी पिशवी, कातड्याची कर कर वाजणारी चप्पल अशा अवस्थेत तो एका थंडगार खोलीत जाऊन बसला. त्याला आत बोलावले गेले. साहेबांनी त्याची विचारपूस केली आणि एका दुसर्या माणसाला बोलावून काही सांगितले. त्या माणसाने दिनूला एका खोलीत नेले आणि त्याच्या हातात एक पत्र दिले. ‘ही केबीन तुमचीच आहे. आजपासून तुमची स्टोर मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे’ असे म्हणून तो निघून गेला. दिनूला आश्चर्य वाटले. कसाबसा तो बी.ए. पास झाला होता. एवढ्या शिक्षणात कुणी हमाल म्हणून ठेवले तरी नशीब असे टोमणे काकू मारायची. अन इथे चक्क मॅनेजरची नोकरी मिळाली होती. स्वप्न आहे की खरेच आहे? चिमटा काढून त्याने खात्री करून घेतली आणि देवाचे आभार मानून खुर्चीत बसला.
काही दिवसातच ट्रेनिंग संपून त्याचे काम सुरू झाले. पगार चांगला मिळू लागला. असेच काही महिने गेले, पण दिनूच्या मनात राहून राहून कुठेतरी एक खंत डाचू लागली. एवढ्या मोठ्या साहेबाची आई तिथे उन्हातान्हात झाडाखाली खोपटी करून राहते अन यांना त्याचे काहीच कसे वाटत नाही?
एक दिवस संधी साधून तो साहेबांच्या केबीनमध्ये गेला. सरळ विषयाला हात घालत म्हणाला ‘साहेब, तुमच्या आईमुळे मी इथे आलो. नोकरी, कपडालत्ता, पैसा, घर तिच्या आशीर्वादाने आणि आपल्या कृपेमुळे मला मिळाला. पण मनात एक खंत आहे...’ असे म्हणून मनातले बरेच काही बोलला. साहेब सर्व ऐकून घेत होते. चेहर्यावर मिश्किल हास्य होते. दिनूच्या बोलण्याचा त्यांना काहीच राग येत नव्हता. ��्याचे सर्व बोलणे संपल्यावर ते उठले. ड्रायवहरला गाडी काढायला सांगितली अन दिनूला घेऊन बाहेर पडले.
ड्रायव्हरने गाडी सुरू केली. सुसाट निघालेली गाडी काही वेळातच मुख्य रस्ता सोडून कच्च्या रस्त्याला लागली. फुफ़ाटा उडत होता त्यातुनच गाडी जात होती. कुणीच काही बोलत नव्हते. पण दिनूला समाधान मिळत होते. माझ्या बोलण्याने का होईना साहेब आईला भेटायला निघाले! आता नोकरीवरून काढले तरी बेहत्तर, पण आई मुलाची भेट घडवून आणली हीच म्हातारीच्या उपकाराची परतफेड.
गाडीने वळण घेतले तसे दूर ते झाड दिसले. आपले श्रम कामी आले याचा दिनूला आनंद झाला. गाडी झाडाजवळ थांबली. दिनू पटकन खाली उतरला. तिथे खोपटीही नव्हती अन गायही नव्हती! कुठे गेली असेल म्हातारी? दिनूने ‘आज्जी, कोण आलंय बघ...’ असा चारी दिशेला आवाज दिला. पण प्रतिसाद मिळाला नाही.
तो गाडीकडे आला. साहेब गाडीला टेकून उभे होते. चेहर्यावर तेच मिश्किल हास्य! ‘साहेब, आज्जी पाणी आणायला गेली असेल, मी पळत जाऊन पाहून येतो.’ साहेबांनी होकारार्थी मान हलवली. दिनू पळत सुटला अन काही वेळाने धापा टाकत परत आला.
‘चकवा लागला साहेब. मला...विहीर दिसलीच नाही! परत जाऊन पाहुन येतो’ दिनू धापा टाकत बोलला.
साहेब त्याच्या जवळ आले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला झाडाजवळ घेवून गेले अन म्हणाले ‘दिनू, तुला आश्चर्य वाटले नाही का, की एवढ्या ओसाड जागेत हे एकमेव झाड कसे काय तग धरून आहे? कडक उन्हात सगळी झाडे बोडखी झाली पण हेच कसे काय टवटवीत आहे?’ हे ऐकून दिनूला खरेच आश्चर्य वाटले. आपल्या कसे हे लक्षात आले नाही असे भाव त्याच्या चेहर्यावर उमटले.
साहेब पुढे म्हणाले ‘मी एकुलता एक मुलगा. वडील लहानपणीच सोडून गेले आणि भावकीने हाकलून लावले. माहेराकडून मिळालेली वीस गुंठे जमीन कसून आईने मला लहानाचे मोठे केले. खूप कष्ट सोसले तिने. मला नोकरी लागून हाल अपेष्टांचे दिवस संपतील या आशेवर माझ्या माऊलीने मला काहीच कमी पडू दिले नाही. पण ईश्वराच्या मनात वेगळेच होते.’
‘काय झाले साहेब?’ दिनूने विचारले. म्हातारी भेटावी या उत्सुकतेपोटी साहेबांचे भाषण लवकर संपावे असे त्याला वाटत होते.
साहेब म्हणाले ‘मला नोकरी लागली अन पहिला पगार मिळायच्या आतच आई मला सोडून गेली. मी पोरका झालो.’
‘सोडून गेली? पोरका झालात? काय बोलता साहेब? आजी तर इथेच आहे. थांबा मी बोलावतो.’ विहीरीकडे जायच्या आवेशात दिनू बोलला.
‘थांब दिनू. नीट ऐक. या गोष्टीला आता पंधरा वर्ष होऊन गेली आहेत. माझी माऊली हे जग सोडून गेली आहे हे वास्तव आहे.’
‘नाही साहेब! मी त्यांच्या हातची भाकरी खाल्ली आहे. असे कसे म्हणता?’ दिनू बेभान होवून म्हणाला.
‘वाट चुकलेल्या कोणत���याही माणसाला ती अजूनही मदत करत असते दिनू. तू भाग्यवान आहेस म्हणून तुला ती दिसली. असा अनुभव खूप जणांना आला आहे. त्यात तुझी अन आमची व्यथा सारखीच. अशा परिस्थितीत मनाची काय अवस्था होते हे तिला चांगलेच ठाऊक आहे. तुझे निष्पाप मन तिने ओळखले म्हणूनच तिने तुला माझ्याकडे पाठवले.’
दिनूला काहीच सुचेना. काय खरे अन काय खोटे. म्हातारीचा चेहरा, ती गाय, भाकरी, विहीर हे सर्व डोळ्यासमोर भिरभिरू लागले. वेगळ्याच विश्वात असल्याचा भास दिनूला होत होता. नकळत त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागले. त्याने म्हातारीचे स्मरण करून ‘धन्य ती माय माऊली अन धन्य तो सुपुत्र’ असे म्हणत जमीनीवर साष्टांग दंडवत घातला अन जड पावलाने साहेबांसोबत परत निघाला. परततांना या पावन भूमीचे पवित्र तीर्थक्षेत्रात रुपांतर व्हावे हा एकच ध्यास त्याच्या मनात घोळू लागला.
काही वर्षातच साहेबांची परवानगी घेऊन दिनूने त्या वीस गुंठ्यात भव्य असे मंदीर अन गोशाळा उभारली. आजुबाजूची जमीन घेऊन विस्तार केला. भाविकांसाठी मोफत राहण्याच��� अन जेवाणाची सोय केली. पाहता पाहता त्या ओसाड जागेचे हिरवाईत रुपांतर होऊन ‘माऊली माता की जय’ या गर्जनेने सारा परिसर दुमदुमुन गेला आणि आईविना पोरके झालेल्या सर्वांसाठी ते ‘माऊली मंदीर’ एक आश्रयस्थान अन प्रेरणास्थान बनले...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
१९८३...
आमच्या लहानपणी मैदानी खेळ खेळणे, अन त्यात प्रामुख्याने क्रिकेट खेळणे हा आमचा आवडीचा छंद. अगदी कळायला लागले तसे आम्ही भावंडे क्रिकेट खेळायचो. अर्थात खेळ कमी अन भांडणे जास्त व्हायची, पण तरीही खेळणे कमी झाले नाही. मोठा प्रवीण अन धाकटा बाळू छान खेळायचे, मी मात्र लिंबूटिंबू असायचो. बॉलर पळत आला की मला भीतीच वाटायची, त्यामुळे फिल्डींग आणि क्वचित बॉलिंग करून समाधान मानून घ्यायचो.
तो काळ असा होता की नुकतेच वन डे मॅचेस सुरू झाले होते. एक दिवसात संपणार्या मॅचेसची एवढी क्रेझ वाटायची नाही. टेस्ट मॅचेसची सवय झाली होती. पाच दिवस खेळ अन एक दिवस सुट्टी अशी सहा दिवस मॅच चालायची. दोन किंवा तीन दिवसानंतर एक दिवस सुट्टी असायची. त्या सुट्टीच्या दिवशी खूप रा�� यायचा. गावस्कर, विश्वनाथ, अमरनाथ, वेंगसरकर आदी चांगले खेळत असतांना नेमकी सुट्टी यायची. तो दिवस कधी एकदा संपतो असे होवून जायचे. भारतात मॅच असली तर दिवसभर कुठे न कुठे रेडिओवर कॉमेंट्री ऐकायला मिळायची. इंग्लंड, वेस्ट इंडीज अशा ठिकाणी रात्री अकरा साडे आकरापर्यंत मॅच चालायची. शॉर्ट वेव्हवर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रांझिस्टर नेऊन खर...खुर...करणार्या ट्रांझिस्टरला रेंज मिळवून देण्याची धडपड चालायची. फिलिप्सच्या मोठ्या रेडिओवर मात्र चांगला आवाज यायचा. पण मध्येच रेंज गेली की खूप राग यायचा. त्याला थापट्या मारून हात दुखायचे.
उन्हाळ्यात ट्रांझिस्टर घेवून तिसर्या मजल्यावर (गच्चीवर) अंथरलेल्या गार गार गादीवर, स्वच्छ चंद्रप्रकाशात पहुडत कॉमेंट्री ऐकायची जी मजा यायची ती आज टिव्हीवर मॅच पाहण्यातही नाही! दिसत काहीच नसले तरी डोळ्यासमोर सर्व स्वच्छ दिसायचे. कॉमेंट्री सांगणारे इतके छान सांगत की संपूर्ण मैदान डोळ्यासमोर उभे रहायचे.
टिव्हीचा प्रसार व्हायच्या पूर्वीचा तो काळ होता. पेपरमध्ये येणार्या क्रिकेटच्या फोटोंची कात्रणे करून जुन्या वहीत चिटकावणे हा उन्हाळ्यातला आमचा छंद होता. त्या काळी कलर फोटो नसायचे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो मध्ये गावस्करला ड्राईव्ह करतांना, किरमानीला डाय मारून कॅच पकडतांना, असे नुसते फोटो पाहूनच अंगावर शहारे यायचे.
‘एक कपील देव नावाचा फास्ट बॉलर आलाय. खूप जोरात बॉलिंग टाकतो तो’. १९७८ साली शाळेतून आल्यावर गल्लीतल्या मित्रांसोबत गप्पा मारतांना नवीन बातमी मिळाली होती. कल्पनेनेच तो एक उंचापुरा, धष्टपुष्ट असावा असा अंदाज बांधला होता. तोवर फास्ट बॉलर म्हणजे काय हे माहितच नव्हते. बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर, वेंकट राघवन, दिलिप दोशी असे स्पिनर्सच माहित होते.
‘अरे कपील देव काहीच नाही, योगराज सिंग म्हणून एक त्याच्यापेक्षाही फास्ट बॉलर आहे. पण त्याला टीममध्ये घेतले नाही.’ आमच्यापेक्षा वयाने मोठा असलेल्या एका मित्राने माहीती पुरवली. यावर बर्याच गप्पा रंगल्या. वेस्ट इंडीजमध्ये कसे धिप्पाड आक्राळ विक्राळ बॉलर आहेत, आपल्याकडे मात्र फक्त स्पिनर्स आहेत. नाही म्हणायला अबिदअली, करसन घावरी असे बॉलर होते, पण फास्ट बॉलर म्हणण्यासारखा हा कपील देव टीममध्ये आला आहे हे ऐकून हरखून गेलो होतो.
याच गप्पात १९७५ साली पहिली वनडे वर्ल्ड कप झाली अन वेस्ट इंडीजने जिंकली हे कळले. ‘त्या वर्ल्डकप मध्ये ओपनिंगला येवून गावस्कर संपूर्ण ६० ओव्हर्स खेळून नॉट आऊट राहिला, पण फक्त ���६ रन केले’ अजून एकाने माहिती दिली. या गप्पात अशी माहिती फक्त तोंडीच दिली जायची असे नाही. अगदी अॅक्शन करून कोण कसे शॉट मारतो, कोण कशी बॉलिंग करतो, मनगटाचे जॉईंट नसलेला चंद्रशेखर कसे बॉल टाकतो, हे कुठेही कधीही मॅच न पाहणारे अगदी रंगवून सांगायचे. त्यामुळे कल्पनाविश्वात रमायला खूप मजा यायची.
१९७९ चा वर्ल्डकपही वेस्ट इंडीजने जिंकला हे पेपरमध्ये वाचून कळले होते. डेस्मंड हेंस, गार्डन ग्रीनिज, क्लाईव्ह लॉईड, मायकल होल्डींग, माल्कम मार्शल, जोएल गार्नर, जेफ्री दुजां अशा धिप्पाड खेळाडूंचे फोटो पाहून त्यावेळी धडकीच भरायची. एकेकाळी बॉडीलाईन बॉलिंग करून त्यांनी अंशुमन गायकवाड, गावस्कर, वेंगसरकर, फारुख इंजिनिअर अशा खेळाडूंना मैदानावरच जायबंदी केले होते हे पेपरमध्ये वाचले होते. अशा या टीमला तेव्हा काहीच चॅलेंज नव्हते.
हे सर्व आज परत आठवायचे कारण म्हणजे ‘१९८३’ हा सिनेमा नुकताच दुसर्यांदा पाहिला आणि तो पहात असतांना डोळ्यासमोर त्यावेळचं सगळं चित्र अगदी हुबेहुब तरळलं.
१९८३ च्या वर्ल्डकपपर्यंत वनडे मॅचेसचे बरेचसे आकर्षण वाढले होते. पेपरमध्ये रोज त्याबद्दल वाचायला मिळत होते. भारत एकेक मॅच जिंकत फायनलला पोहोचला होता. न भुतो न भविष्यती असा तो क्षण होता. असे असले तरी आकाशवाणीच्या मेडियम वेव्हवर भारतीय स्टेशनवर कॉमेंट्री नव्हती. तिथे बातम्या आणि इतर कार्यक्रमच चालले होते. कदाचित भारतीय टीम असे काही शौर्य करेल हे आकाशवाणीच्या मनालाही शिवले नसावे. त्यामुळे शॉर्टवेव्हवर लागणार्या परदेशी स्टेशनवर अवलंबून असावे लागायचे.
फायनल मॅचच्या दिवशी आमच्या रेडिओच्या माडीत फिलिप्सच्या मोठ्या रेडिओवर कॉमेंट्री लावलेली होती. मॅचसाठी दादा (वडील) कोर्टातून लवकर घरी आले होते. मी वरती जाऊन कॉमेंट्री ऐकत बसलो होतो. बैठकीतले काम आटोपून दादाही वरती आले. शॉर्टवेव्ह मुळे खुपदा व्यत्यय येत होता. त्यात इंग्रजी कॉमेंट्री सुरू झाली की मला फार राग यायचा! अशावेळी काय झाले ते दादांकडून कळायचे.
श्रीकांत आऊट होवून परतला आणि नंतर गळती सुरू झाली. कसेबसे १८३ रन झाले! आम्ही उदास झालो होतो. त्यांच्या लंच टाईममध्ये आम्ही डिनर आटोपून परत वरती येवून बसलो. लंचनंतर वेस्टइंडिज खेळायला उतरला आणि लाईट गेले! अंधारात ट्रांझिस्टर शोधून काढला. बाहेर सज्जात (गॅलरीत) बबर्याने गाद्या टाकून ठेवल्या होत्या. त्यावर बसून ट्रांझिस्टर ��ुरू केला. तोवर त्यांचे दोन आऊट झाले होते, पण विव्ह रिचर्डस मात्र ठोकत होता.
‘रिचर्ड्स आऊट होतो का नाही रे..’ दादांनी मला विचारले.
‘अॅ हॅ, तो खूप तगडा आहे. काय करतो कुणास ठाऊक!’ मनातून तो लवकर आऊट व्हावा असे वाटत असले तरी मी मोघम उत्तर दिले. आऊट होतो म्हणावं अन नाही झाला तर काय घ्या! असं प्रत्येकवेळी दादा विचारायचे आणि मी असेच मोघम उत्तर द्यायचो. मोघम उत्तर दिले तरच मनातले घडते अशी माझी (अंध)श्रद्धा होती!
...आणि तो क्षण आला! ‘गेंद आसमान छूती हुयी बाँड्री लाईन की तरफ जा रही है, उसके पिछे कपीलदेव दौड रहे है, अब देखना है वो ये कॅच पकड पाते है या नही..... और... और...’ असे कॉमेंट्रेटर म्हणाला अन नुसता प्रेक्षकांच्या ओरडण्याचा गोंधळाचा आवाज येवू लागला. माझी छाती धडधड करू लागली. नेमके काय झाले काहीच कळेना. जवळजवळ दोन तीन मिनिटानंतर ‘ये गजब हो गया! मेरी जिंदगी मे पहली बार मैंने ये देखा है. कोई खिलाडी बीस तीस गज पिछे दौडते हुये इतनी महत्वपूर्ण कॅच पकड लेता है ये दृश्य विलोभनिय है.....’ हे वाक्य ऐकून मी तर उड्याच मारायला लागलो. दादाही तक्क्याला टेकून सरसावून बसले. खुशीत त्यांनी पानपुडा उघडला. तंबाखू हातावर चोळून मस्तपैकी फक्की मारली. मला लक्षात आले की जवळपास तास दिड तासापासून त्यांनी पानपुड्याला हात लावला नव्हता!
एकदाचा रिचर्डस आउट झाला अन त्यांचे एकेक विकेट पडायला लागले. मोहिंदर अमरनाथने तर कमालच केली होती. अन पाहता पाहता भारत जिंकला! वेस्टइंडीजची हॅटट्रिक चुकली आणि त्यांची मिजासही उतरली. मैदानावरचा गोंधळ, प्रेक्षकांचा आवाज, लॉर्डसच्या गॅलरीत कपीलदेवने वर्ल्डकप हातात घेवून उंचावला...हे सारे कॉमेंट्रेटर सांगत होते. कल्पनेनेच सारे दृश्य आमच्या डोळ्यात साठत होते.
आनंदाने मी तर नाचतच सुटलो होतो. क्रिकेटमध्ये काहीतरी झाले आहे अन भारत जिंकला आहे हे आईला लक्षात आले होते. रात्रीचे साडेआकरा वाजून गेले होते तरी खाली जाऊन ती गरम गरम मसाला दूध घेऊन वरती आली. ते वाफाळलेले दुध पित पित डोळ्यासमोर लॉर्डसचे मैदान आणत रात्री खूप उशीरा केंव्हातरी डोळा लागला...
तो आनंदाचा क्षण, ते रोमांच, वाडा, गल्ली, रेडिओची माडी, सज्जा, फिलिप्सचा रेडिओ, छोटा ट्रांझिस्टर, दूर कुठेतरी वाजलेले फटाके, गरम मसाला दुध...हे सारे चित्र आज या सिनेमामुळे ३९ वर्षानंतर डोळ्यासमोर जसेच्या तसे अगदी लख्ख उभे राहिले, अन अंगात उगाच एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटले...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
पिपाणी...
सुशीला आज सकाळी रोजच्यापेक्षा लवकर उठली. बकरीला चारा पाणी दिले, सडा रांगोळी केली अन आंघोळ करून लालीला उठवून तयार केले. तीन वर्षाची ललिता, तिला लाडाने ते लाली म्हणायचे, उत्साहाने तयार झाली. कालच सुशीलाने मालकिनीने दिलेला एक जुना फ्रॉक लालीच्या मापात करून हाताने शिवला होता. घडी करून डोक्याखाली ठेवला होता. नवा करकरित दिसत होता. लालीने तो फ्रॉक घातला अन आनंदाने उड्या मारू लागली. रोज अंगावर असणारा कळकट झगा जाऊन नवा फ्रॉक आल्यामुळे ती खुश झाली होती. सुशीलानेसुद्धा कमीत कमी ठिगळ असलेली साडी नेसली. बबरुचा शर्ट पँट धुऊन ठेवला होता, तो त्याने घातला. महिन्याभराची घाण त्यातून साफ झाली होती.
सुशीलाने कालची भाकर बकरीच्या दुधात कुस्करून लालीला खाऊ घातली. तिने अन बबरूनेही अर्धी अर्धी भाकरी मिर्चीसोबत खाल्ली. सर्व आवरून खोपटीला कुडाचे दार बांधून सुशीला शेजारी गेली. ‘मालनबी, जाऊन येताव बिरूदेवाला. जरा बकरीकडे लक्ष राहू द्या.’ बाहेरूनच तिने आवाज दिला. ‘हो हो, जाव जाव, मी हाय, ये सांजच्याला.’ मालनबीने आतूनच प्रतिसाद दिला.
लगबगीने ते तिघे बिरूदेवाच्या वाटेला लागले. वर्षातून एकदा तिथे जत्रा भरायची. पाळणे, शेवचिवड्याची दुकाने, खेळण्याची दुकाने, डोंबार्याचे खेळ असे बरेच काही पहायचे आकर्षण असायचे. पण सुशीला अन बबरूला सर्वात जास्त आकर्षण असायचे ते भंडार्याचे. भरपेट खायला मिळायचे अन बुंदीचे लाडू, गव्हाची खीरही असायची.
चार किलोमिटर चालून ते तिथे पोहोचले. मंदिरात जाण्यासाठी मोठी रांग होती. काही वेळाने दर्शन झाले. देवाची हळद कपाळाला लावून धन्य होवून ते बाहेर पडले. सकाळचे दहा वाजून गेले होते. अजून भंडार्याला सुरूवात झाली नव्हती. बबरु अन सुशीलाने लालीला जत्रेत नेले. मोठा पाळणा पाहून लाली टाळ्या पिटू लागली. गोल फिरणारे घोडे, लाकडी विहिरीत फिरणारी मोटरसायकल, उड्या मारायच्या हवेच्या गाद्या सर्वकाही बाहेरून पहात ते फिरू लागले.
छोट्या छोट्या हॉटेल्समधून शेवचिवड्याचा खमंग वास येत होता. पेढ्याने भरलेली ताटे सजली होती. बबरूने खिसा तपासला. एक दोन रुपये चिल्लर होती खिशात. त्याने सुशीलाकडे पाहिले. तिने केविलवाण्या चेहर्याने मान हलवली अन दोघांन�� एकाच वेळी आवंढा गिळला. लालीला अजून काही समजत नव्हते, पण ती प्रत्येक ठिकाणी त्यांना ओढून ओढून नेत होती. पुढे पाहू पुढे पाहू असे म्हणत ते तिला पुढचे आमिष दाखवत फिरू लागले. डोळ्याच्या कोपर्यातून लक्ष भंडारखान्याकडे लागले होते. अजून तिथे हालचाल सुरू झाली नव्हती.
तितक्यात एक फुगे, पिपाणी, खेळणी विकणारा त्यांच्या पुढ्यात आला. एका मोठ्या बांबूला दोन चार आडवे बांबू बांधून, त्या प्रत्येक बांबूवर काही ना काही खेळण्या लटकवलेल्या होत्या. त्या चालत्या बोलत्या दुकानात लहान मुलांना आवडणार्या असंख्य वस्तू होत्या. बांबू खांद्याला टेकवून तो माणूस एकेक वस्तू दाखवू लागला. त्याने डोक्यावर जोकरसारखी टोपी घातली होती. मधूनच तो त्या टोपीला असलेला गोंडा मान हालवत फिरवायचा. ते पाहुन लहान मुले खुशीने टाळ्या वाजवत होती. त्याने एक पिपाणी काढली अन वाजवू लागला. वेगवेगळ्या रंगाच्या त्या पिपाण्या मुलांना आकर्षित करीत होत्या. मुले आईवडलांकडे हट्ट करत पिपाणी घ्यायला लावत होते. पिपाणी हातात पडली की मुलांचे पुंईं पुंईं वाजवणे सुरू झाले. सगळीकडे पिपाणीचाच आवाज घुमू लागला.
हे सर्व पाहुन लाली हरखून गेली. इतका वेळ ती शांतपणे सर्व पहात होती. पुढे पाहू म्हणलं की पुढच्या ओढीने काहीच हट्ट करत नव्हती. पण या ���िपाणीने मात्र तिचा संयम तोडला. ती रडू लागली. सारख़े तिकडे ओढत अंग टाकू लागली. नवीन काही पहायला तयार होईना. ‘मला पिपाणी पायजे’ तिचा एकच रट्टा सुरू झाला. काही केल्या ती ऐकेना. कडेवर बसेना, खाली सोडले की जमिनीवर लोळू लागली, सारखी पिपाणीवाल्याकडे पळू लागली. दुसरी कुठली वस्तु किंवा खेळ पहायलाही तयार होईना.
‘आई, लेकरू एवढं रडतंय घेऊन द्या की पिपाणी,’ ‘काय बाई, लोकं. दारू पेतील पण पोरांना काय नाय देणार’ असे टोमणे काही म्हातार्या जातायेता मारू लागल्या. त्याकडे दुर्लक्ष करत गर्दीतून वाट काढत सुशीला अन बबरू एका झाडाखाली सावलीत बसले. लाली अजूनही अकांड तांडव करत होती. तिला काय अन कसे समजवायचे दोघांनाही समजत नव्हते. मालनबी कालच म्हणाली होती, दहावीस रुपये पाहिजे तर देते म्हणून, पण जत्रेत भंडारा आहे कशाला पैसे लागतात म्हणून तिने पैसे घेतले नाहीत. उसने घेतलेले परत करण्याची तिला जास्त भीती होती. एकवेळ जेऊन खाऊन सालाना दहाहजार उपये बबरूचा पगार होता. धुणे भांडी करून सुशीलाला तिनशे रुपये महिना मिळायचे. किराणा कसाबसा भागायचा, मग उसने पैसे परत कसे करायचे, या विचाराने ते दोघेही कधी त्या नादाला लागले नाहीत.
पूर्वी बबरूला प्यायची सवय होती. पण सुशीलाने लालीच्या जन्मानंतर म्ह��ोबासमोर नेवून त्याला शपथ घातली होती. ‘आपण कसे बी जगू पर पोरीला शिकवू, मोठे करू’ हे तिने बबरूला समजावून सांगितले होते. म्हसोबाच्या भीतीने तीन वर्ष झाली बबरू दारूच्या वाटेला गेला नव्हता. माळकरीच झाला होता तो.
पण स्वत:ला आवरू शकतो, लहान लेकरांना कसे आवरणार हा प्रश्न दोघांना पडला होता. काही केल्या लाली रडायचे थांबत नव्हती. तितक्यात भंडारखान्याकडे हालचाल दिसली. दोघे लगबगीने तिकडे गेले. पहिल्या पंगतीत त्यांना जागा मिळाली. भुकेने जीव कासावीस झाला होता. वर्षभराची आठवण पोटात साठवायची होती. पत्रावळीवर गव्हाची खीर पडली तसे चारी बोटाने ते ती ओरपायला लागले. पोळ्या, वांग्याची भाजी, बुंदीचे लाडू, वरण भात असे यथेच्छ जेवण झाले. लालीला सुशीलाने बोटाने खीर चाटवली. पोळीचे तुकडे करून कुस्करून खाऊ घातले. पोट तुडुंब भरेपर्यंत तिघेही जेवले. निघतांना आवर्जुन प्रसाद बांधून घेतला.
जेवतांना लाली शांत होती. पण जसे ते बाहेर आले, तसे तिने ‘पिपाणी...’ म्हणत भोकाड पसरला. कसेबसे तिला आवरत बिरुदेवाला बाहेरूनच नमस्कार करून ते घरच्या वाटेला लागले. वाटेत सुशीलाच्या मनात कालवाकालव चालली होती. भंडारा खाल्ला, देवाचे दर्शन घेतले, तृप्त झालो पण लेकराला साधी पिपाणी घेवून देवू शकलो नाही याची तिला खंत वाटत होती.
खिन्न मनानेच ती घराकडे आली. घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. मालनबीला थोडा प्रसाद नेवून दिला. बकरीला चारापाणी करून लालीला घेवून सुशीला मालकीनीच्या घराकडे गेली. बबरू शेताकडे गेला. धुणीभांडी करून घरी येईपर्यंत रात्र झाली होती. चिमणीची वात मोठी करून तिने दिवा लावला. भरपेट जेवण झाल्यामुळे काही खायची इच्छा नव्हती. लालीला प्रसाद खाऊ घातला अन झोपवले.
झोपेतही लाली हुंदके देत होती. मधुनच पिपाणी पिपाणी ओरडत होती. तिच्या मनातून पिपाणी काही जात नव्हती. रात्रीचे दहा वाजून गेले होते तरी झोपेत ती बरळत होती. गोधडीवर तिच्या बाजूला पडून सुशीला तिला थोपटत झोपवायचा प्रयत्न करत होती. पण थोड्या थोड्या अंतराने लाली झोपेतच रडत होती.
काही वेळाने ती शांत झोपली. तिच्या निरागस चेहर्याकडे पाहुन सुशीलाच्या डोळ्यात पाणी आले. तिने काही विचार केला अन लालीच्या अंगावर साडी पांघरून हळूच ती खोपटीच्या बाहेर आली. कुडाचे दार लावून घेतले अन लगबगीने चालत रानाच्या वाटेला लागली. म्हसोबा पिंपळाच्या झाडाखाली शेंदुर फासून शांत बसला होता. एरवी दिवसाही तिथून जायला सर्वजण घाबरायचे, पण सुशीलाला आज कसली हिम्मत आली होती कुणास ठाऊक! ती त्या झाडावर चढली. पिंपळाची पाने तोडली अन ते घेवून धावतच घरी आली.
एक मोठे पान घेवून त्याची सुरळी तयार केली. चिपाडाची काडी घेवून तिच्या सालीचे बारिक ��ुकडे करून त्या सुरळीला टोचले. एका बाजूचे टोक निमुळते केले, हवा जाण्यासाठी त्यात फट ठेवली. अशा खूप सार्या सुरळ्या करून ठेवल्या अन ती समाधानाने झोपली.
सकाळी उठल्यावर रोजच्याप्रमाणे आवरले. बबरु न्याहारीसाठी घरी आला. सुशीलाने डब्यातून एक सुरळी काढली अन ‘पि..... ‘ करून वाजवली. तो आवाज ऐकून लाली पटकन उठली. सुशीलाच्या तोंडात पिपाणी पाहून ती इतकी आनंदली की जोरजोरात नाचू लागली. सुशीलाने पिपाणी लालीला दिली. तिने लगेच तोंडात घालून ती वाजवली. पिपाणी वाजवत पळत मालनबीच्या घराकडे पळाली. सगळ्या वस्तीत फिरून आली. घरी परत आली तेव्हा तिच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वहात होता.
लालीच्या समाधानी चेहर्याकडे पाहुन सुशीलाचे डोळे भरून आले. एक सोडून अनेक पिपाण्या ओंजळीत घेवून नाचणार्या लालीला पाहुन जगात आपल्या एवढे श्रीमंत कुणीच नाही असा भाव सुशीलाच्या चेहर्यावर तरळत होता...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
मो. ९४२२२७८३१०.
0 notes
Text
अदृश्य हात...
विनयने घरी आल्या आल्या जाहीर केले की उद्या सकाळी आपल्याला आपल्या गावी जायचे आहे. ‘उद्या शनिवार, सकाळी लवकर निघू म्हणजे संध्याकाळपर्यंत आपण तिथे पोहोचू. रविवारी मुक्काम करु आणि सोमवारी परत येवू. मी सोमवारची रजा टाकली आले. आशू तू पण शाळेत रजेचा अर्ज पाठवून दे मैत्रिणीसोबत.’ बायकोकडे वळत त्याने सुचना केली.
तीन वर्षाची पियू आणि सहा वर्षाचा जय, काही कळो वा न कळो आनंदाने नाचू लागले. जयने गावाबद्दल थोडेफार ऐकले होते. त्याच्या बालमनाप्रमाणे त्याने गावातल्या वातावरणाचे आराखडे मनात बांधले होते. पियूला काही समजायचे कारण नव्हते. हे दोघेही जन्मले तेव्हापासून कधीच वडलांच्या गावी गेले नव्हते. म्हणूनच त्या दोघांना खूप आनंद झाला होता. आशूला मात्र खूप आश्चर्य वाटले. लग्नानंतर केवळ एकदाच विनयने तिला गावी नेले होते. तेव्हापासून गेली दहा वर्ष ना विनय कधी गावी गेला ना बायका मुलांना कधी नेले.
आशूने पटकन रजेचा अर्ज लिहिला अन शेजारी राहणार्या मैत्रिणीकडे नेवून दिला. घरी येवून बॅगा भरायला घेतल्या. कपडे भरता भरता तिला तो दिवस आठवला. लग्न झाले तेव्हा पहिल्यांदा ती विनयच्या गावी गेली त्यावेळी घडलेले सर्व चित्र तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. सावत्र सासूने केलेला आक्रस्ताळेपणा, आदळआपट, हतबल होवून हाताची घडी घालून बसलेले बा��ा हे आठवून तिच्या अंगावर काटाच उभा राहिला. त्यावेळी रात्रीतून ते दोघे घराबाहेर पडले होते. कुठे जायला मार्गच नव्हता. बसस्टँडवर रात्र काढली होती. विनय हतबल होवून तिला ‘सॉरी...’ एवढेच म्हणाला अन तिच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडला होता. हे सर्व तिच्या डोळ्यासमोर ताजेतवाने होवून प्रकटले होते. तिला आश्चर्य याचेच वाटत होते की एवढ्या वर्षानंतर अचानक विनयला गावी जायची इच्छा कशी काय झाली असावी? पण काहीच विचारायचे नाही हे ठरवून तिने बॅगा भरल्या. जेवणे आटोपून सर्वजण लवकरच झोपले.
सकाळी पाचचा गजर वाजला. विनय आधीच उठला होता. त्याला रात्री झोपच लागली नाही. गावी जायचे एक्साइटमेंट होते. आशूने चहा ठेवला. चहा घेवून दोघांनी आंघोळी आटोपल्या. मुलांना उठवून त्यांचे आवरेपर्यंत सहा वाजून गेले होते. बरोबर सव्वासहाला त्यांची गाडी हमरस्त्यावरून गावाच्या दिशेने धावायला लागली.
गाडीच्या गतीबरोबर आशू परत त्या दिवसाकडे वळली. विनय आठ वर्षाचा असतांना त्याची आई वारली होती. दोन वर्षांनंतर बाबांनी दुसरे लग्न केले. विनय बारा वर्षाचा असतांना त्याच्या सावत्र भावाचा जन्म झाला. अन तिथून त्याची परवड सुरू झाली. सावत्र आईचा प्रचंड जाच सहन करत कसेबसे तो ग्रॅज्युएट झाला अन पुण्याला एका बँकेत नोकरीला लागला. गाव सुटले अन घरही सुटले. कधीतरी तो बाबांना भेटायला जायचा, पण सावत्र आईने त्याला कधीच मुक्काम करू दिला नाही. हळूहळू त्याचे जाणे कमी झाले. बँकेतल्या मित्राची शिक्षिका असलेली बहीण आशू अन विनयची मने जुळली. मित्रांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले. मन परिवर्तन होईल या आशेने तो अन आशू गावी गेले, पण प्रचंड मनस्ताप घेवून परतले. तो दिवस अन आजचा दिवस, दहा वर्षांनंतर परत ते तिकडे निघाले होते.
एकेक गाव पार करत, त्या प्रत्येक गावाबद्दल काही ना काही माहिती देत विनय उत्साहाने गाडी चालवत होता. कुठे काय खायला मिळते, कुठल्या गावाचे काय वैशिष्ट्य आहे, कुठे देवस्थान आहे अशी तो माहिती देत होता. आशूने हे सर्व आधी ऐकले होतेच, पण नव्याने ऐकत असल्यासारखी ती प्रतिक्रिया देत होती. विनयच्या उत्साहात तिला विघ्न आणायचा नव्हता.
दुपारचे जेवण एका ढाब्यावर करून पुढचा प्रवास सुरू झाला. मुलांसाठी चिप्स, कुरकुरे असे खाद्य घेतल्यामुळे मुले खुश होती. बहुतेक वेळ ती झोपायचीच. हळूहळू गाव जवळ येत होते. अंधार पडायला आला होता. चारशे किलोमिटरचे अंतर कापायला जेवणे खाणे करत आठ दहा तास लागतात हे माहित होते. पण आज रस्ता कटता कटत नव्हता. बारा तास होत आले तरी गाव अजून सत्तर ऐंशी किलोमिटर दूर होते.
हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे अंधार लवकर पडला होता. जंगलाचा भा�� सुरू झाला अन वस्ती विरळ झाली होती. क्वचित एखादी गाडी समोरून दिसायची किंवा ओव्हरटेक करून जायची. शेतातील कामे आटोपून घरी जाणारी एखादी बैलगाडी जंगलातील रस्त्याला वळून गायब व्हायची. डोक्यावर गवताचे गठ्ठे घेवून एका मागे एक ओळीने तालबद्ध चालणार्या बायकांची रांग मध्येच कुठेतरी दिसायची. एवढी सजीव हालचाल सोडली तर बाकी सर्वत्र काळोख पसरला होता. काही वेळाने हे दिसणेही बंद झाले अन त्या अंधार्या वाटेवर फक्त विनयची गाडीच धावत होती.
गावापासून सात आठ किलोमिटर आधी मध्येच एका ठिकाणी रस्त्याचे काम चालले असल्यामुळे वळण रस्ता लागला. विनयने अगदी हळूहळू चालवत गाडी त्या रस्त्यावर घातली. बराच मोठा वळण रस्ता दिसत होता. त्याला थोडी धाकधुक ही वाटत होती की या सुनसान रस्त्याचा फायदा घेवून लुटारू आले तर काय करायचे! आशूही चिंताग्रस्त झाली होती. मुले मागच्या सीटवर शांतपणे झोपली होती. कुठेच मनुष्य वस्ती दिसत नव्हती. तेवढ्यात विनयला जाणवले की गाडी एका बाजूला ओढत आहे. जी भीती होती तेच घडले होते. गाडीचे पुढचे चाक पंक्चर झाले होते!
स्टेपनी काढून झटपट चाक बदलायची तो तयारी करू लागला. जॅक चढता चढेना. सटकून खाली यायचा. त्याची धडधड वाढली. काय करावे सुचेना. एखादी बस आली तर आशू अन मुलांना पाठवावे असे त्याला वाटत होते. पण कुठेही कसलाही मागमूस दिसत नव्हता. जॅक चढवण्यासाठी त्याचा आटपिटा चालला होता. गाडी आतून लॉक करून त्याने आशू अन मुलांना आतच बसायला सांगितले.
प्रयत्न करून तो थकला. थंडीतही घामेघुम झाला होता. कुणाची तरी मदत मिळणे आवश्यक होते. पण सर्वत्र अंधार अन रातकिड्यांची किरकिर सोडली तर बाकी काहीच नव्हते. तितक्यात त्याला थोडेसे दूर जंगलातून एक माणसाची आकृती बाहेर पडून पुढे चालत असलेली दिसली. बुडत्याला काडीचा आधार मिळाला. त्याने आवाज दिला, पण ती आकृती चालतच राहिली. तो त्या आकृतीच्या मागे धावला. जोरात धावूनही तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नव्हता. त्याला आश्चर्ययुक्त भीती वाटली. पण दुसरा कुठलाचा आधार नसल्यामुळे त्या माणसाला गाठणे आवश्यक होते. तो आणखी जोरात धावला. एवढ्या संथगतीने चालणार्या त्या माणसाचे अन त्याचे अंतर कसे काय काही कमी होत नाही याचे त्याला खूप आश्चर्य वाटत होते! हाकेच्या अंतरावर असूनही तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता.
तेवढ्यात जंगलातील पाऊलवाटेवरून एका स्त्रीचा आकार दिसला. ती रस्त्यावर येत त्या माणसाकडे पहात हातवारे करत होती. आवाज कसलाच येत नव्हता, पण जोरजोराने ओरडत असल्याप्रमाणे ती हावभाव करत होती. विनयला वाटले या बाईला विचारावे की जवळ कुठे वस्ती आहे का. पण ती बाई किती वेळापासून चालत येत ��ोती तरी रस्त्यावर येत नव्हती. ते दोघेही एकदम सावकाश चालत असूनही विनय अन त्यांच्यातले अंतर कमीच होत नव्हते! पळून पळून तो दमला. माघारी वळावे असे त्याला वाटले, पण का कुणास ठाऊक तो त्यांच्याकडेच चुंबकाप्रमाणे ओढला जाऊ लागला. आशू अन मुलांची काळजी त्याच्या मनात वाढत होती, तरी तो पुढेच पळत राहिला. जीवाच्या अकांताने तो धावत होता, पण त्यांना गाठू शकत नव्हता!
तितक्यात त्याला खांद्यावर कुणीतरी थोपटल्याचा भास झाला. अतिशय घाबरलेला अन घामाने थबथबलेला विनय झटकन मागे वळला. मागे कुणीच नव्हते! मग खांद्यावर हात कुणी ठेवला? आपण कुठे आलो आहोत? आशू, मुले, गाडी कुठे आहे? अरे हो...आपण त्या आकृतींच्या मागे पळत खूप दूर आलो! खांदा थोपटणार्या अदृश्य हाताचा विचार करत मागे न वळता तो धावत गाडीकडे आला.
गाडीचे फॉग लँप चालू होते. दारे बंदच होती. कुणाला काही जाणवू न देता मोबाईलच्या बॅटरीच्या सहाय्याने तो जॅक चढवू लागला. अन काय आश्चर्य! जॅक चढला अन दोन मिनिटात त्याने चाक बदलले. जॅक चढवतांनाच आशू खाली उतरली.
‘काही मदत करू का?’ तिने विचारले.
‘किती वेळ झाला इथे थांबून आपल्याला?’ विनयने विचारले.
‘पाचच मिनिटे तर झाली. चाक बसवले ना? चल मी जॅक आत ठेवते तू चाक ठेव. किती घामाने थबथबलायस.’ असे म्हणत त्याला नॅपकिन देत तिने जॅक डिक्कीत ठेवले.
‘खरंच सांगतीयस पाच मिनिटे झाली? अगं मी तर किती वेळापासून तिकडे धावत.....’ त्याने पटकन जीभ आवरली. आशूला गाडीत झोप लागली असेल म्हणून तिला काही माहित नसावे. या भयानक ठिकाणी तसला अनुभव सांगून घाबरवून सोडू नये म्हणून त्याने शांतपणे स्टेपनी ठेवली अन गाडी स्टार्ट केली. घड्याळात वेळ पाहिली तर खरेच पाच सात मिनिटेच झाली होती! मग इतक्यावेळच्या धावपळीचे काय? त्याला काहीच कळेना!
काही वेळातच गाडी गावात आली. रात्रीचे नऊ वाजले होते. घरासमोर गाडी थांबवून त्याने दार वाजवले. बाबांनीच दार उघडले. मुलगा, सून अन नातवंडांना पाहून त्यांना खूप आनंद झाला. हातपाय धुऊन सर्वजण ओसरीवर बसले. घरात बाकी कुणीच दिसत नव्हते. बिचकतच विनयने त्याबद्दल विचारले.
‘दोन वर्षांपूर्वी ती क्षयरोगाने वारली. दारूच्या नादाला लागून तुझा सावत्र भाऊ मागच्या वर्षी विहिरीत पडून वारला. मी एकटाच उरलो.’ क्षीण आवाजात बाबा म्हणाले.
आशूने स्वैपाकघर ताब्यात घेतले. पिठलं भाकरीचे जेवण तयार करून सर्वांना जेवायला वाढले. मुलांना खायला घालून ती एका त्यातल्या त्यात बर्या असलेल्या खोलीत झोपायला गेली. ओसरीवर बाबांशी बोलत विनय म्हणाला ‘दोन दिवसांपूर्वी आई स्वप्नात आली होती. ती म्हणाली बाबा खूप थकले आहेत, एकदा भेटायला जा. लग��च ठरवले अन आज इथे आलो.’
‘खूप जीव लावत होती तुझी आई. कुठून बुद्धी झाली अन दुसरे लग्न केले असे वाटते आता. पश्चाताप होतोय. पण विनाशकाली विपरित बुद्धीपुढे कोण काय करणार. तिने तुला त्रास दिला. एका अर्थाने तो मलाच होता. तिच्या करणीचे फळ तिला मिळाले. इस्टेटीचा वाटा तुला मिळू नये, तिच्या मुलालाच मिळावा यासाठी तिने वाईट कर्म केले. पण नियतीने तिला धडा शिकवला.’ बाबांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
बोलता बोलता विनयने रस्त्यात गाडी पंक्चर झाल्याचे सांगितले. ज्या जागी पंक्चर झाली होती ते ऐकून बाबा म्हणाले ‘हं....म्हणजे त्या माय लेकांनी तुला रोखायचा प्रयत्न करून पाहिलेला दिसतोय. तिथेच जवळपासच्या एका विहिरीत पडून तिचा मुलगा मेला. पण तुझ्या खांद्यावर तुझ्या आईचा हात आहे हे तिला चांगले माहित आहे. म्हणून ती काही करू शकली नाही. तुझी आई पुण्यात्मा आहे. ती सदैव आपल्यासोबत आहे.’ आईच्या फोटोकडे पहात बाबा स्वगत बोलल्याप्रमाणे बोलले.
विनयने सविस्तर काही सांगितलेले नसतांनाही बाबांच्या बोलण्यातून घडलेल्या घटनेचे रहस्य उलगडले होते. त्याने उठून आईच्या फोटोला मनोभावे वंदन केले अन झोपायला गेला. झोप लागेपर्यंत त्याला ते चित्र डोळ्यासमोर दिसत होते. त्या दोन आकृत्या, खांद्यावरचा हात, जॅक सटकणे, पाच मिनिटे, खरेच ते घडले होते का भ्रम होता? सारे गुढच होते! खरेच मला सावरणारी माझी आईच असेल का? हो नक्कीच! बाबा म्हणतात ते खरेच आहे. आईचा अदृश्य आधार माझ्यासोबत आहे! या विचारात गढून विनय झोपला. थकल्यामुळे त्याला लगेच गाढ झोप लागली. झोपतांना मनात त्याने काही ठरवले होते, ते कार्य त्याला पार पाडायचे होते.
दुसर्या दिवशी सकाळीच तो बाबांना घेऊन गावाबाहेर असलेल्या सिंधूताईंच्या आश्रमात गेला. शेती अन वाडा आश्रमाला आईच्या स्मृतीप्रित्यर्थ दान करण्याची इच्छा सांगून पुढील कारवाई करण्याची विनंती केली. दुपारी जेवणे आटोपून सहकुटुंब बाबांसहीत सर्वजण पुण्याकडे निघाले. पंक्चर झालेल्या ठिकाणी खिडकीतून बाहेर पहात बाबांनी छद्मीपणाने हात जोडल्याचे त्याने ओझरते पाहिले.
गाडी वळण रस्त्यावरून बाहेर काढून तो सुसाट निघाला, आता त्याला कसलीच भीती वाटत नव्हती. बाबा तर सोबत होतेच, पण आईचा अदृश्य हातही त्याच्या खांद्यावर होता...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
९४२२२७८३१०.
0 notes
Text
बबलू...
एकदा आम्ही दोन मित्रांनी कंस्ट्रक्शन मशीनरीचे एक्झिबिशन पहायला दिल्लीला जायचे ठरवले. ऑन लाईन फ्री रजिस्ट्रेशन केले आणि ठरलेल्या दिवशी दिल्लीला जाण्यास निघालो. जायचे तिकीट RAC होते पण यायचे तिकीट वेटींग लिस्टवर होते. आम्ही निघालो त्याच दिवशी आयत्यावेळी अजून एक मित्र आमच्यासोबत यायला तयार झाला. त्याचे साधे तिकीट काढले आणि एकत्र बसूनच सचखंड एक्स्प्रेसमध्ये मजेत आमचा प्रवास सुरू झाला. आमच्या कम्पार्टमेंडमध्ये एक सरदार जोडपे होते. युगांडात त्यांचा साऊंड सिस्टीमचा बिझिनेस होता. नांदेडला गुरूद्वाराचे दर्शन घेऊन ते परत दिल्ली मार्गे युगांडाला जाणार होते. गेली चाळीस वर्ष ते तिथेच रहात होते. तिथे कसे गेले, कसे राहिले, कसा व्यवसाय सुरू केला हे त्यांनी सविस्तर सांगितले. त्यामुळे आमचा वेळ छान गेला. आता मुले आणि सुना त्याच व्यवसायात असल्यामुळे त्यांचा ताण कमी झाला होता. वर्षातून एकदा भारतात येवून वेगवेगळ्या गुरूद्वाराला भेट देतो असे त्यांनी सांगितले. भारतीय लोकं कुठं कुठं जावून व्यवसाय करतात, काय काय करतात हे देशाटन केल्याशिवाय समजत नाही हेच खरे!
गुरूद्वाराची चर्चा चालू असतांनाच खंडवा स्टेशनवर ‘लंगर लंगर’ असा बाहेर प्लॅटफॉर्मवर आवाज आला. अनेक सरदारजी लंगरचे साहित्य घेवून बाहेर आवाज देत होते. आम्ही खाली उतरून त्यांच्याकडून हातावर दोन पोळ्या घेतल्या. भाजी पातळ होती म्हणून कागदी ग्लास विकत घेवून त्यात घेतली. खूप छान चवीची भाजी होती. नुसती भाजी सूपसारखी दोनदा घेवून आम्ही खाल्ली. अगदी प्रेमाने ते सर्वांना आग्रह करून लंगर देत होते. खरंच, जगभरात तुलनेने कमी लोकसंख्या असलेली ही मंडळी अन्नदानाचे किती मोठे पुण्याचे काम करत आहे, तेही शेकडो वर्षांपांसून! कुठेही गाजावाजा न करता किंवा कुणालाही दान न मागता!
लंगरच्या दोन पोळ्यामध्येच पोट भरले. पाण्याची ट्रॉलीसुद्धा त्यांच्यासोबत प्लॅफॉर्मवर फिरत होती. तेच पाणी पिऊन मनोमन त्यांचे आभार मानले. आमच्या सोबतच्या सरदार कुटुंबांनीही लंगर घेतले. खायच्या आधी डोळे मिटून दोघांनी गुरूवाणी म्हटली अन नंतरच ते जेवले. योगायोगाने त्याचवेळी टिसीने आम्हाला तीन बर्थ देवू केले. औरंगाबाद सोडल्यापासून चाललेल्या आमच्या प्रयत्नाला यश मिळाले. परत येतांनाही असेच काही घडो अशी प्रार्थना करून खूश होवून ‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल’ असे म्हणून आम्ही बर्थवर निर्धास्तपणे झोपून गेलो.
दुसर्या दिवशी दुपारी दिड वाजता दिल्लीला पोहोचलो. थंडीचे दिवस होते, पण दुपारची वेळ असल्यामुळे वातावरण रम्य होते. पहाडगंजला एका लॉजमध्ये रूम केली आणि स्नान आटोपून बाहेर पडलो. बाहेरच छोट्या छोट्या गल्ल्यातून छोटी छोटी हॉटेल्स होती. हॉटेल बाहेर थांबलेला माणूस येणार्या जाणार्याला ‘आईये साब, गरमागरम खाना खाईये’ असा आग्रह करत होता. एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण केले. जेवण मस्त तर होतेच पण खूपच स्वस्तही होते. दोन तीन दिवस तिथेच जेवायचे आम्ही ठरवले.
रात्री मात्र कडाक्याची थंडी जाणवली. रजया पांघरून आम्ही लवकरच झोपलो. दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून एक्झिबशनच्या ठिकाणाकडे निघालो. नोएडा भागात एक्झिबिशन होते. मेट्रोने एका ठिकाणी उतरून तिथून बसने त्या ठिकाणी गेलो. पोहोचायला दोन तास लागले. एंट्री गेटवर आमचे रजिस्ट्रेशन दाखवून पास घेतले. पण तिसरा मित्र अचानक सोबत आल्यामुळे ऑनलाईन फ्री पास घेतलेले नव्हते. एंट्री तिकीट तर रु. ५००/- होते. एवढे कशाला खर्च करायचे असा विचार केला. आम्ही दोघेजण आत गेलो. आत गेल्यावर शक्कल लढवली. माझा पास खिशात ठेवून दुसरा मित्र दरबानची नजर चुकवून हळूच बाहेर गेला. थोडे दूर जावून तो पास तिसर्या मित्राला दिला. दोघांनी पास गळ्यात अडकवले आणि आरामात आत आले. प्रदर्शन पहात असतांना पुढे एकदोन ठिकाणी गार्डने आम्हाला हटकले, पण पास चहा स्टॉलवर विसरले असे सांगून वेळ मारून नेली.
दिवसभर एक्झिबिशन पाहिले. जेवणही तिथेच केले. मोकळे वातावरण असल्यामुळे संध्याकाळी थंडी खूप जाणवत होती. तिथून बाहेर पडून परत बस, मेट्रो असे करत सात वाजता पहाडगंजला येवून हॉटेलवर आराम केला. जेवण अर्थातच त्या छोट्या गल्लीतच केले. जेवणानंतर हात उंच उचलून दुधाची धार मग्ग्यात सोडून तो फेसाळलेला दुधाचा ग्लास प्यायला देणार्या एका हलवायकडे गरम गरम मसाला दुध प्यायचा मनसोक्त आनंद घेतला. कडाक्याच्या थंडीत असे गरमागरम दूध प्यायला नशीब लागते हे मनोमन पटले.
सकाळी पुरानी दिल्लीतील हौजखास या होलसेल मार्केटला गेलो. तीन फुटाच्या भूलभुलैय्यासारख्या असंख्य गल्ल्या असलेला तो एक भला मोठा मार्केटचा भाग होता. दोन्ही बाजूला सात आठ मजली उंच इमारती अन मधून तीन फुटाची छोटी गल्ली. दोन्ही बाजूला अगदी आपल्या पान टपरी एवढ्याच साईजची दुकाने होती. हार्डवेअर, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, गिफ्ट आर्टिकल्स अशी वेगवेगळ्या प्रकारची असंख्य होलसेलची दुकाने होती. एवढ्या छोट्याशा जागेत देशभरातून व्यापारी माल घ्यायला येतात आणि इथे कारोडोचे व्यवहार होतात हे ऐकून आश्चर्य वाटले. दुकानात फक्त सँपल्स ठेवलेली होती. व्यवहार ठरला की हमाल त्यांच्या गोडाऊनमधून डोक्यावर माल घेवून यायचे. असे कितीतरी हमाल भले मोठे ओझे डोक्यावर घेवून त्या गल्लीत तरा तरा तालबद्ध चालतांना आम्ही पाहिले. एका हार्डवेअरच्या दुकानात टाईमपास म्हणून आम्ही साहित्याची चौकशी केली. त्या मालका��ा वाटले सकाळी सकाळी चांगले गिर्हाईक आले. पण आम्ही फुकाची चौकशी करत आहोत हे त्याला काही वेळातच लक्षात आले. त्याने अगदी बादशाही थाटात एक हात वर करून ‘तख्लियात’ असे म्हणत आम्हाला निरोप दिला. बरं तर बरं ‘अरे कोई है’ असे म्हणून दरबान बोलावला नाही. त्याचे हावभाव पाहून हसू दाबतच आम्ही तिथून बाहेर पडलो.
दिल्लीची थंडी काय असते याची प्रचिती येत होती. छोट्या गल्ल्यात उन यायचे काही कारण नव्हते. त्यामुळे गारठून गेलो होतो. भूक लागली होती म्हणून त्या बोळातच एका कचोरी समोशाच्या हॉटेलमध्ये तिथल्या पद्धतीप्रमाणे समोसा आणि साग खाल्ले. खूपच अप्रतिम चव होती त्याची. खाणे झाल्यावर अजून थंडी वाजू लागली. एका गल्लीतून चालत बर्याच वेळानंतर एका मोठ्या रस्त्यावर आलो. बारा वाजून गेले होते तरी उन कोवळेच वाटत होते. त्या कोवळ्या उन्हात आल्यावर बरे वाटले. समोरच जामा मश्जिद होती. जवळच असलेल्या पराठा गल्लीत गरम गरम पराठे खाल्ले, जिलेबी अन लस्सीचा आस्वाद घेतला. दिवसभर भटकून सायकल रिक्षाने पहाडगंजला आलो. रात्री रस्त्यावरच्या मार्केटमधून स्वेटर्स खरेदी केले. अतिशय कडाक्याचा गारठा जाणवत होता. त्यामुळे लवकर हॉटेलमध्ये जावून दोन रजया पांघरून झोपलो.
दुसर्या दिवशी परतीचा प्रवास होता. सकाळी उठून नवी दिल्ली स्टेशनवर जाऊन तिकीट कंफर्म झाले की नाही चेक केले. पण अजूनही ते वेटींग लिस्टमध्येच होते आणि कंफर्म व्हायची शक्यताही नव्हती. आमची घालमेल पाहून एकाने स्टेशनच्या बाजूला असलेल्या एजंटला भेटायला सांगितले. तिथेच आम्हाला बबलू भेटला. वेटींगचे तिकीट कंफर्म करणे हा बबलूचा व्यवसाय होता. त्याच्या छोट्या ऑफिसमध्ये एक पॅसेंजर बसला होता. त्याने आम्हाला सांगितले की या बबलूने माझे तिकीट कंफर्म करून दिले आहे. खूप चांगला एजंट आहे. बिनधास्त त्याच्याकडून काम करून घ्या. त्याचे ऐकून आम्हाला खात्री पटली.
बबलूने आम्हाला सचखंडचे तिकीट कॅन्सल करायला सांगितले आणि रात्री ८ च्या अमृतसर-मुंबई ट्रेनचे कंफर्म तिकीट देण्याचे आश्वासन दिले. एक हजार रुपये पर हेड त्याने वेगळा खर्च सांगितला. पैसे गेले तर गेले पण आरामात झोपून जाता येईल म्हणून खूश होवून आम्ही त्याला पैसे दिले. त्याने त्या गाडीचे साधे तिकिट आम्हाला दिले आणि सांगितले की संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तुम्हाला मोबाईलवर कंफर्मेशन कळवतो, काळजी करू नका. त्याने आम्हाला चहा पाजला. तोवर त्याच्याकडे अनेक प्रवासी आले होते म्हणून आम्ही आनंदानेच तिथून बाहेर पडलो.
आमच्याकडे वेळच वेळ होता. त्यामुळे करोलबाग, म्युनिसिपल मार्केट, राजीवगांधी पुतळा अशी ठिकाणे पहात वेळ घालवला. या दरम्यान बबलूला दोन तीनदा संपर्क साधून आठवण करून दिली. ‘फिकर ना करो, आपका तिकट कंफर्म हो जायेगा’ असे म्हणून त्याने आम्हाला आश्वस्त केले. संध्याकाळी लॉजवर जाऊन सामान पॅक केले. बिल देवून तिथून बाहेर पडलो.
एव्हाना सहा वाजून गेले होते. अजून बबलूचा मेसेज आला नव्हता. स्टेशनवर जाण्याच्या आधी त्याच्या ऑफिसमध्ये गेलो तर कुलुप! त्याला फोन लावला. नशीब, त्याने उचलला. ‘ऑफिस छे बजे बंद होता है, कोई बात नही, आपके बारेमे गाडी के टिटी को बोल दिया है. वो आपकी व्यवस्था कर देगा’ असे म्हणून त्याने टिटीचे नाव सांगितले. आता आमची थोडी धकधक सुरू झाली. काय खरं अन काय खोटं समजायला मार्ग नव्हता. बबलूवर संशय घ्यावा तर त्याच्या ऑफिसमध्ये कंफर्म तिकीट घेवून खुश झालेले प्रवासी आम्ही पाहिले होते. ते खरे होते की बनावटी अशी एक शंका मनात येवून गेली. अशा चिंतेतच स्टेशनवर आलो.
बरोबर आठ वाजता ट्रेन आली. आम्ही पळत जावून एका टिटीला गाठले. त्याला बबलूने सांगितलेल्या नावाच्या टिटीबद्दल विचारले. तो म्हणाला ‘इस नामका कोई टिटी नही है!’ हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. बबलूला आम्ही तीन हजार एक्स्ट्रा दिले होते. पैसे गेल्याचे दु:ख नव्हते, पण आता प्रवास कसा करायचा याची चिंता लागली. ट्रेनने शिट्टी वाजवली तसे पळत जावून एका डब्यात चढलो. दारात उभे राहुनच बबलूला अनेक वेळा फोन लावला. पण काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही! योगायोगाने ज्या टिटीला आम्ही भेटलो होतो तोच या डब्यात होता. त्याला घडलेली हकिकत सांगितली. तो म्हणाला ‘मैं झांसी तक हुं, तबतक आप जहां जगह है वहां बैठ जाईये, आगेका आप देख लिजिये, गाडी फुल है तिकीट कंफर्म तो होगा नही.’
एका कंपार्टमेंटमध्ये जागा होती तिथे बसून बबलूला शिव्या देत रात्री बर्थवर झोपलो. पहाटे झांशी स्टेशन आल्यावर गर्दी वाढली. आमच्या जागेवर रिझर्वेशन असलेले बिहारी पॅसेंजर आले. ‘हमरा सिट है, उठो’ असा हुकूम त्यांनी सोडला. गुपचूप उठून सामान आवरून आम्ही बाजूच्या बर्थवर बसून राहिलो. एक एक पॅसेंजर प्रत्येक स्टेशनवर आम्हाला उठवत होता आणि आम्ही वेगवेगळ्या जागेवर बसून कसाबसा प्रवास करत होतो. गाडी गच्च भरली होती. तो दि��स पूर्ण आमचा उठ बैस करण्यातच गेला. त्यात ती ट्रेन पॅसेंजर ट्रेनपेक्षाही बत्तर होती. प्रत्येक छोट्यामोठ्या स्टेशनवर थांबत होती. भाजीवाले, दुधवाले आपले गठ्ठे घेऊन पॅसेजमध्ये कुठेही बसत होते. टॉयलेटला जाण्यासाठीसुद्धा रस्ता मिळत नव्हता.
दिवस संपून रात्र सुरू झाली. उठबैस करून आमचे हाल झाले होते. अंग आखडून गेले होते. थंडीचे दिवस असूनही घामाने अंग चिकट झाले होते. तशा अवस्थेत असतांनाच एक टिटी तिकीट चेक करायला आला. आमच्या एका मित्राची सहनशक्तीच संपली. तो टिटीवर इतक्या जोरात ओरडला की बोगीतले सर्वजण वाकून पाहू लागले. ‘पैसे लेकर दुसरोंको सीट देते हो, हम कल रातसे परेशान है, हमको सीट नही दीया, रेलमंत्री को आपकी कम्प्लेंट करेंगे’ असे तावातावाने बोलू लागला. गर्दीमुळे टिटीही वैतागून गेला होता. याचा पारा वाढल्यामुळे त्याने तिथून काढता पाय घेतला आणि परत आलाच नाही. यामुळे कदाचित विनातिकीट प्रवास करणार्यांचे फावले असावे. कारण काही जणांनी आम्हाला बसायला जागा दिली.
संध्याकाळी सातला ही ट्रेन मनमाडला पोहोचायला पाहिजे होती ती रात्री अकरा वाजता पोहोचली. कुठून बुद्धी झाली अन बबलूचे ऐकून या दरीद्री ट्रेनने प्रवास केला असे मनातल्या मनात स्वत:लाच दोष देत खाली उतरलो. तिथून औरंगाबादला जायला पहाटे पाचची ट्रेन होती. खूप थकलो होतो. प्लॅटफॉर्मवरच पथारी अंथरली आणि झोपलो. पाचच्या ट्रेनने निघून सकाळी साडेसातला स्वगृही परतलो. बबलू कृपेने आमची हाडे खिळखिळी झाली होती. घरी आल्यावर त्या दिवशी दिवसभर झोप काढली.
पुढचे आठ दिवस बबलूला सतत फोन लावून त्याला शोभणार्या भाषेत संभाषण साधले. दिल्लीत हौज खासमध्ये ज्या व्यापार्यांना भेटलो होतो, त्यांची नावे सांगून तूला जेलमध्ये टाकू वगैरे फुकाच्या धमक्या दिल्या. त्याचा थोडासा का होईना परिणाम झाला आणि बबलूने कंटाळून बाराशे रुपये अकाऊंटवर परत पाठवले. भागते की लंगोट सही या न्यायाने समाधान मानून घेतले आणि परत कधी अशा एजंटला भाळून फसायचे नाही असे मनात पक्के ठरवले.
तेव्हापासून कुठेही बबलू हे नाव निघाले की हुडहुडीच भरते...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
परतफेड...
बापूराव टेंभे, लक्ष्मीबाई आणि बाजीराव असे हे त्रिकोनी कुटुंब. नवसाने बाजीरावचा जन्म झाला. तेही लग्नानंतर पंधरा वर्षांनी. प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले बापूराव तुसड्या स्वभावाचे होते. एकुलता एक मुलगा असूनही लहानपणापासूनच बाजीला नेहमी हिणवून बोलायचे. त्याच्या मनाचे काही करू द्यायचे नाहीत. ते सांगतील तसेच त्याला करावे लागायचे. त्यांच्या धाकात वाढलेल्या बाजीला सायन्स घेऊन सायंटिस्ट व्हायचे होते. पण त्यांनी कॉमर्स घ्यायला लावले. ‘शाळेत टिचर नाहीतर किमान कारकून तरी होशील, भिक मागायची पाळी येणार नाही’ असे म्हणून आपल्या मनाप्रमाणेच करायला लावले.
अशा वातावरणात वाढलेला बाजी अनिच्छेनेच बिकॉम झाला. त्याचे काही मित्र नौकरी करु लागले तर काही व्यवसाय. बाजीला शिक्षकी किंवा कारकुनी पेशात अडकून पडायचे नव्हते. ग्रेट अब्दुल कलाम त्याचे आदर्श होते. कॉमर्स शिकला तरी कॉम्प्युटर क्षेत्रात व्यवसाय करावा असे त्याला वाटत होते. एकदा त्याने घरी विषय काढला. बापूराव भडकलेच. ‘रडत पडत बिकॉम झालास, काडीची अक्कल नाही. टेंभ्याच्या घराण्यात कुणी धंदा केला नाही. गपगुमान शाळेत अर्ज कर. सहाय्यक कारकून म्हणून घेतील. अन ऐकायचे नसेल तर तोंड काळे कर. चालता हो, एक पैसाही माझ्याकडून मिळणार नाही.’ रागारागाने बोलून ताडताड बाहेर निघून गेले.
बाजी खिन्न मनाने कोपर्यात बसून राहिला. आईने डोळ्याला पदर लावला. डोळे पुसत त्याला दोन घास खायचा आग्रह केला. पण बाजी कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात गढून गेला होता. बराच वेळ तसाच बसून एकदम उठला. त्याने काहीतरी ठरवले होते. खुंटीवरचे कपडे पिशवीत भरले आणि आईच्या पाया पडत म्हणाला ‘तुला वचन देतो आई, जर काही चांगलं करु शकलो तर तुला तोंड दाखवायला परत येईन, नाहीतर हीच शेवटची भेट समज!’
लक्ष्मीबाईने त्याला छातीशी कवटाळले. बराच वेळ अश्रुंना वाट करुन दिली. काही वेळाने त्या म्हणाल्या ‘आयुष्य काढलं या माणसाबरोबर. कधी तक्रार केली नाही. गावात यांना मान आहे, तोच माझा मान समजत संसार केला. संसारात माझ्या विचारांना काहीच महत्व नव्हते. मूल होत नाही, वांझ बाई असे काही काही म्हणून माझा खूप छळ झाला. त्यातच मी दबून खचून गेले. तू जन्मलास. असं वाटलं आता बदल होईल. पण माझा भ्रमनिरास झाला. यांना फक्त आपलं पुरुषत्व सिद्ध झालं यातच आनंद!’
पदराने डोळे पुसत त्या पुढे म्हणाल्या ‘बेटा तू आज जो निर्णय घेतला आहेस त्याला माझा पाठिंबा आहे. जोवर तू यांच्या पाशातून बाहेर पडणार नाहीस तोवर तुझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगू शकणार नाहीस. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आयुष्य वाया जाणार नाही ही काळजी घे आणि सर्व समाजाला अभिमान वाटेल असे काही करुन दाखव.’
मन घट्ट करुन लक्ष्मीबाईंनी पोळीभाजीचा डबा त्याच्या पिशवीत ठेवला. कंबरेच्या चंचीतून जेवढे पैसे हातात येतील तेवढे त्याच्या हातात दिले आणि त्याच्या डोक्यावरुन मायेने हात फिरवला. बाजीने आईचा निरोप घेतला आणि तडक बाहेर पडला. त्याची आकृती धुसर होईपर्यंत लक्ष्मीबाई रस्त्याकडे डोळे लावून किती न किती वेळ दारात उभ्या राहिल्या.
संध्याकाळी बापूराव घरी आले. हातपाय धुवत त्यांनी ‘बाजी कुठाय’ असे घुश्श्यातच विचारले. लक्ष्मीबाईंनी हुंदका आवरत त्यांना सर्व हकिकत सांगितली. ‘जाऊ दे गेला तर. खायची प्यायची मारामार झाली की त्याला बाप आठवेल आणि पाया पडत येईल परत. धंदा करतो म्हणे धंदा! लाथ बसेल तेव्हा समजेल. मी आता शाळेतसुद्धा त्याची शिफारस करणार नाही. बस म्हणावं भिक मागत. आता यापुढे त्याचे नाव घरात काढले तर याद राखा.’ चिडून मनाला येईल तसे काहीबाही बोलून बापूराव जेवण करुन झोपले.
एक दोन म्हणत म्हणत तब्बल पंधरा वर्षाचा काळ गेला. दरम्यान बापूराव रिटायर झाले. गावातील लोकांनी व शाळेतील सहकार्यांनी त्यांचा मोठा सत्कार केला. घरी कसेही वागत असले तरी बाहेर त्यांचे चांगले नाव होत��. मुलगा घर सोडून निघून गेला हे गावातील सर्वांना माहित होते. एकुलता एक असूनही आई बापाला वार्यावर सोडून गेला अशी त्याची बदनामी होत होती. वडलांच्या सत्कारालाही आला नाही म्हणून गावातील लोकांनी त्याची खूप छी थू केली.
एकीकडे नवर्याचा सत्कार आणि दुसरीकडे पोटच्या पोराला शिव्याशाप हे सर्व लक्ष्मीबाई सोसत होत्या. पण काही करु शकत नव्हत्या. बाजीची कित्येक वर्षात काही खबर नव्हती. कुठे आहे, काय करतोय, काय खातोय काहीच कळत नव्हते. जीवंत आहे का नाही? या विचाराने मात्र त्या खचून जायच्या. पण लगेच स्वत:ला सावरुन देवासमोर ‘जिथे कुठे असेल तिथे व्यवस्थित ठेव’ अशी प्रार्थना करत बसायच्या.
एक दिवस पोस्टमनने एक पत्र आणून दिले. बापूरावांनी ते वाचले आणि आनंदाने म्हणाले ‘बघा आमची किर्ती कुठपर्यंत पसरली आहे. माझ्या नावाने बी.टी. हायस्कूल – बापूराव टेंभे हायस्कूल तयार करण्यात आले आहे. गडचिरोलीतील आदिवासी शाळेच्या या संस्थेने मला शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाला बोलावले आहे. घरी कुणाला आमची किम्मत नाही, पण बाहेर अजूनही आमच्या कार्याची दखल घेतली जाते. चिरंजीवांनी दिवे लावले, तुम्ही त्यांना साथ दिली, कुठे तोड काळे केले देवालाच माहित.’ डोक्यावर टोपी घालत ‘दोन दिवसांनी निघायचे आहे. रेल्वेचे तिकिट त्यांनी पाठवले आहे. तयारी करा’ एवढे बोलून ते बाहेर पडले.
गावातील सर्वांना ही बातमी कळली. गावकर्यांना खूप आनंद झाला. शाळेला बापूरावांचे नाव दिले ही गावासाठी अभिमानाची गोष्ट होती. बापूरावांवर भक्ती असलेली बरीच गावातील मंडळी त्यांच्या सोबत हा सोहळा पाहण्यासाठी जायला तयार झाली. या आनंदाच्या प्रसंगीही बाजी नाही म्हणून त्याच्या नावाने खडे फोडून झाले. ‘असा पुत्र असल्यापेक्षा वांझ असलेलीच बरी होती’ असे बापूराव लक्ष्मीबाईजवळ पुटपुटले. लक्ष्मीबाईच्या डोळ्यात टचकन पाणी आले. कर्मच फुटकं त्याला कोण काय करणार अशी स्वत:ची समजूत घालून त्यांनी सर्व तयारी केली.
योग्य वेळी सर्वजण रेल्वेने निघाले. गडचिरोलीत संस्थेच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. शाळेच्या रेस्टहाऊसवर त्यांची सोय करण्यात आली. संध्याकाळी कार्यक्रमस्थळी त्यांना आदराने नेले गेले. व्यासपीठावर फक्त बापूराव आणि लक्ष्मीबाईंना बसवण्यात आले. ‘बी.टी. हायस्कूल’ असा मोठा बोर्ड मागे लावलेला होता. बापूरावांचा परिचय करुन देण्यात आला. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
बापूरावांचे व लक्ष्मीबाईंचे स्वागत करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षांना स-परिवार पाचारण करण्यात आले. एक दाढी वाढलेले पण स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान केलेले गृहस्थ आणि निळ्या काठाची सुती पांढरी साडी घातलेली तरुणी अन शाळेच्या गणवेषातील लहान मुलगा व मुलगी व्यासपीठावर आले. ते गृहस्थ शाल पांघरत असतांना बापूरावांनी त्यांना निरखून पाहिले आणि एकदम जोरात ओरडले ‘बाजी.......?’
व्यासपीठ आणि सभागृह एकदम चकीत झाले. गावातील मंडळी आवाक होवून पाहू लागली. संस्थेचे अध्यक्ष बापूरावांच्या व लक्ष्मीबाईंच्या पायावर डोके ठेवून रडत होते. बापूरावांनी त्यांना उठवले आणि आयुष्यात पहिल्यांदाच मिठीत घेतले. टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. लक्ष्मीबाईंच्या आसवांचा बांध फुटला. आकाशाकडे पहात त्यांनी हात जोडले आणि पुटपुटल्या ‘देवा, माझी लाज राखलीस....’
टाळ्यांच्या गजरातच निवेदक बाजी टेंभे यांनी केलेली आदिवासींची सेवा, मुलांना मोफत शिक्षण देत उभी केलेली संस्था, सरकारने त्यांचे कार्य पाहून देवू केलेली जागा, त्यांच्या या कार्याला साथ देण्यासाठी मोठ्या पगाराची नौकरी सोडून आलेली कार्यकर्ती जी त्यांची धर्मपत्नी झाली, त्यांची दोन मुले याबाबत सविस्तर माहिती देत होते. एकीकडे व्यासपीठावर हृद्य सोहळा चालला होता, संस्थेचे अध्यक्ष, त्यांची पत्नी, मुले आणि लक्ष्मीबाई एकमेकांच्या गळ्यात पडत रडत होते. प्रेक्षकांमध्ये कुणालाच काय चालले आहे ते काहीच कळत नव्हते.
काही वेळाने बापूराव पुढे आले. थरथरत्या हाताने त्यांनी माईक हातात घेतला. बाजीच्या खांद्यावर हात ठेऊन ते म्हणाले ‘हा माझा मुलगा बाजी.’ परत टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्वांना हाताने शांत रहाण्याची खूण करत बापूराव म्हणाले ‘पंधरा वर्षांपूर्वी माझ्यावर नाराज होवून घर सोडून निघून गेला. माझ्या अहंकारी आणि हेकेखोर स्वभावामुळे त्याने तो निर्णय घेतला हे बरेच झाले. अहंकार हा होता की मी आयुष्यात जे केले तो हा काय करु शकणार! आणि हेकेखोरी ही होती की मी सांगेल तेच अन तसेच याने करायचे! पण आज माझे डोळे उघडले. मी गावातल्या शाळेसाठी सर्वस्व वाहिले. दिवसरात्र झटत राहिलो. समाजात मला मानाचे स्थान प्राप्त झाले यामुळे अंगात अहंपणा आला. स्वत:ला श्रेष्ठ समजायला लागलो, त्याचवेळी पत्नी, मुलाला तुच्छ समजायला लागलो’.
थोडेसे पॉज घेऊन ते पुढे म्हणाले ‘मी घालून पाडून बोलायचो याची परतफेड माझ्या बाजीने माझ्याच नावाने शाळा काढून केली. यापेक्षा माझ�� भाग्य ते काय! माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे कार्य बाजीने केले आहे. केवळ माझेच नाही तर आमच्या गावाचे नावसुद्धा देशात मोठे केले आहे. आज मी त्याचा बाप आहे याचा मला अतिशय अभिमान वाटत आहे. माझी पत्नी लक्ष्मी ही खर्या अर्थाने या गौरवास पात्र आहे. तिच्यामुळे बाजीवर संस्कार घडले. मी या दोघांचाही अपराधी आहे. मला माफ करा...’ असे म्हणून धाय मोकलून रडू लागले. पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे यांना मिठीत घेऊन ते कितीतरी वेळ रडत होते, आणि संपूर्ण सभागृह साश्रू नयनाने टाळ्यांचा कडकडाट करत होते...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
मो. ९४२२२७८३१०
0 notes
Text
एकझाडी बाबा...
सरजू कधी नव्हे ते खूप दूर बकर्या चरायला घेवून गेला. उन्हाळा असल्यामुळे कुठेच चारा शिल्लक नव्हता अन पाण्याचाही पत्ता नव्हता. रोज रोज एकाच माळरानावर गावातली सगळी जनावरे येवून कुणालाच काही मिळत नव्हते, म्हणून त्याने आज शक्कल लढवली. रोजच्या वाटेने न जाता जिकडे कुणीच जात ��व्हते अशा दूरच्या ठिकाणी गेला. गावापासून बरेच दूर असलेल्या या ठिकाणी तिथे असलेल्या टेकडीवर एक झाड होते. म्हणून ती जागा एकझाडी या नावाने प्रसिद्ध होती. नुसते खडक अन वाळलेली काटेरी झुडुपे होती तिथे. या भागात ते एक झाड सोडले तर पावसाळ्यातही हिरवळ नसायची. जुनी माणसे सांगायची की फार पूर्वी गावातील कुणीतरी या टेकडीवर चढायचा प्रयत्न केला होता, दुसर्या दिवशी त्याचे प्रेत पायथ्याला सापडले होते. तेव्हापासून ती जागा भुताटकीची म्हणून प्रसिद्ध झाली होती. गावातील कुणीच तिकडे फिरकायचे नाहीत. कधी चुकून मुले तिकडे खेळायला गेली अन काही कारणाने आजारी पडली तर भूत बाधा झाली म्हणून मांत्रिकाला बोलावून टेकडीच्या पायथ्याला कोंबडे अर्पण केले जायचे. त्यामुळे आजुबाजूच्या खेड्यामध्ये सुद्धा या जागेची दहशत होती.
दरवर्षी उद्भवणार्या उन्हाळ्यातल्या चारा आणि पाण्याच्या समस्येला वैतागून सरजूने टेकडीवर न चढता खालच्या खाली फिरुन चारा पाण्याचा शोध घ्यायला काय हरकत आहे असा विचार करुन एकझाडी कडे जायचा निर्णय घेतला. पण त्याच्या पदरी निराशाच आली. तिथेसुद्धा सगळीकडे रुक्ष माळरानच होते. सावलीसाठी सुद्धा काहीच नव्हते. यापेक्षा रोजच्या जागेवर वाळलेली का होईना काही झाडे होती. त्यांची थोडीफार तरी सावली मिळायची. इथे दगडावर बसावे तर ती तव्यासारखी तापलेली. पहिल्यांदाच तो इकडे आला होता. गावापासून एवढ्या लांब येवून काहीच हाती लागले नाही म्हणून स्वत:वरच नाराज होवून त्याने परत वळायचे ठरवले.
परत वळता वळता सहज त्याची नजर टेकडीवरच्या झाडाकडे गेली. अन त्याला खूप आश्चर्य वाटले. त्या झाडावर एक भगव्या रंगाचे फडके डोलतांना दिसत होते. आजवर असे कधी दिसले नव्हते. सरजूची उत्सुकता ताणली गेली. काय असेल ते? झेंडा आहे का वार्याने उडून अडकलेला कपडा आहे? गावापासून खूप दूर असल्यामुळे ते झाड गावातून काडेपेटी एवढे दिसायचे. त्यामुळे त्यावर असलेले हे फडके दिसायचा प्रश्नच नव्हता. पण खालून तर स्पष्ट दिसत होते. त्याचे कुतुहल जागे झाले. भूत असेल तर देवाचा झेंडा कशाला लावेल? अन आत्ता तर सकाळचे दहा आकराच वाजले आहेत. भूत रात्री येतात. मग तिथे जाऊन पहायला काय हरकत आहे? पण त्याची हिम्मत झाली नाही. पटकन त्याने बकर्या हाकल्या अन घराकडे पळत निघाला.
दुपारी दोनलाच तो घरी आलेला पाहून म्हातारीला आश्चर्य वाटले. तिने त्याला कारण विचारले. सांगावे का नाही हे त्याला कळेना. रांजणातले पाणी आधी त्याने बकर्यांना पाजले अन मग स्वत:च्या घशातही ढसाढसा ओतले. अंथरलेल्या पोत्यावर बसत त्याने म्हातारीला घडलेली हकिकत सांगितली.
‘मेल्या कशाला मरायला तिकडे गेलास. कुणी जोडीदार बी न्हेला न्हाईस. एकझाडीवर भुताटकी हाय म्हाईत न्हाई का? त्यो झेंडा त्या भुतानंच लाव्ला असंल मुडद्या. आता घाल पैका कोंबड्यावर’ तिने शिव्या हासडायला सुरुवात केली. ते ऐकून सरजू मनातून घाबरला. डोळे बंद करुन पोत्यावर पाय दुमडून पडून राहिला. तोवर म्हातारीने शेजारच्या बायका गोळा केल्या. त्यांच्या कानावर ही बातमी घातली. कुणालाच त्या झेंड्याबद्दल माहित नव्हते. पाच सहाशे लोकांच्या वस्तीचे ते गाव. हां हां म्हणता गावात सर्वांना ही बातमी समजली. संध्याकाळी पुरुष मंडळी घरी आल्यावर त्यांनाही कळले अन सरजूच्या झोपडीकडे कधी नाही ते लोकांची रीघ लागली. सर्वांना तीच तीच हकिकत सांगून सरजूचा घसा बसला. रात्री नऊ दहापर्यंत हे सत्र चालू होते. शेवटी उद्या सकाळी डोंगरावर जावून काय ते सोक्षमोक्ष लावायचा हे ठरवून लोक पांगले अन मगच सरजूला तुकडा मोडायची संधी मिळाली.
दुसर्या दिवशी उजाडल्या उजाडल्याच सरजूला हाका मारणे सुरु झाले. म्हातारी आधीच उठून तयार होवून बसली होती. म्हातारीने कोंबड्यासाठी डब्यात साठावलेले पैसे काढले. पण आधी तिथे जाऊन पाहू मग ठरवू असे काही जाणकारांनी सल्ला दिल्यामुळे पैसे कनवटीला बांधून ती निघाली. गावातल्या सगळ्या बायका आणि माणसे हातात काठी कोयते घेवून जमले होते. लहान मुलांना गावातच म्हातार्या माणसांच्या स्वाधीन करुन जवळजवळ सर्व गाव एकझाडीकडे निघाले. सरजू सर्वांचा लिडर होता. सगळे लोकं सोबत असल्यामुळे त्याला आता कसलीच भीती नव्हती. एकझाडीवर कुणी फिरकतच नसल्यामुळे कुठे पाऊलवाटही नव्हती की कुणाला वर कसे जायचे हे माहितही नव्हते. कसेबसे एकामागे एक करुन ते वरती पोहोचले, अन त्याच वेळेस झाडाजवळून एकदम एक जोरात आवाज आला ‘जिथे असताल तिथेच थांबा!’
दचकून सगळे थांबले. आवाज कुठून आला काही कळेना. काहीजण काठ्या कोयते घेऊन सरसावले तर काहीजण राम राम म्हणत स्तब्ध उभे राहिले. काही क्षणात झाडाजवळ असलेल्या भीमकाय दगडाच्या आडून एक व्यक्ती प्रकटली. त्याच्या अंगावर कमरेला गुंडाळलेला पंचा सोडून बाकी काही नव्हते. हातात वेडीवाकडी बाभळीची काठी, तेलाने चोपलेले केस मागे वळवून पाठीवर लोंबत असेलेले, काळी पांढरी दाढी छातीपर्यंत लोंबलेली अशा अवतारात असलेली ती व्यक्ती परत गरजली ‘बायकांना इकडे आणू नका. यायचं तर फक्त पुरुषांनी या.’
माणसाप्रमाणेच माणूस दिसत होता. त्यामुळे सर्वांच्या मनातली भीती कमी झाली. बायकांना तिथेच उभे करुन चार पाच जाणते लोक सरजूला घेवून पुढे गेले. दूर थांबलेले सर्वजण त्यांच्या हालचाली पहात चुळबुळ करत उभे राहिले. काही वेळाने ते लोक परत आले अन अतिशय आनंदाने ‘बाबा महाराज की जय’ अशी त्यांनी आरोळी ठोकली. बायकांना आणि मागे राहिलेल्या माणसांना त्यांनी सांगितले की ‘ते साधेसुधे माणूस नसून अवतारी बाबा आहेत. काय तेज:पुंज कांती आहे त्यांची! कुठून प्रकटले, कसे इकडे आले, काय करतात, काय खातात काहीच माहित नाही. त्यांना हनुमानाने दृष्टांत दिला म्हणून त्यांनी एकझाडीखाली हनुमानाची मूर्ती स्थापली आहे. झाडाजवळच्या त्या मोठ्ठ्या दगडाखाली एक गुहा आहे. त्यात पाण्याचा ओहोळ आहे. तिथे कुणालाच जाता येत नाही. बाबा तिथे बसून पूजाअर्चा करतात. त्यांनी अजून बाकी काही सांगितले नाही. माणसांना टेकडीवर यायला परवानगी दिली आहे पण हनुमानाची वस्ती असल्यामुळे बायकांना वरती यायला मज्जाव केला आहे.’ ते ऐकून बायामाणसांनी झाडाकडे पहात हात जोडले तर कुणी लोटांगण घातले.
झालं! पाहता पाहता पंचक्रोशित सगळीकडे ही बातमी पसरली. मोठी माणसे दुसर्या दिवशी तिथे गेली आणि बाबांशी काही चर्चा करुन आली. अन त्या दिवसापासून रोज सकाळी उजाडल्यापासून ते अंधार पडेपर्यंत लोकांची तिकडे रीघ लागली. नैवेद्य, दुध, धान्य, पैसे असे काही ना काही घेवून लोकं यायला लागली, देणग्या जमू लागल्या. टेकडीच्या पायथ्याला ‘एकझाडी बाबा देवस्थान’ अशी पाटी लावण्यात आली. त्याच्या शेजारीच ‘बायकांना प्रवेश निषिद्ध’ हीही पाटी लावण्यात आली. एक आडोसा बांधून बायकांना पायथ्याशीच बसायची सोय करुन देण्यात आली. टेकडीवर दगडावरुन खाली उतरुन गुहेकडे जायला पायर्या बांधल्या गेल्या. तिथे बाबांसाठी ध्यानमंदीर तयार करण्यात आल��. गुहेत जायची परवानगी फक्त काही मोजक्या लोकांनाच देण्यात आली. लवकरच झाडाखाली मंदिर बांधण्यात आले. त्याच्या शेजारी बाबांच्या दर्शनासाठी प्रशस्त सभामंडप उभारण्यात आला. बाबांच्या आशीर्वादाने अनेक जणांचे लग्न जमले, कुणाला मुले जन्माला आली, विहिरीला पाणी लागले, अनेकांचे आजार गेले, कुणाला नोकरी लागली, कुणाला व्यवसायात बरकत आली अशा अनेक अख्यायिका पसरायला सुरुवात झाली, आणि पाहता पाहता भूताटकी म्हणून इतके दिवस प्रसिद्ध असलेल्या त्या स्थानाचे रुपांतर देवस्थानात ��ाले.
गावात एक नवा उत्साह संचारला अन बराच बदल झाला. उनाड मुलांनी फुले नारळाची दुकाने थाटली होती. चहा नाष्ट्याच्या टपर्या सुरु झाल्या होत्या. अनेक ठिकाणाहुन मोटारगाड्यात उच्चभ्रू लोकं बाबांच्या दर्शनाला यायला लागली होती. त्यांची यामुळे सोय झाली. बाबांच्या आशीर्वादाने गावात पैसा खेळायला लागला.
अशी अनेक वर्षं गेली. गावाचे नाव खूप गाजले. बाहेर कुठेही गावातील लोकांना सन्मान मिळू लागला. सगळे चांगले चालले होते अन त्यातच एक दिवस सकाळी सकाळी गावात एक अभद्र बातमी पसरली अन आख्खे गाव शोकसागरात बुडाले! ‘एकझाडी बाबा गायब झाले’ अशी ती बातमी! कुणाला काहीच समजेना. काय झाले? कसे झाले? आपलं काही चुकलं का? भुताटकीने देवावर मात केली का? एखादी बाई वरती गेली का? त्यामुळे मारुतीराय कोपले का? असे एक ना अनेक प्रश्न एकमेकांना विचारुन सगळे हैरान झाले.
एकझाडीवर लोकांची झुंबड उडाली. खाली पोलीसांची गाडी आणि इतर काही गाड्या होत्या. चौकशी सुरु झाली होती. बाहेरगावचेही बरेच लोक दिसत होते. सुटबूटातले धनिकही त्यात होते. गावातल्या मोठ्या लोकांनी भीत भीत पोलीसांकडून माहिती घेतली. इंस्पेक्टरसाहेब सुटबूटातल्या माणसाकडे बोट दाखवून म्हणाले ‘या साहेबांची पत्नी कालपासून गायब आहे. ती बाबांची खूप भक्त होती. त्या दोघांचा घटस्फोटासाठी वाद चालला होता. बाबांनी त्यात मध्यस्थी करावी म्हणून ते नेहमी बाबांकडे यायचे. त्यांना वाटले की ती बाबांच्या दर्शनाला इकडे आली असेल. पण काल रात्रीपासून बाबाही गायब आहेत. कुणाला याबद्दल काही माहिती आहे का?’
बाबांच्या जवळच्या लोकांनी त्या माणसाला पत्नीसह अनेकदा पाहिले होते. त्यांच्या विनंतीवरुन बाबांनी स्वत: अनेकदा टेकडीखाली येवून त्यांच्या पत्नीशी चर्चा केली होती. हे सर्वांना माहित होते. पोलिसांना ही माहिती लोकांनी पुरवली.
या घटनेनंतर अनेक दिवस अफवावर अफवा पसरत होत्या. बाबांबद्दल बरे वाईटही बोलले जायचे. पण असंख्य लोकं अशी होती की ज्यांना बाबांच्या आशीर्वादामुळे चांगले दिवस आले होते. असे लोक बाबांचे अजूनही निस्सिम भक्त होते. ते त्यांच्याबद्दल काही वाईट ऐकायला व समज करुन घ्यायला तयार नव्हते. त्यांना खात्री होती की बाबा एक दिवस परत येतील. सर्वकाही सुरळीत होईल.
एकझाडी आता निर्मणुष्य झाली होती. एक दोन परम भक्त फक्त मंदिराची साफसफाई करायला जायचे. बाकी कुणी तिकडे फिरकत नव्हते. गावातले धंदे बसले, उपासमार सुरु झाली. सर्कजण आपल्या कर्माला दोष देत होते. पण तरीही बाबांबद्दल सर्वांची श्रद्धा अबाधित होती.
असे काही वर्ष गेले अन एक दिवस वार्यासा��खी बातमी पसरली की बाबा परत आले! लोकांमध्ये नवचैतन्य संचारले. सर्वजण हर्षोल्लाहासाने एकझाडीकडे निघाले. नैवेद्याचे-आरतीचे ताट हातात घेवून बायकाही निघाल्या. एकझाडी जवळ पोहोचल्यावर त्यांना दिसले की ‘बायकांना प्रवेश निषिद्ध’ असे लिहिलेली पाटी गायब होती! कुणीतरी तोडली असेल असे समजून बायकांना खालीच थांबवून सर्वजण टेकडीवर आले. संपूर्ण टेकडीवर चोख पोलिस बंदोबस्त होता. बाबा सभामंडपात आसनावर बसले होते. अन.....
आसनावर बाबांच्या बाजूला भरजरी वस्त्रात बसली होती ‘ती’ बाई....
© नितीन कंधारकर.
0 notes
Text
अब्दुल...
‘ए अब्दुल, चल ना आज नाईट मारेंगे’ गणपत अब्दुलच्या घरी येवून त्याला म्हणाला.
‘नही भई, अम्मी नक्को बोलती नाईट को’ अब्दुल नाराजीच्या स्वरात उत्तरला.
‘मै बोलता ना अम्मी कु’ असे म्हणून गणपत घरात डोकावत ओरडला ‘अम्मी आज नाईट को जाते हम. अच्छा लगा तो रोज जाईंगे. फिकर ना करना, मै साथ मे हुं. दिन मे बहुत किचकिच र्हैती, रातमे पैसा जादा मिलता’.
हो नाही करत अम्मीने परवानगी दिली. ‘देको बेटे, संबलके रहना. रातमे चोर लफंगे रहेते है, उनसे बचके रहेना’. तिचे उपदेशाचे डोस ऐकून झोपडपट्टीतील एक एक खोल्यांच्या घरासमोरच्या नालीतून वाट काढत ते दोघे कोपर्यावरील टपरीच्या बाजूला झाडाखाली ठेवलेल्या रिक्षांकडे गेले. रिक्षाला बांधलेली साखळी सोडून दोघांनी रिक्षा स्वच्छ करून घेतल्या. आज दिवसा जायचे नसल्यामुळे दुपारी जेवण करून दोघांनी आराम केला.
संध्याकाळी बरोबर सात वाजता गणपतने कोपर्यावरूनच आवाज दिला. अब्दुल नुकताच नमाज पडून आला होता. त्याचा आवाज ऐकून पळतच बाहेर आला. डिसेंबरचा महिना होता अन त्यात रात्रपाळी करायची असल्यामुळे अम्मीने स्वेटर मफलर बरोबर दिले. रिक्षात ते मागच्या दांडीवर टाकून दोघेही बसस्टँडकडे निघाले. पहिल्यांदाच नाईट करत असल्यामुळे त्यांच्यात नवा उत्साह आला होता. बससँडवर अनेक रिक्षा होत्या. एकेकजण आपल्या घराकडचे गिर्हाईक पाहून दिवसभराची ड्युटी संपवण्याच्या मागे होते.
‘अरे अब्दुल, गणपत, साले तुम डरपोक लोगां रातमे कैसे क्या आये रे? भुत बीत पकडींगा भला!’ असे चिडवत त्यांचे स्वागत काही रिक्षावाल्यांनी केले. रिक्षा लाईनमध्ये उभी करून सर्वजण गप्पा मारत बसले. हळूहळू लाईन पुढे सरकत होती आणि अब्दुलला एक गिर्हाईक मिळाले. एक सुंदर तरूण मुलगी दोन मोठ्या बॅगा, अन हातात एक हँडबॅग घेवून रिक्षात बसली. हमालाला पैसे देत शिवाजीनगरला जायचे आहे असे सांगितले. अब्दुलने मिटर टाकले, अन गणपतला हात करून रिक्षाचे हँडल मारले. गणपतने तेवढ्यातल्या तेवढ्यात त्याच्याकडे पाहुन डोळे मिचकावले आणि अंगठा दाखवून ‘ऑल द बेस्ट’ अशी खूण केली. अब्दुलने रिक्षा सुरू करून मिल कॉर्नरला वळसा घालून रिक्षा औरंगपुर्याच्या दिशेने पळवली. तरुण मुलगी रिक्षात बसल्यामुळे त्याच्या अंगात सुरसुरी आली होती.
रात्रीचे आठ वाजले होते. रस्त्यावर खूप रहदारी होती. त्या गर्दीतून शिताफीने वाट काढत अब्दुल रिक्षा दामटत होता. एका कपड्याच्या दुकानासमोर त्या मुलीने रिक्षा थांबवायला सांगितली. ‘दोन मिनिटात येते, सामानाकडे लक्ष द्या’असे म्हणून ती त्या दुकानात गेली. जाण्यापूर्वी तिने रिक्षाचा नंबर नोट केलेला अब्दुलने पाहिले होते. त्याला हसूच आले. जसा काय मी हे सामान घेवून पळून जाणार आहे! मनातल्या मनात तो म्हणाला.
दोन मिनिटे म्हणत म्हणत अर्धा तास होवून गेला. रिक्षात सामान असल्यामुळे अब्दुलला रिक्षा सोडून आत जावून पाहताही येत नव्हते. कधी आत बसून, कधी बाहेर उभा राहून त्याची तगमग चालली होती. रिक्षाचे मिटर वाढत चालले होते तरी या मुलीला कसे काय काही वाटत नाही असे त्याच्या मनात आले. पाहता पाहता एक तास झाला. आता मात्र त्याची सहनशक्ती संपली. त्याने गणपतला फोन लावून हे सांगितले. गणपत नेमके त्यावेळी विरुद्ध दिशेला पंचेवीस किलोमिटर त्याच्यापासून दूर होता. तो म्हणाला थोडावेळ वाट पहा अन जा दुकानात. रात्रपाळी पहिल्यांदाच करत असल्यामुळे अब्दुलचे इतर रिक्षावालेही कुणी ओळखीचे नव्हते.
तितक्यात ती मुलगी आली. रिक्षात ती बसत असतांनाच अजून एक तरूण तिच्या बाजूला बसला. अब्दुल रिक्षा स्टार्ट करत चिडून म्हणाला ‘अरे मॅडम, कितनी देर लगा दी. ये क्या तरीका है क्या?’ असे म्हणत नाराजीनेच रिक्षा शिवाजीनगरकडे वळवली, तितक्यात ती मुलगी म्हणाली ‘शिवाजीनगर नही, हिमायत बाग की तरफ चलो’.
‘उधरसे रिटर्न पॅसेंजर नही मिलता, पैसे डबल लगेंगे’ - अब्दुल नाराजीनेच म्हणाला. ‘हां हां देते है, चलो’ - तो दुसरा तरुण म्हणाला.
हिमायत बाग जवळ आली तसा तो ��रूण म्हणाला ‘जटवाडा की तरफ चलो.’
आता अब्दुलची सहनशक्ती संपली. त्याने रिक्षा बाजूला घेत थांबवली. तितक्यात त्या तरुणाने धारदार चाकू मागनं त्याच्या गळ्याला लावला आणि ‘चुपचाप चलते रहो’ असा आदेश दिला. थंडीचे दिवस असूनही अब्दुलला घाम फुटला. सिनेमामध्ये पाहिले होते तसेच हे घडत होते. अम्मीने बजावले होते रात्री चोर लुचक्के असतात हे आठवून त्याला अजूनच घाम फुटला. काहीतरी काळेबेरे आहे हे त्याच्या लक्षात आले. आता आपले काही खरे नाही असे वाटून मनातल्या मनात तो अल्लाचा धावा करू लागला.
बाहेर तुरळक रहदारी होती. मधूनच एखाद दुसरी गाडी क्रॉस होत होती, तेवढा उजेड सोडला तर आजुबाजूला काळा कुट्ट अंधार होता. हिमायत बाग ओलांडल्यावर समोर हर्सुल जेल दिसले आणि अब्दुलच्या मनात एक छोटी आशा चाळवली. पोलिसांनी रिक्षा अडवावी आणि या दोघांना पकडावे असे त्याला वाटले. जेलच्या कोपर्यावर एकदोन पोलिस होते, पण त्याच्याकडे कुणी पाहिलेही नाही. मुद्दाम तो रिक्षा हळूहळू चालवत होता. कुणीतरी हटकेल अशी त्याला आशा वाटत होती. पण ती फोल ठरली. जटवाडा फाट्यावरून त्यांनी रिक्षा जटवाड्याकडे न्यायला लावली. अब्दुल गपगुमान तिकडे रिक्षा दामटू लागला. गावातून रिक्षा जातांना एखाद दुसर्या कुत्र्याचे भुंकणे सोडले तर बाकी सामसुमच होती. गाव निद्रेच्या आहारी गेले होते.
एक चढाव लागला अन काही वेळातच घनदाट जंगल सुरू झाले. मानेला चाकू घासून तिथून थोडे रक्त निघत असलेले अब्दुलला जाणवत होते. पण हात लावून त्याला पाहताही येत नव्हते. मागून त्या लोकांचे त्याला चाकूने टोचणे चालू होते. ‘जोरसे भगाव, नही तो घुसाड दुंगा’ अशी धमकी देणे चालू होते. मानेबरोबरच आता पाठीलाही ओलसर जाणवत होते. तिथूनही रक्ताची धार लागली होती.
अब्दुलला एकदम लक्षात आले की सीट खाली पेट्रोल सप्लाय बंद करायची एक कळ आहे. रिक्षा गल्लीत बाहेरच ठेवावी लागायची म्हणून गणपतने दोघांच्या रिक्षाला ही सोय पेट्रोल चोरीला जावू नये म्हणून करून घेतली होती. ती कळ दाबली की चावीनेच उघडायची. खराब रस्त्यावर हलत असल्याचा फायदा घेवून अब्दुलने हळूच ती कळ दाबली. आता काही वेळातच रिक्षा बंद पडणार होती!
त्याचवेळी त्या दोघांनी रिक्षा थांबवायला लावली. त्याला खाली उतरवून ‘साले जानबुझके रिक्षा धीरे चलाता है’ असे म्हणून त्या तरूणाने खाडकन त्याच्या गालफडात ठेवून दिली. त्याच गडबडीत अब्दुलने बेमालुमपणे आपले मफलर खाली टाकले. त्या तरुणाने त्याच्या खिशातला मोबाईल काढून घेतला. त्याची गचांडी धरून त्याला जंगलात घेवून गेले. तिथे त्याच्या अंगावरचे सारे कपडे काढून घेतले. कडाक्याच्या थंडीत अब्दुलला संपूर्ण नग्न अवस्थेत उभे केले. ती मुलगी म्हणाली ‘इसको जिंदा छोडना ठिक नही होगा’. तो तरूण म्हणाला ‘इसे जंगलके बीच मे पेड को कसके बांधके रखते है, कोई जंगली जानवर खा जायेगा तो किसीको कुछ पता नही चलेगा’. यावर त्यांचे एकमत झाले अन बॅगमधून दोरी आणून खूप आतमध्ये नेवून त्यांनी अब्दुलला एका झाडाला करकचून बांधले. जोरात ओरडावे वाटत होते, पण चाकूच्या धाकाने त्याची वाचाच बसली होती.
त्याला बांधून ते दोघे निघून गेले. अब्दुलला रिक्षा चालू केल्याचा आवाज आला अन काही वेळाने नीरव शांतता पसरली. बर्याच वेळाने अगदी दुरून धडाम असा दरीत काही पडल्याचा त्याला आवाज आला. तो आवाज,रातकिड्यांची किरकिर अन मधूनच जंगली जनावरांचा आवाज सोडला तर बाकी सर्व शांत होते. अब्दुलला हे काय चालले काहीच कळत नव्हते. मोबाईल जवळ नव्हता, काळाकुट्ट अंधार पसरलेला होता, हातपाय करकचून बांधलेले होते, काहीच हालचाल करता येत नव्हती. ‘या अल्ला, रहेम कर, मुझे बचा ले’ असे मनातल्या मनात घोकतच तो बेशुद्ध पडला.
इकडे गणपतला रात्री बारा वाजता स्टेशनवर गेल्यावर अब्दुलची आठवण आली. नऊ वाजता त्या दोघांचे बोलणे झाले होते. पण नंतर एका नंतर एक गिर्हाईक मिळत गेल्यामुळे त्याला फोन लावता आला नाही. त्याला वाटले अब्दुल स्टेशनवर नक्की भेटेल पण तिथे तो नव्हता. त्याने लगेच त्याला फोन लावला. एक रिंग वाजली अन फोन कट झाला. त्याचा परत फोन येईल म्हणून गणपतने थोडावेळ वाट पाहिली आणि परत फोन लावला. पण यावेळी त्याचा फोन स्वीच्ड ऑफ आला! गणपतला खूप आश्चर्य वाटले अन नंतर भीतीही वाटली. लगेच त्याने आपली रिक्षा लाईनमधून मागेपुढे करून बाहेर काढली अन सरळ घरी आला. नेहमीच्या जागी अब्दुलची रिक्षा नव्हती. आपली रिक्षा जागेवर उभी करून पळतच अब्दुलच्या घरी गेला. दार वाजवून अम्मीला उठवले. रात्रीचा एक वाजून गेला होता. ‘क्या हुवा गणपत, अब्दुल किधर है’ असे म्हणत अम्मी डोळे चोळत बाहेर आली. ‘मै भी वही पुछनेको आया, अब्दुल किधर है, उसका फोन स्वीचॉफ आरा’ घाबरून त्याने अम्मीला सर्व सांगितले. हे ऐकून अम्मीने हंबरडाच फोडला.
अम्मीचा आवाज ऐकून शेजारीपाजारी उठले. सारी गल्ली गोळा झाली.
‘उनो कुछ खाया था की नै? चक्कर बिक्कर आयी होंगी किधर तो भी’
‘मोबाईलकी बॅटरी गयी होंगी’
‘किसीको ठोक्या होंगा’
‘रातमे कायकु भेजे ड्युटी को’
‘कोई चोर लफंगे मारे क्या क्याकी’
असे संवाद सुरू झाले. शेवटच्या वाक्याने मात्र वातावरण गंभीर बनले. चोर लुटेर्यांनी नक्की त्याला पकडले असावे, लुटले असावे. यावर सर्वांचे एकमत झाले आणि पोलिसस्टेशनला जायचे ठरले. सर्वजण पोलिसस्टेशनला पोहोचले. अम्मीने रडत रडत हकिकत सांगितली. ड्युटीवर असलेल्या अधिकार्याने गणपतकडून सर्व सविस्तर माहिती घेतली.
इंस्पेक्टर अमोल शिंदे तरूण होते. त्यांनी लगेच जीप काढायला सांगितली आणि चार पोलीसांसह गणपतलाही बरोबर घेतले. बसस्टँडवर जिथून ती मुलगी बसली त्या रस्त्याने जात औरंगपुर्याजवळच्या त्या दुकानासमोर गाडी थांबवली. पहाटेचे तीन वाजून गेले होते. दुकानासमोर आजूबाजूचे वॉचमन एकत्र बसून शेकोटीवर शेकत बसले होते. त्यांना विचारपूस केली. पण त्यांच्यापैकी कुणालाच काही माहित नव्हते. दुकानाच्या पाटीवर सीसी टिव्हीचा कॅमेरा शिंदेच्या नजरेत आला. त्यांनी वॉचमनकडून नंबर घेवून दुकानदाराला फोन लावला. घाबरूनच दुकानदार काही वेळात तिथे आला. शटर उघडून काँप्युटर चालू केला. सीसी टिव्ही फुटेज तपासणे सुरू झाले. बरोबर आठ वाजता एक मुलगी चेहरा झाकून आत आलेली दिसत ���ोती. तीच ती मुलगी असे गणपत म्हणाला.
शिंदेंनी दुकानाच्या बाहेरचे फुटेज तपासले. गर्दीमधून अब्दुलची रिक्षा गणपतने बरोबर दाखवली. सव्वानऊ वाजायच्या आसपास ती मुलगी त्यात गडबडीत बसतांना दिसली. त्याचवेळी मागच्या बाजूने एक तरूणही गडबडीने आत बसलेला दिसला. एका हवालदाराला दुकानासमोर थांबवून ते भरधाव सायबर सेलकडे गेले अन अब्दुलचा मोबाईल ट्रेस करायला सांगितला. त्याबरोबरच त्यांनी शिवाजीनगर पोलिसस्टेशनला रिक्षाची माहिती कळवून शोध घ्यायला सांगितले. सायबर सेलमधून काही वेळातच माहिती मिळाली की रात्री दहाच्या आसपास जटवाड्याच्या जंगलात कुठेतरी त्याचे लोकेशन होते अन पुढचे काही कळत नव्हते. शिवाजीनगर सोडून रिक्षा जटवाड्याला कशी काय गेली? नक्की काहीतरी भयंकर प्रकरण आहे हे शिंदेंच्या लक्षात आले.
ताबडतोब शिंदे पोलिस ताफ्यासह जटवाड्याकडे निघाले. वायरलेसवरून हर्सुल पोलिसस्टेशनला सर्व माहिती दिली. संशयास्पद रिक्षा दिसल्यास लक्ष ठेवायला सांगितले. काही वेळातच शिंदे जटवाड्याच्या जंगलातील त्या लोकेशनवर पोहोचले. एव्हाना झुंजूमुंजू उजाडत होते. त्या लोकेशनवर बॅटरीच्या प्रकाशात रत्याच्या कडेला एक मफलर दिसला. अब्दुलचा मफलर गणपतने लगेच ओळखला. तिथे त्यांना रिक्षाच्या चाकाचे ठसेही दिसले. पोलीसांच्या टिम करून शिंदेंनी जंगलात वेगवेगळ्या दिशेला पाठवल्या अन शोधशोध सुरू केली.
आता बरेच उजाडले होते. शिंदें स्वत: ठशाचा व मफलरचा आधार घेत अंदाज्याने घनदाट जंगलात घुसले. त्याचवेळी त्यांना एका झाडाला थोडे रक्त लागलेले दिसले. एक नवी दिशा मिळाली. त्यांनी ताबडतोब त्या दिशेने जायला सुरूवात केली. सर्व झाडे व जमीन व्यवस्थित निरखीत ते पुढे जावू लागले. एकदम एका ठिकाणी त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून एका झाडावरून काही गिधाडे उडतांना त्यांना दिसली. गिधाडे जमली याचा अर्थ काहीतरी खाद्य त्यांना मिळाले असणार हे शिंदेंनी ताडले अन पळतच तिथे पोहोचले. एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला एक दोर बांधलेला दिसला. पटकन ते पलिकडच्या बाजूला गेले आणि जोरात ओरडून पोलीसांना बोलावले. सर्वजण तिथे पोहोचले. अब्दुलला करकचून बांधलेले पाहुन गणपत जोरा��े रडू लागला. त्याला शांत रहायला सांगून शिंदेंनी दोरी कापून काढली. अब्दुलचा श्वास नाकासमोर हात नेवून तपासला. मंद श्वास चालू होता. जीव गेलेला नसल्यामुळेच गिधाडे झाडावर वाट पहात बसली होती. वेळीच आपण पोहोचलो याचे शिंदेंना समाधान वाटले.
दोरी सोडल्याबरोबर अब्दुल मुटकुळा होवून खाली पडला. त्याच्या अंगावर एक चादर टाकून त्याला उचलून रस्त्यावर आणण्यात आले. काही वेळातच अँब्युलंस आली. अब्दुलला गणपत अन एका पोलिसासोबत सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले.
एक जीव वाचवण्यात यश मिळाल्यामुळे शिंदे निर्धास्त झाले होते. सकाळचे दहा वाजून गेले होते. जटवाड्याच्या जंगलातून पुढे कच्चा रस्ता सावंगी फाट्यावर निघतो हे त्यांना माहित होते. लगेच ते तिकडे निघाले. फाट्यावर जावून आधी त्यांनी चहा अन टोस्ट खाल्ला. थोडी तरतरी आल्यावर कंट्रोलरूमला कळवून जटवाडा जंगलाच्या बाहेर निघणार्या वेगवेगळ्या मार्गावरील विदर्भ, खानदेश, आंध्र बॉर्डर, मध्यप्रदेश बॉर्डर आदी ठिकाणी संशयास्पद वाहन अथवा रिक्षावर नजर ठेवायला सांगितली. सावंगी फाट्यावर सखोल चौकशी केली तेव्हा एका छोट्या टपरीवाल्याने सांगितले की ‘एक पांढर्या रंगाची कार रात्री दहा वाजल्यापासून इथे उभी होती. दिड वाजेच्या आसपास ती तिथून फुलंब्री साईडला निघून गेली. झोपेत असल्यामुळे त्यात कोण होते ते पाहिले नाही, फक्त कार त्या दिशेने गेली एवढे पाहिले.’
एक नवी माहिती मिळाली होती. ही सर्व माहिती राज्यातील सर्व पोलिस स्टेशनला कंट्रोलरूमवरून कळवली गेली. शिंदेंनी रात्री आठच्या आसपास बसस्टँडवर आलेल्या सर्व बसेसची माहिती घेतली. त्यात पुण्याहुन दोन बस एकाच वेळी आल्या होत्या. ती मुलगी पुण्याहूनच आली असावी ही त्यांना खात्री पटली.
पुणे आणि औरंगाबाद इथल्या बसस्टँडवरचे सीसी टिव्ही फुटेज तपासण्यात आले. दोन्ही ठिकाणी ती मुलगी दोन मोठ्या बॅग अन एक हँडबॅग घेतलेली दिसत होती. पुण्यात एक माणूस बॅगा बसकडे घेवून जातांना दिसत होता, पण औरंगाबादला मात्र हमालाने बॅगा घेतलेल्या दिसल्या.
हे सर्व तपासणे चालू असतांनाच रात्री नऊ वाजता बैतूल बॉर्डर चेक पोस्टवरून फोन आला की ‘तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे एक मुलगा अन एक मुलगी एका कारमधून जात असतांना संशय वाटल्यामुळे आम्ही त्यांना थांबवून ठेवले आहे. पण त्यांच्याकडे बॅगा नाहीत. टॅक्सीचा रंगही पांढरा नाही, चॉकलेटी आहे. त्यामुळे त्यांची अजून झडती घेतली नाही. तुमची टीम लवकर पाठवा अन सोक्षमोक्ष करा.’
माहिती मिळताच शिंदेंनी एसपी साहेबांची परवानगी घेवून आपल्या ताफ्यासह बैतूल बॉर्डरकडे कूच केली. रस्त्यात कुठेही न थांबता अमरावती, परतवाडा करून खर्पीला बॉर्डर चेकपोस्टवर पहाटे सहा वाजता पोहोचले. ती मुलगी अन मुलगा कारमध्येच बसले होते. इंन्स्पेक्टर अमोल शिंदेंनी तात्काळ त्या मुलीला ओळखले. त्यांनी लेडीज पोलीसांना त्या मुलीची झडती घेण्याचा आदेश दिला. अन एक आश्चर्यकारक घटना घडली. ती मुलगी नसून मुलगा निघाला! इतका वेळ नवरा बायको आहे असे भासवून अन मोठ्या लोकांच्या ओळखी सांगून बॉर्डर पोलीसांना भंडावून सोडणारे ते दोघे चळचळ कापू लागले.
हे काहीतरी मोठे षडयंत्र आहे हे लक्षात यायला शिंदेंना वेळ लागला नाही. वेळ न घालवता शिंदेंनी तिथल्या पोलिससटेशनची व्हॅन मागवून घेतली. काही लोकल पोलिस सोबत घेतले आणि सर्व ताफा घेवून ते औरंगाबादकडे निघाले.
रात्री नऊच्या सुमारास ते औरंगाबादला पोहोचले. सरकारी दवाखान्यात एका पोलिसाला पिटाळले. डॉक्टरच्या टीमसह अँब्युलंसमध्ये अब्दुलला पोलिसस्टेशनला आणण्यात आले. गणपत, अम्मीही सोबत होते. अब्दुल आता बराच सावरला होता. त्याच्यासमोर ओळखपरेड घेण्यात आली. त्या दोन तरुणांना पाहून त्याला काही अंदाज लागत नव्हता. हे लक्षात घेवून शिंदेंनी त्या तरूणाला मुलीचे कपडे घालायला लावले. मुलीचे कपडे घातल्याबरोबर अब्दुल जोरात ओरडला ‘यही है साब वो लडकी’.
एक महत्वाचे काम झाले होते. त्या मुलाच्या हँडबॅगमधून शिंदेंना वेगवेगळ्या नावाचे पासपोर्ट मिळाले होते. खरे नाव कळत नव्हते. पण थर्ड डिग्री चौकशीत ते बकाबका ओकू लागले. एकाचे नाव सलमान होते अन दुसर्याचे हाफीज. त्याचवेळी बैतुल बॉर्डर चेकपोस्टवरून फोन आला की सातपुड्याच्या डोंगराच्या पायथ्याशी एका खड्ड्यात दोन बॅगा मिळाल्या. बॉम्बशोधक पथकांकडून त्या बॅगा तपासल्या तेव्हा दोन्ही बॅगात मिळून अडीचशे जिलेटीनच्या कांड्या अन रोख पाच लाख रुपये मिळाले.
आता सर्व स्पष्ट झाले होते. ताबडतोब इन कॅमेरा त्या दोघांचे स्टेटमेंट घेण्याचे काम सुरू झाले. मुलगी झालेला सलमान म्हणाला ‘हमारे कौमपे जुल्म कर रहे है काफर, इस्लाम खतरे मे है. छब्बीस जनवरी को दिल्ली उडानेका प्लान था. हमे पाकिस्तानसे आदेश मिला और बहोत सारा पैसा मिला है. हम जिहादी है, अल्ला हमको जन्नत देगा.’
हे ऐकून बाहेरच्या खोलीत बसलेला अब्दुल जोरात पळत आत आला अन कुणाला काही कळायच्या आत त्याने खाडकन सलमानच्या गालफडात एक सणसणीत थप्पड हाणली. खूर्चीवरून पडून तो भींतीवर आदळला.
त्याची गचांडी धरून अब्दुल म्हणाला ‘साले हरामी, अल्ला का नाम लेके मासूम लोगोंको मारते हो, वो भी उन नापाक लोगोंसे पैसे लेकर? तु��� तो मुसलमान कहने के भी लायक नही हो. मै भी मुसलमान हुं. ये देख ये मेरा यार गणपत, हम सारे हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई सब मिलजुलके रहते है बस्तीमें. कोई झमेला नही. साले तुम कहते हो इस्लाम खतरे मे है. काहेका खतरा बे? दुनिया के किसीभी कोनेमे जाव, इस्लाम खतरेमे कहके तुम जैसे दरिंदे आतंक फैलाते हो और पूरे कौमको बदनाम करते हो. जबतक तुम जैसे किडे मकोडे दुनियासे खतम नही होंगे तबतक इस्लाम खतरेमेही रहेगा. सालों, इस्लाम को नही, दुनिया को खतरा है तुम जैसे लोगोंकी वजह से. और क्या बोला तू?जन्नत! साला तुम जैसे पढे लिखोंसे हम अनपढ अच्छे. हम लोगां जानते है जन्नत भी यहींच है और दोझख भी यहींच. अब भुगतो ७२ हूरों के साथ जन्नत और सडते रहो जेल मे. साले कुत्ते खाते यहां का है और चाटते उन नापाकीयोंका...’ असे म्हणत त्याने दातओठ खात त्याला अजून एक थप्पड लगावली. इन कॅमेरा सर्व रेकॉर्ड झाले होते. शिंदेंनी त्याला आवरले अन बाहेर पाठवले.
दुसर्या दिवशी मॅजिस्ट्रेटसमोर त्या दोघांची ट्रायल होवून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. आतंकवाद्यांना पकडल्यामुळे गृह खात्याचे सेक्रेटरी अन खुद्द डि.आय.जी. सकाळी औरंगाबादला आले. दिवसभर सर्व माहिती घेवून डिआयजी साहेबांनी दुसर्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले की ‘अलीगढला शिकलेला उच्चशिक्षित सलमान पाकव्याप्त कश्मिरमधून ट्रेनिंग घेवून आला होता. मुंबईत त्याने सर्व तयारी केली. कुणाला समजू नये म्हणून वेगवेगळ्या वेशभुषेत तो पुण्याला आला. मुलीचा वेश धारण करून औरंगाबादला आला. इथे हाफिजने पुढच्या प्रवासाची गाडी भाड्याने ठरवली होती. संशय येवू नये म्हणून मुद्दाम ती गावाबाहेर सावंगीवरून बुक केली. ठरल्याप्रमाणे दुकानात त्याने वेळ घालवला. हाफिज आल्यावर अब्दुलला चाकूने धमकावून जटवाड्याच्या जंगलात नेले.
पण अब्दुलने समयसुचकता दाखवून जीवावर बेतले असतांनाही रिक्षाच्या पेट्रोलचा सप्लाय बंद केला. खूण म्हणून आपले मफलर टाकले. त्याला बांधून हे दोन आतंकवादी मध्यल्या मार्गाने सावंगीला पोहोचणार होते. मुख्य रस्त्यावारून जाणे त्यांनी टाळले, कारण अब्दुलने टोलनाक्यावर आरडाओरडा केला असता तर ते पकडले गेले असते.
अब्दुलला बांधून थोडे पुढे गेल्यावर रिक्षा बंद पडली. त्यांनी ती एका दरीत टाकून दिली जिचा धडाम असा आवाज अब्दुलला आला होता. दरम्यान अब्दुलचा फोन वाजला होता. तो स्वीच ऑफ करून त्यांनी दरीत फेकून दिला. तिथून बॅगा घेवून ते खरडत खुरडत तीन तासांनी मुख्य रस्त्यावर पोहोचले. साडेदहाला तिथे पोहोचायचे त्यांचे ठरले होते, पण अब्दुलने केलेल्या घोटाळ्यामुळे ते रात्री दिडला पोहोचले. टॅक्सीवाल्याला फोन करून त्यांनी थांबवून ठेवले होते. कच्च्या रस्त्यावर त्याला जंगलात बोलावले असते तर संशय आला असता, म्हणून ठरलेल्या ठिकाणीच त्याला थांबवून ठेवले. नवरा बायकोसारखे टॅक्सीत बसून ते अमरावतीला पोहोचले. तिथे परत टॅक्सी बदलली अन बैतुलला निघाले. गाड्या बदलत मधल्या मधल्या मार्गाने दिल्लीकडे जायचा त्यांचा बेत होता. तीन तास वेळ वाया गेला नसता तर वायरलेस मेसेज जाईपर्यंत ते बॉर्डर क्रॉस करून ��ेले असते. राज्यभर मेसेज गेल्यामुळे सगळीकडचे पोलिस सतर्क झाले होते. बॉर्डर पोलीसांचा दुरूनच सक्त पहारा पाहुन त्यांनी बाजूच्या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या एका खड्ड्यात बॅगा लपवून ठेवल्या. बॉर्डर क्रॉस करून रात्रीतून केव्हातरी त्या बॅगा न्यायचा त्यांचा बेत होता. पण तो फसला. प्रत्येक ठिकाणी त्यांना मदत करणारे खूप आतंकवादी होते. अलीगढ पासून मुंबई, पुणे, औरंगाबाद, बैतूल, झांशी आदी ठिकाणी यांचे अनेक साथीदार ताब्यात घेण्यात आले आहेत. दिल्लीत एका मोठ्या युनिव्हर्सिटीत शिकणारे काही विद्यार्थी तिथे बॉम्ब प्लांट करणार होते. त्यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही टॅक्सी चालक व मालकांनाही चौकशीसाठी कस्टडीत घेतले आहे.’
थोडे थांबून पुढे ते म्हणाले ‘एका मोठ्या आतंकवादी संघटनेचा पर्दाफाश करण्यात औरंगाबाद पोलीसांना मोठे यश मिळाले आहे, त्यामुळे दिल्लीत २६ जानेवारीला विध्वंस घडवण्याची आतंकवाद्याची योजना असफल झाली. आम्हाला गर्व वाटतो औरंगाबाद पोलीसांचा. देशभर महाराष्ट्र पोलीसांचे कौतुक होत आहे. औरंगाबाद पोलिसांच्या सतर्कतेमुळे देशभर रेड अॅलर्ट घोषित केला गेला. त्यामुळे आतंकवाद्यांची एक मोठी चेन सापळ्यात अडकली आहे. लवकरच भारत सरकारतर्फे इंस्पेक्टर अमोल शिंदें अन त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात येणार आहे.’
टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. हात वर करून सर्वांना शांत करत गृह सचीव म्हणाले ‘याचबरोबर अब्दुल, ज्याने जीवाची पर्वा न करता योग्य वेळी समयसुचकता दखवली, त्याच्या धडाडीची दखल घेवून भारत सरकारतर्फे त्याला तात्काळ नवी रिक्षा, एक लक्ष रुपये व सरकारी कोट्यातून घर देण्यात येत आहे. तसेच तातडीने पोलिसांकडे जावून माहिती देणारा गणपत यालाही शासनातर्फे घर देण्यात येत आहे’.
अब्दुल अन गणपत दोघांच्याही डोळ्यात पाणी आले. एकमेकांना त्यांनी मिठी मारली. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अब्दुल म्हणाला ‘भारत सरकार का मै शुक्रगुजार हुं. घर और रिक्षा मिलने का बहुत आनंद है. पर मुझे फक्र है की मै देशके कुछ काम आ सका. मेरे अब्बा मंदिरके सामने फूल बेचते थे. गरीब थे पर उन्होने और अम्मीने बचपनसे मुझे छत्रपती शिवाजीमहाराज, राणा प्रताप, अब्दुल कलाम, मौलाना आझाद ऐसे महान हस्तियोंकी कहानीयां सुनाई थी और कहा था, जिंदगीमे हो सके तो देश के लिये कुछ अच्छा काम कर, पर जिहादी ना बन. ये आतंकी लोग हम जैसे गरीब मुसलमानोंका फायदा उठाते है, उनकी बातोंमे कभी मत आ. अब्बा तो गुजर गये, पर आज मै सीना तानके अम्मी को कह सकता हुं – अम्मी, अब्बाजान को दिया हुवा वचन मैंने पूरा किया...’
हे तो बोलत असतांना गणपत नकळत उभा राहिला, अब्दुलकडे पाहुन त्याने त्याला कडक सॅल्युट ठोकला अन जोरात ओरडला ‘भारत माता की....’ सर्व पत्रकार, व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य अन जमलेल्या प्रचंड गर्दीने दोन्ही हात वर करून एकसूरात प्रतिसाद दिला ‘जय.....’
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
हात मोडलेला वकील...
लहानपणापासून हुशार असलेला अमेय, ठरवल्याप्रमाणे वकील झाला. घरच्या परिस्थितीमुळे इंजिनिअर किंवा डॉक्टर होणे शक्य नव्हते म्हणून त्याने आधीपासूनच वकील व्हायचे ठरवले होते. त्याचे वडील कोर्टात लिपिक म्हणून काम करत असत. त्यांच्याकडून ऐकून वकीली करायची तर स्वत:ची हुशारी सिद्ध करावी लागते हे अमेयला चांगले माहित होते.
अमेयला क्रिमिनल केसेसमध्ये रस होता. वडलांच्या ओळखीच्या एका क्रिमिनल अॅडव्होकटकडे तो विनामोबदला ज्युनिअरशिपसाठी जावू लागला. त्याला मोबदला नकोच होता, अनुभव येण्यासाठी योग्य मार्गदर्शन पाहिजे होते. त्याने तिथे अगदी मन लावून काम केले अन वर्षभरानंतर त्यांची परवानगी घेवून स्वतंत्र प्रॅक्टीस सुरू केली.
घरीच समोरच्या खोलीत ऑफीस सुरू केले. योगायोगाने पहिल्याच दिवशी त्याच्याकडे एक छोटीशी केस आली. बाबूराव नावाचे कपडा व्यापारी एका गुन्ह्यात अडकले होते. त्यांच्यावर नशाखोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. राज्यात त्यावेळी दारूबंदी होती. पोलिसांना त्यांचा संशय आला अन त्यांचे मेडीकल टेस्ट करण्यात आले. रिपोर्टमध्ये अल्कोहल सेवन केल्याचे सिद्ध झाले होते. रितसर गुन्हा नोंदवून पोलिस स्टेशनला रोज हाजरी लावण्याच्या अटीवर त्यांना जामीनावर सोडण्यात आले होते. गावात थोडे चांगले नाव होते, सर्व लोक त्यांना ओळखत होते. जुन्या वकीलांकडे गेलो तर बेइज्जती होईल या भीतीने ते नवीन वकील शोधत होते. ‘अॅड. अमेय केसकर’ ही ताजी पाटी वाचून ते त्याच्याकडे आले.
अमेयने सर्व व्यवस्थित टिपून घेतले. नेमके काय घडले, कुठे पकडले, त्यावेळी काय करत होता, कपडे कोणते होते, किती वाजले होते वगैरे सर्व चौकशी केली. थोडेसे खजील होत लाजत त्यांनी सांगितले ‘बसस्टँडच्या मागच्या बाजूला आम्ही तीन मित्र चोरून आणलेली दारू पित बसलो होतो. पोलिसांची चाहुल लागून ते दोघे पळाले अन मी त्यांच्या तावडीत सापडलो. त्यावेळी रात्रीचे आठ वाजले होते. वकीलसाहेब, काही करून जेलमध्ये जाण्यापासून मला वाचवा, माझी नाचक्की होवू देवू नका.’
सर्व पेपर्स बारकाईने पाहून अमेय म्हणाला ‘उद्या तारीख आहे अन तुम्ही आज आलात, सर्व पुरावे तुमच्या विरुद्ध आहेत. आपल्याकडे वेळही कमी आहे.’ काही विचार करून तो पुढे म्हणाला ‘ठिक आहे, उद्या दहा वाजता कोर्टात या. पाहू यात काय करता येत ते.’
दुसर्या दिवशी सकाळी बाबूराव सकाळी साडेनऊलाच कोर्टात पोहोचले. कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ही बातमी गावात पसरली होती. त्यामुळे कोर्टात अनेक वकीलांनी त्यांना भंडावून सोडले. ‘नवीन पोराला केस दिली. त्याला काय समजते यातले? पुरावे मजबूत आहेत, आता बसा खडी फोडत’ असे म्हणून घाबरवून सोडले. बाबूरावांना यामुळे भीती वाटू लागली होती. पण ज्याअर्थी सगळे म्हणतात या गुन्ह्यात शिक्षा होणारच, तर मग कमी फिसचा वकील लावलेला बरा असा विचार करून त्यांनी मनाला आवरले.
केसचा पुकारा झाला. सरकारी वकीलांनी केस पेपर्स न्यायाधीशांकडे दिले. मेडीकल सर्टीफिकेट, पंचनामा हे सर्व कागदपत्र पुराव्यासाठी प्रस्तुत केले. पण आरोपीचे वकील आले नव्हते. बराच वेळ वाट पाहून जजसाहेब निर्णय जाहीर करणार इतक्यात अमेय कोर्ट हॉलमध्ये आला. त्याचा हात बँडेजने गळ्यात अडकवलेला होता. जजसाहेबांना अभिवादन करून तो म्हणाला ‘कोर्टात येतांना रस्त्यात गाडी स्लीप झाली. डॉक्टरकडे जावून बँडेज करून घेतले त्यामुळे यायला उशीर झाला. माफी असावी. मी कोर्टाला विनंती करतो, मला आठ दिवसांची मुदत द्यावी.’ जजसाहेबांनी अमेयची परिस्थिती पाहून तीन दिवसानंतरची तारीख दिली.
जे काय होईल त्याचा सोक्षमोक्ष लवकर व्हावा असे बाबूरावांना वाटत होते. पण आता तीन दिवस वाट पाहणे भाग होते. ते बाहेर आले त्यावेळी त्यांची खिल्ली उडवणारे वकील बाहेर टपून उभेच होते. ‘तुम्हाला सांगितले होते, या नवीन पोराला केस देवू नका. कोर्टात यायच्या आधीच तो घाबरून घसरून पडला. आता हा फ्रॅक्चरवाला वकील तुझी केस काय लढवेल?’ असे म्हणून ते सर्वजण बाबूराववर हसू लागले.
बाबूराव खूप चिंताग्रस्त झाले होते. त्यांच्या पत्नीने अन नातेवाईकाने वकील बदलायचा सल्ला दिला. पण वरती आकाशाकडे बोट दाखवत ‘देवाची इच्छा असेल तसे होईल’ असे म्हणत त्यांनी सर्वांना शांत केले.
बाबूरावांचा तो दिवस तगमगीतच गेला. बाहेरही कुठे जाता येत नव्हते. पहिल्याच दिवशी हात मोडून घेतलेला वकील आपले काम कसे करणार या चिंतेत असतांनाच त्यांना अमेयचा फोन आला. ‘संध्याकाळी घरी या. काही महत्वाचे बोलायचे आहे’ असा त्याने निरोप दिला.
बाबूराव संध्याकाळी ��मेयच्या घरी आले. टेबलावर अनेक पुस्तके मांडून अमेय ते वाचत बसला होता. त्याचा हात ठणठणीत दिसत होता हे पाहून बाबूरावला आश्चर्य वाटले. पण ते चूप बसले. बराच वेळ असाच गेला. अर्ध्या तासाने पुस्तक वाचत वाचतच अमेयने विचारले ‘तुम्हाला नक्की बसस्टँडजवळच पोलिसांनी पकडले होते ना?’
बाबूरावांनी होकारार्थी मान हलवली. त्यांना बसून रहायचा इशारा करत अमेय परत पुस्तक वाचण्यात गुंग झाला. असाच तासभर वेळ गेला. एकदम पुस्तकावर टाळी मारल्यासारखे करत अमेय खुशीने ओरडला ‘दॅट्स इट’. एक कागद त्या पानावर ठेवत त्याने पुस्तक बंद केले. काही टिपण फाईलमध्ये टिपून घेतले अन बाबूरावकडे पाहून म्हणाला ‘तुम्ही एक काम करा. ज्यावेळी पोलिसांनी तुम्हाला पकडले त्याच्या आधी कर्नाटकाहून कुठली बस आली का चेक करा. त्या बसमधून कुणी ओळखीचे पॅसेंजर शोधून काढा. काही करून त्यांच्याकडून बसचे तिकीट मिळवा.’
बाबूराव चक्रावून गेल्यासारखा चेहरा करत म्हणाले ‘आपले गाव बॉर्डरवर आहे, कर्नाटकातून दर अर्ध्या तासाला एक तरी बस येते साहेब रोज. पण त्या बसमधून कुणी आले का नाही हे शोधणे कठिण आहे. कशाला पाहिजे साहेब ते तिकीट?’ केस लढवायचे सोडून हा वकील हे कसले खुसपट काढत बसलाय असे वाटून त्यांनी नाराजीनेच प्रश्न विचाराला.
‘मी सांगतोय तेवढे करा. जास्त चर्चा करू नका अन कुणाला काही बोलूही नका. तुमचे भवितव्य त्या कर्नाटक बसच्या तिकीटावर अवलंबून आहे असे समजा आणि या क्षणापासून कामाला लागा. आपल्याकडे दोन दिवस वेळ आहे. निघा आता.’ अमेयने त्यांना निरोप दिला.
बाबूराव बाहेर पडले. घरी आल्यावर बायकोला सर्वकाही सांगितले. बायकोने दोन मिनिट विचार केला अन डोळे चमकावून म्हणाली ‘आपल्या शेजारची गंगाक्का आली की हो आळंदहुन त्या दिवशी आठाच्या आसपास.’ हे ऐकून बाबूरावला खूप आनंद झाला. त्यांनी लगेच गंगाक्काकडे बायकोला पाठवले. काही वेळातच ती आनंदी चेहरा करून घरी आली. खनपटीला लावलेले चुरगळा मुरगळा झालेले एक लाल रंगाचे तिकिट काढले अन बाबूरावकडे दिले. कानडीत त्यावर लिहिलेले समजत नव्हते पण गंगाक्का त्या दिवशी रात्री आठच्या आसपास आल्याची त्यांनी खात्री करून घेतली. दुसरा दिवस उजाडण्याची वाट पहात ते झोपले.
दुसर्या दिवशी सकाळीच ते अमेयकडे गेले अन तिकीट मिळाल्याचे सांगितले. अमेयने तिकीट तपासले. कानडी समजणार्या एका शेजार्याकडून खात्री करून घेतली. तिकीट व्यवस्थित एका प्लास्टिक पाऊचमध्ये ठेवून ते बाबूरावकडे दिले अन त्यांना म्हणाला ‘कुणालाच काही बोलू नका. परवा दिवशी कोर्टात येतांना तिकीट आठवणीने घेवून या.’
अजूनही बाबूरावला काहीच समजत नव्हते. पण कसलीही शंका न विचारता ते निघून गेले.
तारखेच्या दिवशी कोर्ट हॉल तुडुंब भरला होता. बाबूरावला शिक्षा होणार ही सर्वांना खात्री होती. पुरावेच तसे होते. खिल्ली उडवणारे वकील तर हसत हसत सर्वात समोर बसले होते. बाबूरावचे गावातले वैरी मुद्दामहुन कोर्टात जमले होते. बाबूरावला शिक्षा झाली तर पेढे वाटायची त्यांची तयारी होती. त्या सर्वांना पाहून बाबूराव घामेघुम झाले होते.
पुकारा झाला अन न्यायाधीश कोर्ट हॉलमध्ये आले. सरकारी वकिलांनी आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या बाबूरावला काही प्रश्न विचारले आणि न्यायाधीशांना म्हणाले ‘जजसाहेब, केस अगदी सरळ आहे साहेब. दारूची नशा केलेले मेडीकल रिपोर्टवरून सिद्ध झाले आहे. पंचनाम्यातही नोंदी आहेत. मला वाटते कोर्टाचा अमुल्य वेळ वाया न घालवता आरोपीस सेक्शन ५१० अनुसार सहा महिन्याची कैद आणि रु. ५००००/- चा दंड लावावा ही विनंती करतो.’
बाबूराव घाबरून अमेयकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागले. न्यायाधीश अमेयकडे पहात म्हणाले ‘आपले काही म्हणणे असेल तर लवकर सांगा. या केसमध्ये काहीच दम दिसत नाही. जास्त वेळ घालण्यात अर्थ नाही.’
अमेय शांतपणे उभा राहिला. कमरेतून थोडे झुकत न्यायाधीशांना अभिवादन केले आणि आपला युक्तिवाद सुरू केला. तो म्हणाला ‘माय लॉर्ड, हे खरे आहे की आमच्या पक्षकाराने नशा केली होती. हेही खरे आहे की मेडीकल टेस्टमध्ये ते सिद्ध झाले आहे. पंचनाम्यात बसस्टँडवर त्यांना नशेत असतांना पकडल्याची नोंद आहे हेही मान्य आहे...’
हे सर्व तो मान्य करत होता हे पाहून बाबूरावचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. हॉलमधील इतर वकील हातावर टाळी देत ‘गेली केस’ असे म्हणत हसत होते. बाबूरावचे दुष्मन तर खूपच खूश झाले होते. आता कधी एकदा न्यायाधीश गुन्ह्याचा निकाल जाहीर करतील अशा अपेक्षेत सर्वजण असतांनाच अमेय पुढे म्हणाला ‘पण जजसाहेब, पोलिसांकडून एक चुक झाली आहे. त्याला पकडले तेव्हा तो नशेत होता, पण तो कुठून नशा करून आला हे काही एफआयआर मध्ये नोंदले गेले नाही.’
कपाळावर आठ्या चढवत जजसाहेब म्हणाले ‘अहो वकीलसाहेब, नशा केली हे तुम्ही मान्य करता, राज्यात दारूबंदी आहे हेही तुम्हाला माहित आहे. मग कुठे नशा केली, कुणाबरोबर केली, किती रुपयाची केली या गोष्टीला काय अर्थ आहे?’
अमेय लगेच म्हणाला ‘माय लॉर्ड, मी म्हणतोय त्याला फार अर्थ आहे. आरोपीने नशा केली यात काहीच वाद नाही, पण त्याने नशा कुठे केली याला फार महत्व आहे.’ असे म्हणत अमेयने एक पुस्तक हातात घेतले आणि त्यातल्या पान नंबरवर खूण करून ते जजसाहेबांकडे देत तो म्हणाला ‘माय लॉर्ड, कायद्यात असे स्पष्ट म्हटले आहे की ज्या राज्यात दारूबंदी लागू आहे, त्या राज्यात दारू पिण्यास मनाई आहे. म्हणजेच आपल्या राज्यात दारू पिणे हा गुन्हा आहे, पण जिथे दारूबंदी नाही अशा बाहेरच्या राज्यातून दारू पिऊन आपल्या राज्यात आल्यास तो गुन्हा होवू शकत नाही.’
हे ऐकून उपस्थित सर्व लोक आचंबित होवून एकमेकांकडे पाहू लागले. समोर बसलेली वकील मंडळी तर हवालदिलच झाली. सर्वांची तोंडे बघण्यासारखी झाली होती. बाबूरावालाही काही लक्षात येत नव्हते. न्यायाधीशही चक्रावून गेले होते. चारचारदा त्यांनी पुस्तकातील कलमाची पडताळणी केली.
थोडा पॉज घेवून अमेय म्हणाला ‘माझे अशील कर्नाटकातील आळंद या गावाहुन त्या दिवशी रात्री आठ वाजता इथल्या बसस्टँडवर उतरले. आळंद येथेच त्यांनी मदिरापान केले आणि बसमध्ये बसून इथे आले. आपल्या राज्यात त्यांनी दारू पिली नाही. इथून कर्नाटक बॉर्डर फक्त आठ किलोमिटरवर आहे अन आळंद गाव वीस कोलोमिटरवर. पोलिसांनी त्यांना पकडले त्यावेळी ते नशेत होते. त्यांना कुठून आले, कुठे नशा केली वगैरे विचारण्यात आले नाही. फक्त नशा केलेली दिसल्यामुळे त्यांचे मेडीकल करून गुन्हा नोंदवण्यात आला.’
बोलत बोलतच अमेयने बाबूरावकडून तिकीट असलेले पाऊच हातात घेतले आणि ते न्यायाधीशांकडे देत म्हणाला ‘हे त्या बसचे तिकीट माय लॉर्ड. माझ्या अशीलाने नशा केली ही चुकच आहे, पण राज्यातला कायदा मोडला नाही. जर कायदा मोडलाच नाही तर गुन्हा कसला? त्यामुळे माझी सन्माननीय कोर्टाला विनंती आहे की माझ्या अशिलाची निर्दोष मुक्तता करावी.’
न्यायाधीशांनी ते तिकीट तपासले. तारीख अन वेळ तपासून घेतली. त्यांच्या चेहर्यावर किंचित हास्य तरळले. ते पाहून कोर्ट हॉलमध्ये आरोपीस शिक्षा व्हावी या अपेक्षेने जमलेले सगळेच चपापले. सरकारी वकीलाकडे पहात हसत हसत जजसाहेब म्हणाले ‘सन्माननीय सरकारी वकीलसाहेब, अमेय केसकरांनी ही चांगलीच गुगली टाकली आहे. तुम्हाला काही म्हणायचे आहे का?’
सरकारी वकीलांनी ते पुस्तक आणि तिकीट दोन तिनदा तपासले, खात्री करून घेतली अन खाली मान घालून म्हणाले ‘नो सर, मला काहीच म्हणायचे नाही. निर्णय तुमच्या हातात आहे.’
काही वेळातच न्यायाधीशांनी ‘आरोपीस निर्दोष सोडण्यात येत आहे’ असे जाहीर केले. निकाल ऐकताच बाबूरावच्या कुटुंबीयांनी व मित्रपरिवारांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला. कोर्ट हॉलच्या बाहेर आल्यावर तर त्यांनी अमेयला उचलून खांद्यावर घेतले आणि नाचू लागले. सर्वांना मिठाई वाटण्यात आली. बाबूरावला टोमणे मारणारे वकील अन त्यांचे वाईट चिंतणारे लोक तोंड लपवून पळाले.
त्याच दिवशी संध्याकाळी बाबूरावांनी बँड लावून वाजत गाजत ऑफिससाठी लागणारे सर्व फर्नीचर अमेयच्या घरी आणून त्याला प्रेझेंट दिले. एव्हाना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पहिल्या दिवशी अमेयने हात मोडल्याचे नाटक केले होते हे रहस्य बाबूरावांच्या आता चांगले लक्षात आले होते. चहा पित पित त्यांनी मिश्किलपणे अमेयला ‘आता हात कसा आहे’ असे विचारले. डोळे मिचकावत अमेय जोरात हसला, त्या हास्यात बाबूरावही सामील झाले. ते का हसताहेत हे बाकी कुणाला काहीच समजले नाही.
या पहिल्याच केसमुळे अमेयला खूपच प्रसिद्धी मिळाली. दुसर्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर या अद्भूत केसची बातमी झळकली अन त्या दिवसापासून अमेयच्या घरी पक्षकारांची लाईन लागली....
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
मो. ९४२२२७८३१०
1 note
·
View note
Text
मजेशीर अपघात..खा��ा न पिया...
अपघातात मजेशीर काय असते! अपघात हा अपघात असतो अन तो गंभीरच असतो. पण काहीवेळेस आपल्या खिजगिणतीतही नसतांना अपघात होतात, त्याचा भुर्दंड मात्र आपल्याला सोसावा लागतो. असे काही अपघात नंतरच्या काळात आठवले की ‘खाया न पिया बारा आणा’ ही म्हण आठवते अन हसू येते.
सन १९८८ ची गोष्ट. अगदी नव्याने स्कुटर चालवायला शिकलो होतो. एक दिवस भाऊ गावाला गेला ही संधी साधून त्याची बजाज कब बाहेर काढली आणि मित्रांसमोर फुशारकी मारायला भुर्रर्र निघालो. एका सामसुम रस्त्यावरुन जात असतांना डाव्या बाजूच्या मोकळ्या जागेतल्या झाडीतून अचानक काही गाढवे पळत रस्त्यावर आली. माझी स्कुटर त्या जागेवर जायला आणि पहिले गाढव तिथे यायला एकच गाठ पडली. ते गाढव सरळ स्कुटरच्या समोरच्या भागावर धडकले. त्याच्या मागे पळत येणारे दुसरे गाढव त्या पहिल्या गाढवावर धडकले. डबल डाँकी पॉवरने स्कुटरचा समोरचा पत्रा पार चेमटून टाकला. मी उजवा पाय खाली टेकवून जोर लावून स्कुटर पडू दिली नाही. मांडीला गोळा आला होता पण स्कुटर सावरून धरली.
काही क्षणात हे घडले अन गाढवे नाहीशी झाली. कावराबावरा होवून आजुबाजूला पाहिले. सुनसान रस्ता असल्यामुळे कुणी पाहिले नसेल असे वाटले. पण दोन माणसे बाजूच्या घरातून हसत बाहेर आली. ‘अरे तुला दिसले नाही का? कुठल्या तंद्रीत जात होता?’ एकाने असे विचारत स्कुटरच्या चेमटलेल्या पत्र्यावरुन हात फिरवला. दुसरा म्हणाला ‘मित्राला भेटायला गाढवं जोरात पळत आली वाटतं’. त्याचे हे वाक्य ऐकून दोघेही खो खो हसत निघून गेले.
मी स्कुटर स्टँडवर लावली. धुळीने भरलेले कपडे झटकले. आता खरे टेंशन होते ते म्हणजे भावाला काय सांगायचे. त्या विचाराने हातपायच गळाले. डोळ्यात पाणी आले. शर्टच्या बाहीने डोळे पुसत स्कुटरला किक मारली. मित्रांकडे जायचा बेत रहित केला. त्यांना कळाले तर ते खूप हसतील, कशाला फजिती करून घ्या!
तशा गर्भगळीत अवस्थेत जात असतांना एक छोटे गॅरेज दिसले. मेकॅनिकला गाडी दाखवली. ‘ये कैसा हुवा?’ हा नको असलेला प्रश्न त्याने विचारला. ‘गाडी स्लिप हुयी थी’ अशी थाप मारून त्याला पत्रा दुरुस्त करून द्यायची विनंती केली. तितक्यात मघाशी भेटलेले ते दोघे तिथे आले. त्यांनी माझी ‘गाढव भेट’ रंगवून रंगवून त्या मेकॅनिकला सांगितली. मेल्याहुन मेल्यासारखे झाले होते. पण काय करणार, आज देवाने सर्व इज्जतीचा पंचनामा करायचा ठरवला होता. केविलवाणा चेहरा करून त्यांचे कॉमेंट्स ऐकत बसलो.
हातावरचे काम संपल्यावर मेकॅनिकने एक हातोडा घेऊन ठक ठक करत तो पडलेला मोठा पोचा सरळ केला. पण त्या ठोकण्याने एका मोठ्या पोचाच्या जागी अनेक छोटे छोटे पोचे पडले. कांजण्या आल्यावर चेहर्यावर जसे अनेक फोड उमटतात, तसे स्कुटरच्या पत्र्याचे झाले होते. मला त्यावेळी डेंटिंग पेंटिंग हे शब्द ऐकूनही माहित नव्हते. त्या मेकॅनिकने केले याला दुसरा काही पर्याय असतो हे माहितच नव्हते.
तिथून निघून आधी एका टपरीवर चहा घेतला. छातीतली धडधड थोडी कमी झाली. भावाला कसे सामोरे जायचे हाच मोठा प्रश्न उरला होता. चहा घेवून घरी आलो. ताडपत्रीचे कव्हर जिन्याखालून काढले, आणि स्कुटर व्यवस्थित झाकून ठेवली. दोन दिवसांनी भाऊ गावाहुन परत आला. एक दोन दिवस असेच गेले अन एका संध्याकाळी माझी जी खरडपट्टी निघायची ती निघालीच. अजून जास्त निघाली असती, पण अपघात गाढवाबरोबर झाला हे ऐकून त्यालाही हसू आले. रागावण्याची गंभीरता कमी होवून ती हास्यात रुपांतरीत झाली. गाढवामुळे स्कुटरचे नुकसान झाले, पण गाढवामुळेच मी वाचलो, हेही खरेच!
सन १९९८-९९ साली नवी लाल रंगाची मारुती ८०० घेतली होती. नव्या जोशमध्ये सहकुटुंब गोव्याला निघालो. बेळगावच्या पुढे घनदाट जंगलातून निसर्गाचा आनंद घेत घाट उतरत होतो. आमच्या पुढे काही अंतरावर एक जनावरांचा कळप येत होता. म्हणून मी गाडी बाजूला घेवून थांबवली. त्या कळपाच्या मागच्या बाजूला एक ट्रक चढ चढत येत होता. जनावरांमुळे त्याची स्पीडही खूप कमी झाली होती.
अचानक ‘धुडुम..’ असा मोठा आवाज झाला. त्या समोरच्या ट्रकच्या खालून मोठा धुराळा उडाला. त्याचे टायर फुटले होते बहुतेक. पण जसा तो आवाज झाला तसा तो कळप स्वैरभैर झाला. शेपटी वर करून गायी बैलं पळू लागले. मी कार बाजूला थांबवलेली होती. एक गाय जोरात पळत आली अन बॉनेटवरच धडकली. बॉनेटला मोठा पोचा पडलेला दिसत होता. त्याकडे पाहतोय तोवर दुसरी गाय पहिल्या गायीवर धडकली. एकामागे एक अशा अनेक गायी एकमेकांवर धडकल्या. मी हॉर्न मारून त्यांना दूर करायचा प्रयत्न करत होतो. पण काही उपयोग झाला नाही. लाल रंगाशी जनावरांचे वैर असते हे ऐकले होते. पण प्रत्यक्ष अनुभव आत्ता घेत होतो.
काही वेळात तो कळप नाहीसा झाला. खाली उतरून बॉनेटकडे पाहिले. ते वितभर खाली जावून एका छोट्या तलावासारखा त्याचा आकार झाला होता. नव्या गाडीचे हे हाल पाहुन खूप वाईट वाटत होते. तशाच अवस्थेतच गोवा दर्शन घेतले. लोकांना वेगळ्या कारणांमुळे गोवा लक्षात राहतो पण मला मात्र बॉनेटच्या पोचामुळे कायम लक्षात राहिला.
असेच एकदा साईटवर गेलो होतो. इंडिका कार (परत लाल रंगाची) दूर उभी केली होती. ट्रॅक्टरच्या टँकरने पाण्याचा हौद भरणे चालले होते. दुसर्या दिवशी होणार्या स्लॅबची तयारी चालली होती. सुपरवायझरला सर्व सुचना देत असतांनाच पाण्याचा टँकर येत असलेला दिसला. त्याने नेहमीच्या जागी ट्रॅक्टर वळवली अन रिव्हर्समध्ये हौदाकडे निघाला. नेहमीची सवय असल्यामुळे तो रिव्हर्समध्येही जोरात निघाला. पण आज त्याच्या वाटेत इंडिका उभी होती हे त्याला कळलेच नाही! साईटवरचे कामगार बायका, पुरुष जोरात ओरडत, हात हलवत ट्रॅक्टरवाल्याच्या ते लक्षात आणून देत होते. पण त्याला पाणी लवकर आणण्यासाठी इशारे चाललेत असे वाटले अन त्याने अजून स्पीड वाढवला.
‘धडाम’ करून जोरात आवाज आला, अन आमच्या डोळ्यादेखत ट्रॅक्टरची ट्रॉली इंडिकाच्या मागच्या काचेत घुसली. खाली उतरून पळतच कारकडे गेलो. ट्रॅक्टरच्या टेपरेकॉर्डवर ‘देखा है पहेली बार साजन के आंखो में प्यार’ हे गाणे मोठ्या आवाजात चालू होते. ते बंद न करताच ड्रायव्हर मठ्ठासारखा सीटवर बसला होता. कारची मागची काच फुटून आतमध्ये काचा पसरल्या होत्या. डिक्की पार चेपली होती. इंडिकेटरचे तुकडे होवून खाली इतस्त: पडले होते. समोरुन टकाटक दिसणारी गाडी मागच्या बाजूने खंडहर झाली होती.
काही वेळाने ट्रॅक्टरचा मालक आला. फाटके कपडे, डोक्यावर फेटा घातलेला तो मालक हात जोडून म्हणाला ‘काय ती भरपाई करून देतो, माफ करा.’ या त्याच्या वाक्याने सर्व राग निघून गेला. त्याचा हात पकडत मी म्हणालो ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा...’ त्याला चहा पाजला अन सोडून दिले. तो चहा मला पंचेवीस हजाराला पडला ही गोष्ट वेगळी!
याच इंडिकाने एकदा रात्री अकरा वाजता दौलताबाद घाट उतरत होतो. ट्रॅफिक काहीच नव्हती, पण समोरूच्या वळणावरून एक मोटारसायकल हेलकांडे घेत चढतांना दिसली. त्याचे वेडेवाकडे चालवणे पाहुन गाडी बाजूला घेवून थांबवली. त्याच्या डोळ्यावर लाईट जावू नये म्हणून हेडलाईट्स बंद केल्या. एवढे करूनही तो मोटारसायकलवाला नागमोडी चालवत विरुद्ध बाजूला उभ्या असलेल्या आमच्या गाडीवर उजव्या हेडलँपवर जोरात आदळला. काच खाली करून मी ओरडत होतो ‘अरे थांब, बाजूला जा, सरळ जा...’ पण त्याने काही ऐकले नाही. हेडलँपची वाट लावून खाली पाय टेकवत एक पांढरे शुभ्र धोतर अन सदरा घातलेला म्हातारा ओशाळवाणे ह��त हात जोडून ‘माफ करा, मला समजलेच नाही’ म्हणत उभा राहिला. उभ्या उभ्याही तो हेलकावत होता. त्यावरून त्याने धुंदीचे औषध भरपेट घेतले होते हे लक्षात आले होते.
खाली उतरून त्याला शुद्ध भाषेत शिव्या घातल्या. पण त्याच्या गांधी टोपीत त्यातले काहीच शिरत नव्हते. बोलून काहीच उपयोग नव्हता. आम्हीच त्याची गाडी बाजूला केली. त्याला अन गाडीला सरळ उभे केले अन तिथून निघालो. अर्थात त्याचे धुंदीचे औषध आम्हाला दहा हजाराला गंडा लावून गेले...
एक दिवस माझ्याच ऑफिससमोर रस्त्याच्या खाली कडेला अॅक्सेंट उभी करून नेहमीप्रमाणे ऑफिसध्ये बसलो होतो. काही वेळातच ‘धडाडधुम’ असा आवाज आला. बाहेर लोकं बोलण्याचा आवाजही आला. पण नेहमीच रस्त्यावर काही किरकोळ घडत असते म्हणून दुर्लक्ष केले.
एकजण माझ्याकडे आले होते. ते म्हणाले ‘एक टमटम आत्ता एका गाडीला ठोकून गेला. वेडेवाकडे चालवत होता अगदी.’ मी म्हणालो ‘लोक गाड्या व्यवस्थित पार्क करत नाहीत. गाडी अर्धी रस्त्यावर असते. मग कुणी ठोकून गेले की ओरडत बसतात.’
त्यांचे काम झाल्यावर ते निघून गेले आणि मी घरी जाण्यासाठी बाहेर पडलो. रस्त्यापलिकडे पाहिले तर माझ्याच गाडीचे मागचे बंपर ठोकलेले दिसले. पळत जाऊन पाहिले तर फक्त बंपरच नाही तर मागच्या दारालाही मोठा पोचा पडला होता अन उजव्या बाजूचे साईड मिरर लटकत हेलकावे घेत होते.
मला माहिती देवून निघालेले गृहस्थ अजून तिथेच होते. मघाशी मी लोकांना गाडी कशी पार्क करावी यावर दिलेले भाषण आठवून त्यांना मनातल्या मनात हसू येत होते. आता यात माझा काय दोष! गाडी रस्त्याच्या अगदी खाली पार्क केली होती. पण नशीबात हे घडायचे होते दुसरे काय!
झाले! नेहमीप्रमाणे ‘खाया न पिया, बारा हजार भुर्दंड....’
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
दिवाळी, टेप रेकॉर्डर अन एसटी…
सन १९८९. एका साईटवर स्लॅबचे काम चालले होते. दुसर्या दिवशी नरकचतुर्दशी होती. मनात घालमेल चालली होती. रात्री दहाची बस होती. सकाळी औरंगाबाद – गुलबर्गा अन रात्री औरंगाबाद – उमरगा. दोनच बस होत्या उमरग्याला जायला. ही बस चुकली तर दिवाळी हुकली, ही चिंता सतावत होती. संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी स्लॅब भरणे चालूच होते. नवीन असल्यामुळे अन दुसरे कुठले काम नसल्यामुळे दिवसभर साईटवरच थांबलो होतो. दुसरा हेतू हा होता की घर मालक दिवाळी असल्यामुळे का होईना फिस देतील!
अंधार पडला अन एकदाचे स्लॅबचे काम संपले. दबकत दबकतच घर मालकाकडे गेलो. ते काँट्रॅक्टरचे व इतरांचे पेमेंट करत होते, ते पहात थांबलो. शेवटी त्यांनी माझ्याकडे पाहिले अन खिसा दाखवत म्हणाले ‘रिकामा झाला. दिवाळीहुन आल्यावर देतो’.
मी हादरूनच गेलो. गावी जाण्यापुरतेही पैसे नव्हते. सोबत काही घेवून जावे असे मनात होते, ते तर लांबच, तिकिटाचेही वांदे होते. ‘जेवढे शक्य आहे तेवढे द्या, मला गावी जायचे आहे’ लाज सोडून मी म्हणालो. तोंड कसेसेच करत त्यांनी दुसर्या खिशात हात घातला. माझ्याकडे पाठ करून आतल्या आत मोजणी केली अन मोजून तीन हजार माझ्या हातावर ठेवले. मला किमान पाच हजाराची अपेक्षा होती. पण तेवढे तर तेवढे सही म्हणून पैसे घेतले अन रिक्षा करून सरळ औरंगपुर्यात गेलो. एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जाऊन काही टेपरेकॉर्डर पाहिले. साडे आठ वाजून गेले होते. वेळ कमी होता. दिड हजाराचा टेप घेतला अन पाचशेच्या काही कॅसेट्स घेवून तिथून निघालो. खिशात हजार रुपये खुळखुळत होते. एका हॉटेलमध्ये राईसप्लेट खाल्ली अन तडक बसस्टँडवर गेलो.
दिवाळी असल्यामुळे बसस्टँडवर खूप गर्दी होती. या काळात अन महालक्ष्मीच्या आदल्या दिवशी या बसला तुडुंब गर्दी असते हे माहित होते. पण रिझर्वेशन करून आरामात प्रवास करायचा ही प्रथा अजून अंगवळणी पडली नव्हती. त्यामुळे गर्दीत बसमध्ये चढणे हे एव्हरेस्ट चढण्याप्रमाणे दिव्य काम असायचे. सामान व्यवस्थित सांभाळत प्लॅटफॉर्मवर जाऊन उभा राहिलो. बरोबर दहा वाजता बस आली. डेपोतून बस बाहेर निघाल्याबरोबर बसच्या मागे झुंडी पळत सुटल्या. प्रत्येक खिडक्यातून हातरुमाल, गाठोडे, बॅग टाकत काही लोक कसरत होते. कुणी मागच्या खिडकीतून आत घुसत होते. माझ्याकडे सामान असल्यामुळे जागा पकडण्यासाठी धावपळ करणे शक्य नव्हते.
बस प्लॅटफॉर्मला लागेपर्यंत अर्ध्याच्या वर भरली होती. काही लग्गेबाज लोक डेपोतुनच बसून आले होते. ‘मागे सरका, ए बाई दम खा, मरायचंय का...’ असे शेलके बोल कंडक्टर सुनावत होता. पण कुणी ऐकायच्या मन:स्थितीत नव्हते. ड्रायव्हर उरतल्यावर त्याच्या दारातूनही आत घुसण्यासाठी लोकांचा रेटा चालू होता. त्यात काही मुले आई वडील दिसत नसल्यामुळे भोकाड पसरून थयथयाट करत होते. त्याकडे दुर्लक्ष करून मिळेल त्या वाटेने लोक आत घुसत होते.
दारातून आत जाण्यासाठी भांडाभांडी सुरू झाली होती. ‘तुला बघून घेतो, तू आत तर ये’ असे म्हणत एकमेकाला धमकावत लोक आत घुसत होते. त्यातच ‘बाई माणसाला जाऊ द्या’ असे म्हणत त्या संधीचा फायदा घेवून काही लोक आत घुसण्यात यशस्वी होत होते.
मी त्या गर्दीत भर मध्याभागी होतो. काही न करता पुढे धकलला जात होतो. मागच्या रेट्यामुळे एकदाची पहिली पायरी गाठली. गळ्यात शबनम बॅग अन काखेत टेपचे खोके धरून एका हाताने आतली दांडी पकडली अन रेटा देवून दुसर्या पायरीवर चढलो. बसच्या आत चढलो होतो, आता चिंता नव्हती. तितक्यात कंडक्टर आला. ‘सर्का फुढं. ये उचल ते गाठोडं. ए म्हातारी मध्येच काय बसलीस? चल हो मागं...’ असे खेकसत तो कसाबसा आत चढला अन टन टन टन टन बेल वाजवली. दाराबाहेर अजूनही खूप लोक होते. त्यांची घालमेल चालली होती.
ड्रायव्हरने ढुरुंग ढुरुंग करून एक्सिलेटर दोन चारदा दाबले तसे लगबगीने रेटा देत शिव्या घालत बाहेरचे लोक आत चढले. दुध उतू जाऊन भांड्याबाहेर पडते तशी अवस्था बसची झाली होती. दारात लटकलेल्या लोकांसहीत दार बंद न करताच बस निघाली. बसस्टँडच्या बाहेर येवून थोडी थांबली. कंडक्टरने आरडाओरडा करत सर्वांना मागे रेटत कसेबसे लटकलेल्या लोकांना आत घेवून धाडकन दार लावून घेतले अन बस परत सुरू झाली.
जुन्या एसटी बसला मागच्या बाजून दार असायचे. आत गेल्यावर उजव्या बाजूला कंडक्टरची सीट अन त्याच्या मागे संपूर्ण आडवा बेंच असायचा. मी पायर्या चढुन कंडक्टरच्या सिटच्या बाजूला उभा राहिलो. हातातले सामान ठेवायला एकही रॅक रिकामा नव्हता. टेपचे खोके दोन्ही पायात मांडीत धरून एक हात शबनमवर अन एक वरच्या दांडीला पकडून अवघडुन उभा राहिलो. दाटीवाटी इतकी होती की वरचा हात सोडला तरी पडलो नसतो. चारी बाजूने लोकांचे टेकन होते.
काही वेळाने, धान्याने भरलेल्या कोठीला हलवल्यावर जसे अजून धान्य मावते तसे काठोकाठ भरलेल्या बसच्या आतली खेटून खेटून उभी असलेली माणसे हादर्यामुळे योग्य जागी चपखल बसली. म्हणजे उभी राहिली. त्यामुळे थोडा श्वास मोकळा झाला. जवळ जवळ तासाभराने कंडक्टरचे तिकिटाचे महत्कार्य संपले अन तो जागेवर जाऊन बसला. एवढी गर्दी असूनही काही वेळातच त्याने लिखापडी आटोपून दोनदा टन आवाज केला. तत्क्षणी आतले लाईट बंद झाले. मी त्याला गेवराई शहागड किंवा बीडचे कुणी बसलेले पॅसेंजर आहेत का विचारणार होतो. म्हणजे त्या सीटजवळ जाऊन उभा राहिलो असतो. पण त्याने लाईट बंद करून ती संधीच घालवली. आता उभे राहुन प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
बराच वेळ माझ्या पिंडर्याला मागून काही घासत होते. अंधारात काही दिसत नव्हते, अन खाली वाकणे तर शक्यच नव्हते. बसच्या हादर्यामुळे अन वळणावळणाच्या रस्त्यामुळे पायात धरलेले टेपचे खोके खाली स्थिरावले होते. पायात स्पोर्टस बुट होते. एक बुट पायानेच काढला अन मागे काय आहे हे चाचपडून पाहिले. पेपरचा गठ्ठा होता बहुतेक. त्या गठ्ठ्यावर एक म्हातारी मुटकुळे होवून बसली होती. मी मागे वळून पाहतोय हे तिच्या लक्षात आले असा��े. माझेच गठ्ठे आहेत असा तीचा समज होवून ती थोडे मागे सरकली. मी पटकन त्या गठ्ठ्यावर बसलो. पायाला रग लागली होती. खाली बसल्यामुळे एकदम रिलॅक्स वाटले.
वडीगोद्री, शहागड, गेवराई गेले. कुठेतरी जागा होईल ही अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. उलट अजून लोक आत आले. बीडला कंडक्टर ड्रायव्हर बदलतात हे माहित होते. कंडक्टरने चिल्लर तिकिटावर लिहून दिली होती. ते मनात घोळत बसून राहिलो. एकदाचे बीड आले. किमान अर्धा तास बस तिथे थांबणार होती. खाली उतरून कँटीनमध्ये चहा घेतला. पाय मोकळे केले अन बसजवळ जाऊन उभा राहिलो. एकदम तिकिटावर लिहिलेले आठवले अन कंडक्टरच्या शोधात निघालो. तो वरती आराम कक्षात गेला असे कळले. नवीन कंडक्टरला सांगून पळतच तिथे गेलो. त्याला तिकिट दाखवले. त्याने हिशोब केला अन मलाच तीन रुपये मागितले! एवढा द्रविडी प्राणायाम करून फायदा होण्या ऐवजी नुकसानच झाले.
खजील होवून खाली आलो. बस सुरू होण्याच्या बेतात होती. म्हातारी अन पेपरच्या गठ्ठ्याने मला चांगली साथ दिली. माझेच गठ्ठे आहेत असा समज झाल्यामुळे तिने कुणाला तिथे बसू दिले नाही. ती संपूर्ण रात्र त्या गठ्ठ्यावर बसून सकाळी सहा वाजता उमरग्याला पोहोचलो. पेपरच्या अनेक उपयोगापैकी हा उपयोग माझ्या चांगलाच सत्कारणी लागला होता.
झर झर चालत घरी गेलो. प्रवीण (भाऊ), दादा (वडील) यांचे स्नान झाले होते. ते फराळ करण्याच्या तयारीतच होते. मी आल्याचा सर्वांना आनंद झाला. आईच्या चेहर्यावर तर आनंद ओसंडून वहात होता. प्रवासातील गमती जमती सांगत व इतर गप्पा मारत टेपरेकॉर्डर बाहेर काढला. ओवाळणी म्हणून पहिल्यांदा आईच्या हातात दिला. हळद कुंकु लावण्याचे सोपस्कार झाल्यानंतर भीमसेन जोशींची अभंगवाणी लावली. त्यानंतर ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ या गाण्याने दिवाळीचे उत्साही वातावरण निर्माण केले. मागे माझ्या चुकीमुळे (बावळटपणामुळे) दिल्लीमेड टेपरेकॉर्डर घरी आला होता. त्याची सहा महिन्यात वाट लागली होती. ती भरपाई सोनी कंपनीच्या या छोट्याशा का होईना ब्रँडेड टेपने केल्याचे समाधान मला होत होते.
आम्ही सर्व सात भावंडे असतांना दिवाळीत वेगळाच उत्साह असायचा. सुवासिक तेल, उटणे, मोती साबण, फुलबाजे, फटाके, फराळ यांची रेलचेल असायची. पण कामामुळे, लग्न झाल्यामुळे, कौटुंबिक जवाबदारीमुळे एकत्र जमणे हळूहळू कमी झाले. असे असले तरी आईचा उत्साह अजूनही कायम होता. त्याच उत्साहाने तिने मला पायावर खोबरे चोळून, कणकेच्या दिव्याने ओवाळून यथासांग अभ्यंग स्नान घातले. तेल लावून रगडून रगडून मालिश केल्यामुळे अन धुराने भरलेल्या न्हाणीघरातल्या बंबातील गरम गरम पाण्यामुळे रात्रीच्या प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. यानंतर ओसरीवर बसून सर्वांनी मस्त फराळ केला.
एचएमव्हीचा रेकॉर्ड प्लेअर अन दिल्ली मेड टेपरेकॉर्डर नंतर बर्याच कालावधीनंतर घरात टेप रेकॉर्डर आला होता. हा लाल रंगाचा टेप सर्वांना आवडला. पण कॅसेटस मात्र प्रवीणला अजिबात आवडल्या नाहीत. सगळी गाणी रिमिक्स होती. आपल्या कमाईने वस्तु घेण्याचा उत्साह नडला होता. त्यामुळे हे माझ्या लक्षातच आले नव्हते. रिमिक्स प्रकार प्रवीणला बिलकुल आवडत नव्हता. पाचशे रुपये वाया गेले होते. पण आता नाईलाज होता.
दुपारी बाजारात जाऊन आम्ही काही कॅसेट्स विकत घेतल्या. जुन्या टेपच्या सुस्थितीतील काही कॅसेट्स घरी होत्याच. पुढचे तीन दिवस घरात टेपचा आवाज घुमत होता...
असा प्रवास, तशी दिवाळी अन एखादी वस्तु विकत घेवून सरप्राईज देण्याचा आनंद आता राहिला नाही. डिजिटल क्रांतिमुळे आजची पिढी या अनुभवाला मुकली आहे हे निश्चित!
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes