Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 November 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि ****
· राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन
· ‘परवडणारी सिनेमागृहं’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
· आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
· दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोरांवर कडक कारवाईचे निर्देश
· राज्यात ऑनलाईन शिक्षणाला १२ ते १६ नोव्हेंबरदरम्यान पाच दिवस दिवाळी सुटी जाहीर
आणि
· मराठवाड्यात काल नऊ कोविड बाधितांचा मृत्यू तर नव्या ४९८ रुग्णांची नोंद
****
राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या राज्य कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडे करणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
कोरोना विषाणू संसर्गामुळे होणारा मृत्यूदर कमी करणं आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार असून, तापाच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे, खासगी डॉक्टरांनीही लक्षणानुसार तापाच्या रुग्णांची तातडीनं कोविड चाचणी करण्याला प्राधान्य द्यावं, असं कृती दलानं सुचवलं आहे. खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय कायम राहील, त्याचप्रमाणे कृती दलाने जी आदर्श उपचार कार्यपद्धती निश्चित केली आहे त्यानुसार उपचार करण्याचं आवाहन टोपे यांनी केलं.
****
राज्यात ‘परवडणारी सिनेमागृहं’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या ऑनलाईन चर्चासत्राचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांसाठीही पुरेसा वेळ राखीव ठेवण्याबाबत राज्यशासन आग्रही असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, मराठी रंगभूमी दिनानिमित्त काल मुख्यमंत्र्यांनी नाट्य निर्माते, कलाकार यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. नाट्य निर्माते तसंच कलाकारांच्या मागण्यांवर सरकार नक्की विचार करेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कोविड प्रतिबंधाच्या निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्य प्रयोग करावेत आणि कलाकार तसंच प्रेक्षकांची काळजी घ्यावी, असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक निर्मात्यानं कलाकारांची चाचणी करावी, रंगमंचावर मास्क काढावा लागला तरी कलाकारांनी परस्परात अंतर किती ठेवाय���ं, स्वच्छता कशी ठेवायची हे ठरवावं, नाट्यगृहात ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असं धोरण राबवावं, नाट्यगृहाबाहेर खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरही नियमांचं पालन व्हावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
****
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आदरातिथ्य क्षेत्राचं पुनरुज्जीवन आणि पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. यानुसार प्रथम टप्प्यात केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून एक एप्रिल २०२१ पासून वीज दर, पाणी पट्टी, मालमत्ता कर, विकास कर आणि अकृषक कराची आकारणी औद्योगिक दरानं करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा विकास निधी या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं करलच्या बैठकीत घेतला. राज्यात मत्स्य उत्पादन दुप्पट करण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करता नवीन महाविद्यालय, नवीन पाठ्यक्रम, विषय, तुकडी सुरु करण्यासाठी असलेली मुदत सुमारे दोन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णयही काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या अनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमात आवश्यक तो बदल करण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या ऑनलाईन शिक्षणाला १२ ते १६ नोव्हेंबरदरम्यान पाच दिवस दिवाळी सुटी जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागानं काल याबाबतचा आदेश जारी केला. शैक्षणिक कामकाजाचे एकूण दिवस लक्षात घेता, फक्त दिवाळीच्या महत्त्वाच्या दिवशीच सुटी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, शिक्षण क्षेत्रातल्या विविध संघटनांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत, किमान पंधरा दिवस दिवाळी सुटी देण्याची मागणी केली आहे.
****
महाराष्ट्रात राष्ट्रीय होमिओपॅथिक संस्थान उभारण्याचं आश्वासन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिलं आहे. ते बीड इथल्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयानं घेतलेल्या वेबिनार सीरिजच्या समारोप प्रसंगी बोलत होते. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी केलेल्या भाषणात केंद्रीय आयुष मंत्र्यांनी बीड आणि उस्मानबादसह राज्यात पाच जिल्ह्यात आयुष रुग्णालयांना मान्यता देणार असल्याचं जाहीर केलं.
****
कोविड प्रतिबंधासाठी सर्वांनी त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचं आवाहन तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
****
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईसह विविध अन्नपदार्थात भेसळ करणारे तसंच खाद्य तेलाच्या डब्यांचा पुनर्वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या बैठकीत बोलत होते. खवा, पनीर, खाद्यतेल, मिठाईसह विविध अन्न पदार्थातली भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना, जनजागृती तसंच भेसळ करणारी दुकानं, कंपन्या, आस्थापनांवर छापे टाकून कडक कारवाई करावी, प्रसंगी परवाने निलंबित करण्याची सूचनाही यड्रावकर यांनी केली.
****
जागतिक वातावरण बदलासंबंधातल्या सर्व निकषांवर भारतानं चांगली कामगिरी केली असल्याचं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते काल इंडिया सी.ई.ओ कोरमच्या बैठकीत बोलत होते. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी भारतानं अनेक उपाय योजले आहेत, भारतानं नूतनक्षम उर्जावाढीसाठी लक्ष केंद्रीत केलं असून, देशातल्या हरित पट्ट्यात झपाट्यानं वाढ होत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्यात भविष्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता २०३० पर्यंतचा वीज पारेषण आराखडा तयार करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्यात डेटा सेंटर, इलेक्ट्रिकल व्हेईकल स्टेशनसारखी नवी औद्योगिक गुंतवणूक येत आहे, तर नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिका आणि कोस्टल हायवेसारखे नवे महामार्ग बांधले जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर वीजेची मागणी वाढणार असल्याचं ते म्हणाले.
****
सैन्यदल प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांना काल नेपाळी सेनेचे जनरल या मानद पदवीनं सन्मानित करण्यात आलं. काठमांडू इथं एका विशेष समारंभात नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्या हस्ते नरवणे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. तलवार आणि सन्मान पत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दोन्ही देशादरम्यान सेना अध्यक्षांना या पदवीनं सन्मानित करण्याची ही परंपरा गेल्या सात दशकांपासून सुरू आहे.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी पाच हजार २४६ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख तीन हजार ४४४ झाली आहे. राज्यभरात काल ११७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४४ हजार ८०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ११ हजार २७७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख ५१ हजार २८२ रुग्ण ��ोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख सहा हजार ५१९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४९८ रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात काल चार कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला तर नवे ८९ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर नव्या १०८ बाधितांची नोंद झाली. जालना, नांदेड तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. जालन्यात ९७ नवे रुग्ण आढळले, नांदेड ५१, हिंगोली १३, परभणी २२, तर उस्मानाबाद तसंच लातूर जिल्ह्यात काल प्रत्येकी ५९ नव्या कोविडबाधित रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत काल आणखी ८४१ रुग्ण आढळले, तर २५ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ५५२ नवे रुग्ण, तर १२ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ५३१ रुग्ण आढळले, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. भंडारा ८४, धुळे ३०, सिंधुदुर्ग १२, गडचिरोली ९२, जळगाव ६२, वाशिम तीन, रत्नागिरी चार, अहमदनगर २११, धुळे ३१, सातारा २७५ कोविड बाधितांची नोंद झाली.
****
नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल, तसंच डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल, अशी आशा मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई उपनगरी रेल्वे सुरु करण्यासंबंधी लवकरच राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
सुमारे एक हजार ९०० कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय - ईडीने आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर तसंच व्हिडिओकॉन कंपनीचे प्रवर्तक वेणुगोपाळ धूत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. कोचर या��नी पदाचा गैरवापर करत दीपक कोचर संचालक असलेल्या न्यू पॉवर कंपनीला एक हजार ८७५ कोटी रुपये कर्ज दिलं होतं. ते कर्ज बुडीत खात्यात गेलं. फक्त कागदावर असलेली न्यू पॉवर ही कंपनी व्हिडीओकॉन कंपनीची उपकंपनी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दीपक कोचर यांनी काळा पैसा वैध करण्यासाठी कर्जाऊ रकमेचा वापर केल्याचा संशय असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटलमागे २५१ रुपयांनी वाढ झाली, काल बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान अकराशे तर कमाल चार हजार ५५१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले. पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या आवारात उन्हाळ कांद्याचे भाव ३०१ रुपयांनी वाढले तर लाल कांद्याच्या भावात दीडशे रुपयांनी घट झाली.
****
परभणी जिल्ह्यात रद्द केलेले पीज कर्जाचे अर्ज परत मागवून कर्ज मंजूर करण्यासंदर्भात विचार करण्याचा निर्णय बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपोषणाच्या माध्यमातून केलेल्या मागण्यांच्या अनुषंगानं काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. प्रत्येक शेतकऱ्यांच्या मागणी अर्जाची नोंद ठेवण्याच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या बँकांनी १५ दिवसात सॉफ्टवेयर तयार करुन शेतकऱ्यांना एसएमएस सुविधा द्यावी, खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळालेलं नाही त्यांचे अर्ज स्वीकारून रब्बी हंगामात कर्ज देण्याचा, तसंच संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढवण्यासंदर्भात प्रस्ताव रिजर्व्ह बँकेकडे पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलनाला काल सुरुवात झाली. आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश दिले जात नाहीत तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनात राज्यातले अनेक साधू-संत-महंत मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत.
****
कोविड प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क वापरण्याचं तसंच वारंवार साबणानं हात धुण्याचं आवाहन आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल साळुंखे हिनं केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथले यंत्रमाग, आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला आहे. सुताचे वाढलेले दर आणि कच्च्या कापडाच्या मागणीत झालेली घट यामुळे निर्माण झालेल्या मंदीच्या वातावरणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे
****
परभणी जिल्ह्यात मानवत इथं पोलिसांनी सुमारे सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. परवा बुधवारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत ५ लाख ८३ हजार रुपयांचा गुटख्यासह एकूण ७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रायगड जिल्ह्यात खोपोली इथं एका रसायन कंपनीत काल पहाटे झालेल्या भीषण स्फोटात दोन जण ठार तर ८ जण जखमी झाले. जशनोव्हा फार्मा नावाच्या या कंपनीत केमिकल रिअॅक्टरमध्ये बिघाड होऊन हा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरातल्या अन्य सहा कंपन्यांचं नुकसान झालं, तर एका कंपनीतलं एक छत कोसळून सुरक्षा रक्षकाची पत्नी ठार झाली. स्फोटामुळे लागलेली आग, अग्निशमन दलानं १० बंबांच्या सहाय्यानं चार तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या दहावी तसंच बारावी परीक्षेसाठी खासगीरित्या अर्ज क्रमांक १७ ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली. इच्छुक विद्यार्थ्यांनी येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून शुल्क भरावं. ऑनलाईन शुल्क भरल्याच्या पावत्या आणि आवश्यक कागदपत्रांसह मूळ अर्ज येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संबंधित शाळा किंवा केंद्रांकडे जमा करावा, संपर्क केंद्र, शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी ४ डिसेंबरपर्यंत हे अर्ज विभागीय मंडळांकडे जमा करणं आवश्यक असल्याचं, मंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
0 notes