Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 July 2021 Time 7.10AM to 7.20AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ जुलै २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· दहावीच्या परीक्षेत राज्याचा निकाल साडे ९९ टक्के; औरंगाबाद तसंच लातूर विभागात ९९ पूर्णांक ९६ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.
· महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत वाढीबद्दल पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त.
· गर्दी थांबवण्यासाठी केंद्राने व्यापक धोरण आणावं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी.
· राज्यात काल सात हजार ७६१ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात सात जणांचा मृत्यू तर ३४८ नव्या बाधितांची नोंद.
· माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुमारे सव्वा चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त.
· वैद्यकीय शिक्षणाचं केंद्र म्हणून महाराष्ट्र नावारुपाला यावं, अशी राज्य सरकारची भूमिका - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख.
आणि
· अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देण्याची परिवहन मंत्री अनिल परब यांची सूचना.
****
राज्यात यंदा दहावीच्या परीक्षेत ९९ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं काल दुपारी दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल ९९ पूर्णांक पाच दशांश टक्के लागला असून, कोकण विभाग १०० टक्के निकालासह पहिल्या स्थानी, अमरावती विभाग ९९ पूर्णांक ९८ शतांश टक्के निकालासह दुसऱ्या तर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद तसंच लातूर विभाग, ९९ पूर्णांक ९६ शतांश टक्के निकालासह, तिसऱ्या क्रमांकावर आहेत. औरंगाबाद विभागात औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९९ पूर्णांक ९७ शतांश टक्के लागला आहे. बीड ९९ पूर्णांक ९६, परभणी ९९ पूर्णांक ९०, जालना ९९ पूर्णांक ९७, तर हिंगोली जिल्ह्याचा निकाल, ९९ पूर्णांक ९६ शतांश टक्के लागला आहे.
लातूर विभागात लातूर जिल्ह्यातून ९९ पूर्णांक ६१ शतांश टक्के, नांदेड ९९ पूर्णांक ५४ शतांश टक्के तर उस्मानाबाद जिल्ह्यातून, ९९ पूर्णांक ४२ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यभरातून ८२ हजार ८०२ पुनर्परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यांच्यापैकी ७४ हजार ६१८ म्हणजेच ९० पूर्णांक २५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा दहावीची परीक्षा कोविड प्रादुर्भावामुळे घेता आली नव्हती. विद्यार्थ्यांची नवव्या इयत्तेतली कामगिरी तसंच दहाव्या इयत्तेत अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे, हा निकाल लावण्यात आला आहे.
दरम्यान, शिक्षण मंडळाचं संकेतस्थळ बंद पडल्याने, अनेक विद्यार्थ्यांना काल सायंकाळपर्यंत आपला निकाल समजू शकला नव्हता.
****
महाराष्ट्र आणि केरळ राज्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत होणा���ी वाढ, चिंतेची बाब असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, पंतप्रधानांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिसा या राज्यांचे मुख्यमंत्री, या बैठकीत सहभागी झाले होते. चाचणी, योग्य उपचार आणि बाधितांच्या संपर्कातल्या लोकांचा शोध, यावर भर देणं, तसंच अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
दरम्यान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करताना, वाढती गर्दी हे एक मोठं आव्हान असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत नमूद केलं. धार्मिक, सामाजिक तसंच राजकीय कार्यक्रम, आंदोलनं यामुळे होणारी गर्दी थांबवण्यासाठी, केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावं, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडून पर्यटन स्थळी, बाजारात गर्दी करत आहेत. हे थांबवण्यासाठी राज्य प्रयत्न करत आहेतच, पण केंद्रीय पातळीवरून देखील व्यापक स्वरूपाचं धोरण आखावं लागेल, असं ठाकरे म्हणाले.
****
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी, तसंच उद्योग क्षेत्रातल्या काही प्रतिनिधींशी, मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमालाही, मुख्यमंत्र्यांनी काल संबोधित केलं. भूजल संपत्तीचं संवर्धन आणि जतनाचं कार्य अधिक जोमाने करण्यासाठी, लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यात काल सात हजार ७६१ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६१ लाख ९७ हजार १८ झाली आहे. काल १६७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २६ हजार ७२७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे. काल १३ हजार ४५२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ६५ हजार ६४४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक २७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख सात हजार २०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३४८ कोविड बाधितांची नोंद झाली, तर सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले मराठवाड्यात सर्वाधिक १८१ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ५४, औरंगाबाद ४६, लातूर २८, नांदेड १६, परभणी १४, जालना आठ, तर हिंगोली जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला.
****
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. १९७८ सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या सुरेखा यांनी नाटकं, दूरचित्रवाणी मालिका, आणि चित्रपट या सर्वच क्षेत्रात काम केलं. ‘तमस’, ‘मम्मो’ आणि ‘बधाई हो’ या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी, त्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. १९८९ साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. ‘बालिका वधू’ या मालिकेतली दादीसा ही त्यांची भूमिका विशेष गाजली.
****
अंमलबजावणी संचालनालय - ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची, सुमारे चार कोटी वीस लाख रुपयांची अचल संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईत वरळी इथली एक कोटी ५४ लाख रुपयांची सदनिका आणि दोन कोटी ६७ लाख रुपये किंमतीची रायगड जिल्ह्यात उरण इथल्या जमिनीचा समावेश आहे. डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान, बार मालकांकडून वसूल केलेले चार कोटी रुपये, दिल्लीतल्या बनावट कंपन्यांच्या मार्फत देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेकडे आल्याचं भासवण्यात आलं, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.
दरम्यान, पुण्यातल्या भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांच्या कोठडीत १९ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
****
राज्यात वैद्यकीय शिक्षणाचं जाळ तयार करुन, देशातलं वैद्यकीय शिक्षणाचं केंद्र म्हणून महाराष्ट्र नावारुपाला यावं, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, साथरोगावर असलेल्या अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढवण्यात येणार, तसंच वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणांसंबंधीचे नवे अभ्यासक्रम सुरु करण्यात येत असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं. ते म्हणाले –
डॉक्टरांची संख्या वाढवली पाहिजे, नर्सची संख्या वाढवली पाहिजे. पॅरॉमेडिकल स्टाफची संख्या वाढवली पाहिजे. म्हणून ��्याचे अभ्यासक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणामधे हे आपल्याला विद्यापीठाकडनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापमधे या व्यवस्था येणाऱ्या काळामधे उभ्या राहिल्या पाहिजेत. जवळपास सहा नव्या वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाला आम्ही मंजुरी दिली आहे. आणि इतर जिल्ह्यांचे प्रस्ताव हे विचाराधीन आहेत. भारतातलं वैद्यकीय शिक्षणाचं केंद्र म्हणून महाराष्ट्र नावारूपाला आला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आयुषचं सुध्दा जाळं हे महाराष्ट्रामधे त्याची व्याप्ती वाढली पाहिजे हे देखील आमचं धोरण आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या दोन अंकी झाली असली, तरी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचं आवाहन देशमुख यांनी केलं.
दरम्यान, अमित देशमुख यांच्या नेतृत्वात काल औरंगाबाद इथं इंधन दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारनं, पेट्रोल आणि डिझेल, वस्तू आणि सेवा कर जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणीही देशमुख यांनी केली.
****
पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या स्वाक्षरी मोहीमेचं, परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं काल उद्घाटन करण्यात आलं. युवानेते सुरेश नागरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष गणेश काजळे आणि रामेश्वर घुगे यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. शहरात पेट्रोल पंप आणि रहदारीच्या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. तसंच सायकल फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथल्या जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक नूतन शाळेची काल जिल्हा परिषदे���्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्या ५ शिक्षकांना त्यांनी तडकाफडकी निलंबित केलं.
****
औरंगाबाद शहरात व्यावसायिक मालमत्तांना पाण्याचं मीटर बसवण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक काल उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव बलदेवसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. शहर विकासाच्या अनेक कामांसाठी निविदा प्रक्रियेला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
****
अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देण्याची सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात परब यांनी औरंगाबाद, नांदेड तसंच लातूर विभागाच्या कामाकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. वाहनचालकांना शिस्त लावणं महत्त्वाचं असल्याचं परब यांनी नमूद केलं. ऑटोरिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदान वाटपाबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.
****
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम थांबू नये यासाठी राज्य आकस्मिक निधीमधून तातडीने २२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये सोलापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा साधा उल्लेख देखील करण्यात आला नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधलं. हा निधी देण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
****
परभणी इथं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल, कोविड कृती दलाची बैठक घेतली. कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी तसंच संरक्षणासाठी स्थापन कृती दलातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी, जिल्ह्यातल्या अशा बालकांची माहिती घेऊन, कागदपत्रांची पूर्तता करावी, आणि प्रकरणं तत्काळ निकाली काढावीत, असे निर्देश मुगळीकर यांनी दिले.
****
भविष्यात शेती सक्षम करायची असेल तर जास्तीत जास्त महिलांनी शेतीत सक्रिय सहभाग घेणं गरजेचं असल्याचं मत, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं काल क्षेत्र भेट कार्यक्रमात ते बोलत होते. डवले यांनी बदनापूर, राजेवाडी, खादगाव इथल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. खादगावच्या कृषी सहायक व्ही. एम. गुम्मलवार यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा डवले यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
****
औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमध्ये काल समाधानकारक पाऊस झाला.
दरम्यान, मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यात काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.
****
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 July 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १६ जुलै २०२१ दुपारी १.०० वा. ****
कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ज्या राज्यांमध्ये सर्वप्रथम आली त्याठिकाणी ती आटोक्यातही लवकर येईल, असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला होता, मात्र महाराष्ट्र आणि केरळ राज्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत होणारी वाढ, चिंतेची बाब असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिसा या राज्यांचे मुख्यमंत्री, या बैठकीत सहभागी झाले होते. चाचणी, योग्य उपचार आणि बाधितांच्या संपर्कातल्या लोकांचा शोध, यावर भर देणं, तसंच अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. अधिक काळ सतत बाधितांच्या संख्येत वाढ होत राहीली, तर या विषाणूच्या नव्या प्रकारांचा धोका वाढत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्रानं उचललेली ठोस पावलं आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती पंतप्रधानांना दिली असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे, २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल, आज जाहीर झाला. राज्याचा निकाल ९९ पूर्णांक ९५ टक्के इतका लागला आहे. शिक्षण मंडळानं आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्वात जास्त निकाल १०० टक्के कोकण विभागाचा लागला असून, सर्वांत कमी निकाल ९९ पूर्णांक ८४ टक्के नागपूर विभागाचा आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
****
ज्या नागरीकांनी कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील, आणि लस घेतल्यानंतर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी, ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेलं अधिकृत प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल, असं या आदेशात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय पुरस्कार विज��त्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं आज मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. सुरेखा यांनी नाटकं, मालिका, चित्रपट सर्वच क्षेत्रात काम केलं. १९७८ सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटविश्वात पदार्पण केलं होतं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांना ‘तमस’, ‘मम्मो’ आणि ‘बधाई हो’ या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण घेतलेल्या सिक्री यांना, १९८९ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. ‘बालिका वधू’ या मालिकेतली त्यांची भूमिका विशेष गाजली.
****
पुण्यातल्या भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांच्या कोठडीत १९ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयानं त्यांना या महिन्यात अटक केली आहे.
****
देशात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींच्या ३९ कोटी ५३ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ३८ लाख ७८ हजारांहून अधिक नागरीकांना लस टोचण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.
****
मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं असून, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, पुढील ४८ तास मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे.
****
नांदेड शहरालगतच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा आज सकाळी उघडण्यात आला आहे. या दरवाजातून १६ हजार ६३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात येत आहे.
****
आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, विजेते खेळाडू स्वत:च्याच हातानं गळ्यात पदक घालून घेणार आहेत. स्पर्धेतल्या ३३९ खेळांच्या पारंपारिक पदक प्रदान सोहोळ्यात, हा अतिशय महत्त्वाचा बदल करण्यात आला असल्याचं, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी सांगितलं.
****
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 June 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ जून २०२० सायंकाळी ६.०० **** देशातला कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर. २४ तासांत आठ हजारांहून अधिक रुग्ण घरी. भारत-पाकिस्तान सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये या वर्षात आतापर्यंत दोन हजार वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन. हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं मुंबईत केली आत्महत्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ. **** देशातला कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांवर गेला आहे. गेल्या २४ तासांत आठ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ३७८ रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. सध्या देशात एक लाख ४९ हजार ३४८ जणांवर उपचार सुरू आहेत. भारतीय औषध संशोधन परिषदेनं कोरोना संसर्गाची चाचणी करण्याच्या क्षमतेतही वाढ केली असून, या चाचण्या करण्याची परवानगी मिळालेल्या शासकीय प्रयोगशाळांची संख्या ६४६, तर खासगी प्रयोगशाळांची संख्या २४७ वर गेली आहे. गेल्या २४ तासांत एक लाख ५१ हजारांहून अधिक जणांचे नमुने तपासण्यात आल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे. **** भारत-पाकिस्तान सीमेच्या जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून एक जानेवारीपासून आतापर्यंत दोन हजार ४७ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यात मार्च महिन्यात सर्वाधिक ४११ वेळा पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. संरक्षण दलांच्या विश्लेषणानुसार, गेल्या वर्षीपेक्षा हे प्रमाण ६९ टक्क्यांनी वाढलं आहे. यात जानेवारी महिन्यात ३६६ वेळा, एप्रिलमध्ये ३८७ वेळा, तर मे महिन्यात ३८२ वेळा सीमेवर गोळीबार झाला. जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच हा आकडा १४४ इतका झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. काश्मीरच्या नियंत्रण रेषेलगत असलेल्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण तळांवर दीडशे ते अडीचशे दहशतवादी, तर जम्मू परिसरातली आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेलगतच्या तळांवर सव्वाशे ते दीडशे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचा अंदाज सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे. या घुसखोरांना वाट मोकळी करून देण्यासाठीच पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात असल्याचं सुरक्षा दलांनी म्हटलं आहे. **** कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संकटात आघाडीवर राहून योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना वाळीत टाकण्याचे प्रकार निंदनीय असून, त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी आणि कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहित करावं, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णालयात काम करुन घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवावं, अशा मागणीची याचिका वसई-पालघर इथल्या रहिवाशांनी दाखल केली होती, ती फेटाळून लावताना न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि अमैद सय्यद यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत. **** हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं मुंबईत वांद्रे इथं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त आणि प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दिली आहे. ३४ वर्षीय सुशांतनं छोट्या पडद्यावरील मालिकांमधून आपल्या ित्रपटांतून सुरुवात केली होती. २०१३ साली ‘काइ पो चे’ या ित्रपटांतून त्यानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता. याशिवाय, एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, राबता, छिछोरे, पीके, शुद्ध देसी रोमान्स्, डिटेक्टीव ब्योमकेश बक्षी अशा चित्रपटांतही त्यानं काम केलं होतं. वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी सुशांत प्रसिद्ध होता. **** पेट्रोल आणि डिझेलच्���ा दरात आज सलग आठव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल प्रतिलिटर ६५ पैशांनी महागलं, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६४ पैसे वाढ झाली. **** सोलापूरचे माजी आमदार युनूस शेख यांचं आज सकाळी निधन झालं. ते ऐंशी वर्षांचे होते. तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. स्थायी समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. १९९० झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले. **** अकोला जिल्ह्यात काल दोन, तर आज पाच जणांचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. तर बारा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. गेल्या आठ दिवसांत १७ जणांचा अकोल्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एक हजार सात झाली आहे. तर मृतांचा आकडा एकावन्नवर पोहोचला आहे. सध्या अकोल्यात ३३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. **** अमरावती इथं आज ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३३३ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत कोरोनामुक्त झाल्यानं २३७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या ६६ रुग्ण उपचार घेत आहेत. अमरावतीमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. **** बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असून, पावसाची वार्षिक सरासरी आठ टक्क्यांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळामुळे नुकसानही झालं आहे. या पावसामुळे मलकापूर शहरात मोठं नुकसान झालं. शहराचा विद्युत पुरवठा त्यामुळे खंडीत झाला असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. मलकापूर तालुक्यतल्या जांभूळधाबा इथला एक शेतकरी पावसादरम्यान नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. धाड भागात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलडाणा शहरानजीक चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलवड नजीक पैनगंगा नदीवरील पुलाचं काम सुरू असल्यानं नदीपात्रात उभारलेला पर्यायी कच्चा पूल रात्री पडलेल्या पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे बुलडाणा-धाड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. **** वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथल्या ४ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आज स्पष्ट झालं. हे सर्वजण अमरावती इथल्या कोरोना बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातले आहेत. वाशिम जिल्ह्यात सध्या ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ***** औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ११६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार ७४२ झाली आहे. यामध्ये सकाळी ११३, तर दुपारी अबरार कॉलनी, कोहिनुर कॉलनी आणि अजब नगर इथला प्रत्येकी एक असे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यापैकी एक हजार ४५१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, १४३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता औरंगाबादमध्ये एक हजार १४८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये ४० महिला आणि ७६ पुरूष रुग्णांचा समावेश आहे. **** पैठणच्या जायकवाडी जलाशयातून औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनीवरील फारोळा पंपगृहाचा वीज पुरवठा आज सकाळपासून सात तास बंद होता. महावितरणनं दुरुस्तीच्या कारणास्तव हा विद्युत पुरवठा बंद ठेवल्यामुळे शहर आणि सिडकोच्या पाणी वितरणावर परिणाम होणार असल्याचं महापालिकेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. **** आज जागतिक रक्तदान दिन. या निमित्तानं लातूर इथं दिव्यांगांनी रक्तदान केलं. लातूर इथं दिव्यांगांच्या सर्व प्रवर्गांसाठी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या सक्षम संस्था, केंद्र सरकारच्या सामजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. दिव्यांग नागरिक आणि त्यांच्या पालकांनी रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला. अकोला शहरातही दोन ठिकाणी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीनं घेतलेल्या शिबीराला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी आज रक्तदान केलं. **** लातूर महापालिकेचा अखर्चित राहिलेला १५ कोटी रुपयांचा निधी विकास कामांवर खर्च करण्याकरिता मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याचं महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी म्हटलं आहे. २०१७-१८ या वर्षासाठी मूलभूत सोयी सुविधा विकास योजनांतर्गत १० कोटी रुपये, तसंच विशेष रस्ता अनुदान योजनेत ५ कोटी रुपयांचा निधी लातूर शहर महानगरपालिकेला मिळाला होता. मात्र तत्कालीन परिस्थितीत निर्णयाच्या अभावामुळे हा निधी अखर्चित राहिलेला होता. २ वर्ष उलटूनही निधी खर्च न झाल्याने राज्य शासनानं हा निधी वापराकरिता स्थगिती दिलेली होती. **** लातूर शहरातल्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिऑपॅथिक गोळ्यांच्या वाटपाला आज पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. **** हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे कोर्टा आणि चोंडी गावाजवळ पावसाचं पाणी अडून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे सोयाबीन आणि हळद पिकांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. *****
0 notes