आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
न्याय आपल्या दारी ही न्यायालयाची संकल्पना, सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांचं प्रतिपादन, मुंबईत उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचं भूमिपूजन
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग, तसंच नव्या सांस्कृतिक धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी २३७ कोटींपेक्षा अधिक निधी वितरणाचा शासन आदेश जारी
स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत देशभरात तीन कोटीहून अधिक नागरिकांचा ऐच्छिक श्रमदानात सहभाग, मराठवाड्यातही मोहिमेअंतर्गत स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी
आणि
पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता, जालना जिल्ह्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
सविस्तर बातम्या
न्याय आपल्या दारी ही न्यायालयाची बदललेली संकल्पना असल्याचं, सरन्यायाधीश डॉ.धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यावेळी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाने अनेक राष्ट्रीय व्यक्तीमत्व दिले असून, त्याचा वारसा हा सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय क्षेत्रात पसरलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचं हे नवीन संकुल सर्वांसाठी प्रवेशयोग्य असेल, असं सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना, भारताची लोकशाही बळकट करण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद केलं. आरोपीला तत्काळ शासन व्हावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे, आणि त्यासाठी सक्षम न्यायव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवेत, असं ते म्हणाले.
****
पुणे जिल्ह्यातल्या शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग तयार करण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. या २०५ किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास १४ हजार ८८६ कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचं काम बीओटी तत्वावर करण्यात येईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर २००८ च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल. या मार्गासाठी दोन हजार ६३३ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात येणार आहे.
लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु सं�� तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे असं करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देणं, आपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करुन जागतिक पातळीवर राज्याचं सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणं, या दृष्टीनं हे धोरण तयार केलं आहे. या धोरणाचा दर पाच वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे.
राज्यातल्या सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ करण्यास, कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्यास, ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ, तर राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास देखील मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
राज्यातल्या १४ आयटीआय संस्थांचं नामकरण करणं, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये अनुदान, दूध अनुदान योजना सुरु राहणार असून, उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचं अनुदान, देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
करदात्यांचं हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा, धान उत्पादकांना आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर देणं, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचं एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद निर्माण करणं, एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणं, आणि जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणं, आदी निर्णय देखील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
राज्यात जून २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं, मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं.
****
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निडवणुकीच्या अनुषंगाने ते पक्ष कार्यकर्त्यांशी तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर इथं येत आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी येत्या २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
****
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण काल छत्रपती संभाजीनगर इथं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. २०१८ ते २०२२ या वर्षातले पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. केवळ स्पर्धेपुरतं गाव स्वच्छ ठेवू नका, तर गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती असल्याचं, पाटील यावेळी म्हणाले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत देशभरात आतापर्यंत पंधरा लाखांहून अधिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तीन कोटी नागरिकांनी ऐच्छिक श्रमदानात सहभाग घेतला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्यावतीनं काल "हम होंगे कामयाब" हे महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं ‘सफाई मित्र सुरक्षा’ शिबिरही घेण्यात आलं. यात सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसंच एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत रोपट्यांचं वाटप करण्यात आलं. हिंगोलीतही नगरपालिकेच्या वतीनं चीरागशह दर��गा तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
****
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी इथं सुरु असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने काल राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्यात आला. लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काल बंद ठेवण्यात आला. नांदेड इथं बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरासह तालुक्यात संपूर्ण बंद पाळण्यात आला.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मुडी इथल्या युवकानं मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात काल धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या मगणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजानं पारंपरिक वेशात शेळ्या-मेंढ्यांसह लातूर शहरातल्या अहिल्याबाई होळकर चौकात तब्बल तीन तास आंदोलन केलं. तर निलंगा, अहमदपूर आणि उदगीर तालुक्यात आंदोलनं करीत धनगर समाज रस्त्यावर उतरला होता. तर दुसरीकडं बंजारा समाजानेही लातूर शहरातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मोर्चा काढला होता.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार नोंदणी करतांना बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदण्याचे प्रयत्न झाल्याचं काही ठिकाणी उघडकीस आलं आहे. अशा प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. दोन ठिकाणी मतदार यादीत नाव असलेल्या नागरीकांना फॉर्म क्रमांक सात भरुन नाव वगळण्यासाठी येत्या ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
****
आर्थिक अडचणीत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्हावासियांनी पुढे येऊन भाग भांडवलातून २०० कोटी रुपये जमा करण्यासाठी मदत करावी, असं आवाहन संनियंत्रण समितीचे सदस्य सच्चिदानंद नाईकवाडी यांनी केलं आहे. ते काल वित्तिय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. वित्तिय संस्था आणि नागरिकांना वैयक्तिक सभासद करून घेऊन संस्थांकडून २५ हजार तर शेतकरी, नोकरदार, नागरिकांकडून १० हजार रुपये भाग भांडवल घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
****
हवामान
हवामान विभागानं मराठवाड्यातल्या परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसाठी पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरीत जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. घनसावंगी तालुक्यातल्या अंतरवाली दाई इथं शेतात भूस भरत असलेल्या अशोक गंधाखे या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. वीज कोसळल्याच्या दोन घटनांमध्ये दोन जनावरे दगावली.
****
0 notes
Alandi: राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा देणारे, सन्मार्गाची दिशा देणारे हे वारकरी पंथीय आहेत - एकनाथ शिंदे
एमपीसीन्यूज -आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत ह. भ. प गुरुवर्य मारूती महाराज कुऱ्हेकर बाबा (Alandi)यांचा 93 वा व रामायणाचार्य ह.भ.प रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचा 70 अभिष्टचिंतन व गौरव दिन सोहळा पार पडला.या निमित्त कुऱ्हेकर बाबा यांना शांतीब्रम्ह व ढोक महाराज यांना तुलसीदास पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची…
0 notes