Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 August 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा. ****
‘नवीन केंद्रीय शैक्षणिक धोरण’ हे सर्वांना समान संधी देणारं असून या धोरणात शिक्षणाबरोबरच संशोधनावर भर दिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत ‘उच्च शिक्षणात परिवर्तनात्मक सुधारणांसंबंधीच्या संमेलना’चं दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन झालं, यावेळी केलेल्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान बोलत होते.
या धोरणाद्वारे विद्यार्थांना जागतिक स्तरावरील शिक्षण दिलं जाणार असून, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच दिलं जाणार असून त्यामुळे विद्यार्थांचा पाया पक्का होईल असं ते म्हणाले. हे शैक्षणिक धोरण भविष्याचा विचार करुन तयार केलेलं असून, यात शिक्षण आणि संशोधनातली दरी कमी करण्यात आली तसंच सर्जनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड दिली असल्याचं ते म्हणाले. आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी हे शैक्षणिक धोरण अत्यंत उपयुक्त असल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
देशभरात गेल्या २४ तासांत कोविड रुग्णांच्या संख्येत ६२ हजार ५३८ ने वाढ झाली. रुग्णसंख्येत ५० हजारापेक्षा वाढ होण्याचा आजचा सलग नववा दिवस आहे. त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या २० लाख २७ हजार ७४ झाली आहे. यापैकी १३ लाख ७८ हजार १०५ म्हणजेच ६७ पूर्णांक ९८ शतांश टक्के रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात ८८६ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला, आतापर्यंत या संसर्गाने झालेल्या मृत्यूंची संख्या ४१ हजार ५८५ झाली आहे. हा मृत्यूदर आता २ पूर्णांक शून्य ५ शतांश टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. सध्या देशात ६ लाख ७ हजार ३८४ रुग्णांवर विविध रुग्णालयांमधून उपचार सुरू आहेत. दरम्यान, देशभरात आतापर्यंत दोन कोटी २७ लाख ८८ हजार ३९३ नमुन्यांची कोविड संसर्ग चाचणी करण्यात आली आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेकडून ही माहिती देण्यात आली.
****
बृहन्मुंबई महापालिकेनं बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना बिहारला परत जाण्याची परवानगी दिली आहे. पाटण्याचे पोलीस अधीक्षक असलेले तिवारी गेल्या रविवारी अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी मुंबईत आले होते. मात्र मुंबईत येताच त्यांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारत १५ ऑगस्टपर्यंत विलगीकरणात पाठवण्यात आलं होतं. मात्र बिहार पोलिसांच्या विनंतीवरून, विलगीकरणाचा काळ पूर्ण होण्याच्या आठवडाभर आधीच त्यांना विलगीकरणातून सोडण्यात आलं, असं बृहन्मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज अंमलबजावणी संचालनालय - ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली. ही चौकशी पुढे ढकलण्याची रियाची मागणी ईडीने फेटाळून लावली होती.
****
६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले अभिनेते आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याला मज्जाव करणारे महाराष्ट्र सरकारचे दोन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल केले आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा धोका अधिक असल्यानं, ज्येष्ठ कलाकार तसंच तंत्रज्ञांना स्टुडिओत किंवा स्टुडिओबाहेर चित्रीकरण आणि संबंधित कामात सहभागी होण्यास मज्जाव करणारे दोन निर्णय राज्य सरकारने जारी केले होते. ज्येष्ठ कलाकार प्रमोद पांडे तसंच इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स संघटनेनं या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर आज निर्णय देताना, कोविड प्रतिबंधासाठीचे नियम सर्वांना सारखे लागू असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले नवे ९६ रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८७० झाली आहे. त्यापैकी ११ हजार ६७६ रुग्ण आतापर्यंत बरे झाले तर ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुर��� असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यावर औरंगाबाद इथं एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपली प्रकृती ठणठणीत असून, कोणती चिंता करू नये असं, खासदार चिखलीकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, खासदार चिखलीकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण चिखलीकर यांच्यावरही औरंगाबाद इथे कोरोना विषाणू संसर्गावर उपचार सुरू होते, ते या संसर्गातून मुक्त झाले असून, उद्या त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे.
****
सांगली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा धरण ८४ पूर्णांक ४४ शतांश टक्के भरलं आहे. त्यामुळे चार हजार चारशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील चार पूल पाण्याखाली गेले आहेत.
****
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 June 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ जून २०२० सकाळी ७.१० मि. **** ** टाळेबंदी शिथिलतेच्या तिसऱ्या टप्प्याची आजपासून अंमलबजावणी; सरकारी आणि खासगी कार्यालयं सुरू होणार ** अतिसौम्य लक्षणं असलेल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर घरीच उपचाराचा पर्याय ** राज्यात काल आणखी तीन हजार सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, ९१ जणांचा मृत्यू ** औरंगाबादमध्ये पाच तर जालन्यातही एका रुग्णांचा मृत्यू, औरंगाबादसह जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ ** खासगी रुग्णालयं कोरोना विषाणू बाधित रुग्णांची लूट करत असल्याचा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप आणि ** पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर साठ पैशांनी वाढ ** **** राज्यातल्या महत्त्वाच्या शहरातल्या सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आजपासून वाढणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपुरात आता १५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने कामावर यायची परवानगी दिली आहे. कमी कर्मचारी असलेल्या सरकारी कार्यालयात १५ कर्मचाऱ्यांना कार्यालयात येता येईल. सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस तरी कार्यालयात यावे लागेल. अन्यथा त्यांना पूर्ण आठवड्याची रजा द्यावी लागेल. याशिवाय खासगी कार्यालयांमध्येही १० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची रवानगी देण्यात आली आहे. शंभर पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या खासगी कार्यालयांना किमान १० कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवता येईल. दरम्यान, देशभरात आजपासून धार्मिक स्थळं, मॉल्स, हॉटेल्स. रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात ही सर्व बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. बेस्ट या मुंबईतल्या सार्वजनिक बस वाहतूक उपक्रमानं आजपासून बस गाड्यांमधून, सुरक्षित अंतर राखत प्रवास करू देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बस गाड्यांमध्ये डाव्या आणि उजव्या दोन्ही रांगांमध्ये, दोन जणांकरता असणाऱ्या प्रत्येक आसनावर, एकाच प्रवाशाला बसायची, तसंच उभ्यानं, केवळ पाच प्रवाशांना प्रवास करायची अनुमती असेल. या अनुषंगानं सर्व प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन, बेस्ट उपक्रमानं केलं आहे. **** निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीपोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याला ७५ कोटी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुलनेनं कमी नुकसान झालं आहे, मात्र या ठिकाणी देखील आढावा घेऊन मदतीसंबंधी निर्णय घेतला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी या चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा काल आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते. रायगड जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मोठा फटका बसला असून, या संकटकाळात सरकार पूर्ण ताकदीनं कोकणवासियांच्या पाठीशी उभं राहील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नुकसान भरपाईची काही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आगाऊ देऊन पंचनामे होताच ती तात्काळ आपत्तीग्रस्तांना देण्यात येईल, असं मुख्य सचिव अजोय मेहता यांनी यावेळी सांगितलं. तसंच वीज यंत्रणेतल्या पायाभूत सुविधा उभारण्याचा अनुभव असलेल्या संस्था आणि कंपन्यांना तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश महावितरणला दिल्याचंही ते म्हणाले. **** अतिसौम्य लक्षणं असलेल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर त्याच्या संमतीनं शक्य असल्यास विलगिकरणासह घरीच उपचार करता येणार आहेत. गृह विलगिकरणातील रुग्णांना लक्षणं आढळल्यापासून किंवा चाचणीसाठी नमुना घेतल्यापासून १७ दिवसांनी विलगीकरणातून मुक्त करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना काल राज्य सरकारनं जारी केल्या. यात रुग्णाला मागील दहा दिवसांत ताप आला नसल्यासही मुक्त होता येईल. विलगीकरण काळानंतर पुन्हा चाचणीची गरज नसल्याचही या सूचनेत म्हटलं आहे. अशा रुग्णाची आरोग्य विभागाकडून पाहणीनंतर त्याच्याकडून घरी राहण्याचं हमीपत्रं, रुग्णाची काळजी घेण्यारी व्यक्ती असणं, भ्रमणध्वनीत आरोग्य सेतु ॲपसोबतच आरोग्य विभागाशी सतत संपर्क ठेवणं गरजेचं असणार आहे. **** खासगी प्रयोगशाळातल्या कोरोना विषाणू चाचण्यांचे दर आठवडाभरात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रयोगशाळातल्या चाचण्यांच्या दर निश्चितीसाठी सरकारने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयसीएमआरने आरटी-पीसीआर तपासणीची सुविधा असलेल्या ४४ शासकीय आणि ३६ खासगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणीची मान्यता दिली आहे. खासगी प्रयोगशाळांसाठी आयसीएमआरने चार हजार ५०० रुपये इतकी दर निश्चिती केली होती. याकाळात तपासणी चाचण्यांसाठी आवश्यक असणारे किटस् परदेशातून आयात करावे लागत होते. मात्र आता असे किटस् देशातच तयार होत आहेत आणि उपलब्ध देखील आहेत. त्यामुळे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी वाटाघाटी करून कोरोना तपासणी दर निश्चित करण्याबाबत आयसीएमआरने कळवलं आहे. **** राज्यात काल आणखी तीन हजार सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांची संख्या ८५ हजार ९७५ झाली आहे. काल या आजारानं ९१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत तीन हजार ६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत ३९ हजार ३१४ रुग्ण विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. **** औरंगाबाद जिल्ह्यात काल पाच कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बारी कॉलनीतला ७० वर्षीय, कैलासनगरमधील ५६ वर्षीय आणि देवडी बाजारमधली ६० वर्षीय महिला, तसंच मुकुंदवाडीतल्या रोहिदास नगरमधला ८० वर्षीय, तर अल्तमश कॉलनीतल्या गल्ली क्रमांक आठमधील ७० वर्षीय पुरूषांचा समावेश आहे. यामुळे या आजारामुळे जिल्ह्यातल्या मृतांची संख्या १०४ झाली आहे. दरम्यान, काल जिल्ह्यातल्या बाधितांच्या संख्येनं दोन हजाराचा टप्पा पार केला. काल दिवसभरात ७० बाधित रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार २० झाली आहे. यापैकी एक हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये आंबेडकर नगरमध्ये चार, शिवशंकर कॉलनी, साई, तक्षशीला नगर, मोंढा परिसरात प्रत्येकी तीन, चिश्तिया कॉलनी, पैठण गेट, सिडको एन सेवन, बायजीपुरा, आंबेडकर चौक, पिसादेवी रोड, भावसिंगपुरा इथं प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आाहेत. बजाजनगर, हिना नगर, रशीदपुरा, सातारा परिसर, बौद्ध नगर, मिल कॉर्नर, रोजा बाग, देवदूत कॉलनी -बजाजनगर, देवानगरी, पदमपुरा, सिडको सिडको एन-नाईन, एन-थ्री, संभाजी कॉलनी एन-सिक्स, रेणुका माता मंदिर परिसर, , सिंधी कॉलनी, मुजीब कॉलनी, रोशन गेट, नंदीग्राम कॉलनी, गारखेडा, शिवाजी नगर, रवींद्र नगर, टिळकनगर, भीमनगर, जवाहर कॉलनी, जुना मोंढा, मुकुंदवाडी, संत ज्ञानेश्वर नगर, पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक नऊ, ठाकरे नगर, भवानी नगर- जटवाडा रोड, नागसेन कॉलनी, न्यू हनुमान नगर, न्यू बारी कॉलनी, कैलास नगर, शहानूरमियाँ दर्गा परिसर, ज्योती नगर, संजय नगर, रहेमानिया कॉलनी, तारांगण-पडेगाव, अमोदी हिल-पहाडसिंगपुरा आणि घाटी परिसर या भागात प्रत्येकी एकेक रुग्ण सापडला आहे. त्याचबरोबर गंगापूर तालुक्यातल्या दिवशी पिंपळगावातले तीन तर, बोरवाडी, खुलताबाद या भागातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. **** जालना जिल्ह्यात जाफराबादमधल्या एका ५२ वर्षीय व्यक्तीचा काल कोरोना विषाणूमुळे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला हा पाचवा बळी आहे. दरम्यान काल कोरोना विषाणूचे सहा नवीन रुग्ण आढळून आले. बाधितांमध्ये जाफराबाद शहरातल्या तीन तर घनसावंगी तालुक्यातल्या राजेगाव इथल्या तिघांचा समावेश आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता २०५ झाली आहे. उपचारानंतर कोरोनाविषाणूमुक्त झालेल्या २६ रुग्णांना काल सुट्टी देण्यात आली. **** हिंगोली जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. मुंबईहून आलेले हे सातही जण सेनगाव इथल्या विलगीकरण कक्षात दाखल होते. खबरदारी म्हणून सेनगाव शहरातला प्रभाग क्रमांक तीन आणि तालुक्यातलं चोंढी गाव प्रशासनानं कालपूर्णत: प्रतिबंधित केलं. **** नांदेड जिल्ह्यात काल नव्यानं दोन रूग्ण आढळले, यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १९२ झाली आहे. दरम्यान, काल तीन रुग्ण या आजारातून बरे झाले. सध्या ५३ रुग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत. **** उस्मानाबाद जिल्ह्यात वाणेवाडी इथंही एक जण काल विषाणूबाधित असल्याचं आढळून आलं, सहा दिवसांपूर्वी हा रुग्ण नवी मुंबईहून गावी आला होता. लातूर जिल्ह्यातही औसा तालुक्यातल्या येल्लोरीचा एक जण बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे, हा रुग्णही मुंबईहून आलेला आहे. **** बीड जिल्ह्यात एका रुग्णाचा अहवाल बाधित असल्याचा प्राप्त झाला आहे. हैदराबादवरून आलेल्या झमझम कॉलनीतल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीला ही लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही ७० झाली आहे. **** नाशिक जिल्ह्यात ६८, धुळे जिल्ह्यात दहा, रत्नागिरी जिल्ह्यात १८, चंद्रपूर जिल्ह्यात ११, अहमदनगर जिल्ह्यात काल पाच, रायगड जिल्ह्यात ८२, अमरावती शहरात चार, आणि गडचिरोली जिल्ह्यात दोन नवे रुग्ण काल आढळले. **** खासगी रुग्णालयं कोरोना विषाणू बाधित रुग्णांची लूट करत असल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यांनी काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. खासगी रुग्णालयांमध्ये ज्या रुग्णानी अवाजवी बीलं भरली, त्यांना ती रक्कम परत करण्याची मागणी दरेकर यांनी केली. ते म्हणाले, खाजगी हॉस्पिटल या ठिकाणी अवाजवी पैसे चार्ज करतात एकीकडे सरकार म्हणतं की प्रत्येकाला आम्ही जन आरोग्य खाली देऊ तर मग आधी तुम्ही करा ही हॉस्पिटल माझी मागणी आहे माझी मागणी या ठिकाणी पंचवीस हजारापासून दहा –दहा पंधरा – पंधरा लाखांचे बिल भरले त्यांची बिल ही राज्य सरकारने परत केली पाहिजेत आणि त्याकरता टोकाचा आग्रही राहील प्रसंगी आंदोलन करावं लागलं तरी याच्या पुढे जातील जे खाजगी हॉस्पिटल अॅलडमिट आहेत त्यांना जन आरोग्य खाली आना किंवा त्यांना speciali individual केस जन आरोग्य मध्ये सांभाळून घ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार कोरोना विषाणू प्रादुर्भावाची आपत्ती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, दरेकर यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटी परिसरातल्या कोरोना सेंटरची पाहणी केली. **** राष्ट्रीय हॉटेल मॅनेजमेंट संयुक्त प्रवेश परीक्षा परिषदेनं २०२० या वर्षासाठीच्या प्रवेश परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढं ढकलल्या आहेत. सध्याची परिस्थिती आणि उमेदवारांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी म्हटलं आहे. नवी तारीख कालांतरानं जाहीर करण्यात येईल, असंही ते म्हणाले. **** पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर साठ पैसे याप्रमाणे वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चं तेल चाळीस डॉलर प्रतपिंप असं महागल्यानं इंधनांची किंमत वाढली आहे. दरम्यान, टाळेबंदीत इंधनाची मागणी कमी झाल्यानं इंधनांच्या किंमती स्थिर होत्या. **** कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काम करणाऱ्या वैद्यकीय आणि इतर सर्वच विभागांतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात काल व्यापारी महासंघाच्या वतीनं जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदला जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, प्रत्येक रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यातले सर्व व्यापारी प्रतिष्ठानं, दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी केलं आहे. **** कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महिला शेतकरी कुटुंबांना खरीपाच्या पेरणीसाठी मदतीचा हात म्हणून, परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठच्या सर्वोदय लोकसंचलित साधन केंद्रानं ५० टक्के उधारीवर खत आणि बियाण्यांची विक्री सुरू केली आहे. **** रुग्णालयातल्या डॉक्टर आणि आरोग्�� कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी ठाणे जिल्ह्यातले एक अभियंता प्रतिक तिरोडकर यांनी एक रोबोट विकसित केला आहे. कोरो-रोबोट असं या रोबोटचं नाव आहे. हा रोबोटमुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांसोबत थेट संपर्क करण्याची आवश्यकता असणार नाही. रोबोट चालवण्यासाठी प्रतीक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक ॲप विकसित केलं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून हा ॲप आणि रोबोटचं कार्य नियंत्रित केलं जातं. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कोरो-रोबोटला एक कॅमेरा जोडला असून त्याच्या मदतीने तो रुग्णांशी संवाद साधू शकतो या रोबोटला तीन ट्रे जोडलेल्या या रुग्णांसाठी आवश्यक वेगवेगळ्या वस्तू ठेवता येतात त्यातल्या ऑडिओ च्या सुविधेचा वापर करून रुग्णांना ट्रे मधलं सामान घेण्यापूर्वी आपल्या हातात निर्जंतूक करण्याची आठवण करून देतो इतकंच नाही तर तो स्वतः निर्जंतुक करून विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करतो या रोबोटच्या निर्मिती प्रतिक तिरोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मदत केली सध्या रोबोट कल्याण मधल्या होली क्रॉस या रुग्णालयात कार्यरत आहे तिथे त्याची कामगिरी पाहून मुंबई महानगर क्षेत्रातल्या सुमारे डझनभर रुग्णालयातून कोरो-रोबोटला मागणी आली ही मागणी एका महिन्यात पूर्ण करू असा विश्वास प्रतिक तिरोडकर यांच्या पी एन टी सोल्युशन्स या कंपनीने व्यक्त केला आहे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लवकरच डझनभर खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये हे कोरो रोबोट उपलब्ध करून देण्याचे संकेतही दिले तुषार पवार आकाशवाणी प्रतिनिधी मुंबई **** निसर्ग चक्रीवादळामुळे पिकांबरोबरच पॉलिहाऊस आणि शेडनेटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शिर्डीचे आमदार भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या निमगाव जावळी इथं शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर काल ते बोलत होते. तहसील आणि कृषि विभागानं वडगाव मावळचा पॅटर्न राबवून पंचनाम्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याची सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली. **** परभणी जिल्ह्यात जिंतूर-घेवडा मार्गे इटोली या रस्त्याचं अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्टी न भरल्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अपघाताची होण्याची शक्यता असल्यानं, नागरिकांनी ही मागणी केली आहे. **** परभणी शहरातल्या कारेगाव रस्त्यावर नागरिकांनी जागतिक पर्यावरण दिन आणि वटसावित्री पोर्णिमेचं औचित्य साधून २०० वृक्षांची लागवड केली. **** परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं स्वस्त धान्य दुकानाचा काळा बाजार करणारे व्यापारी विजय शर्मा यांच्या शर्मा ट्रेंडिंग गोदामावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी स्वस्त धान्य दुकानाचे गहू, तांदूळ मोठ्या प्रमाणात आढळून आले तर धान्याने भरलेला ट्रक जप्त करण्यात आलं. **** गंगाखेड ते परभणी रस्त्यावर असलेल्या भुसार दुकानास आग लागून आठ ते दहा लाख रुपयांचं नुकसान झालं. काल दुपारी ही आग लागली. या दुकानात कापूस, गहू, ज्वारीचे पोते मोठ्या प्रमाणावर होते. अग्निशमन दलाच्या बंबासह सहा टँकरच्या सहाय्यानं आग विझवण्यात आली. **** ऑनलाईन शिक्षण पद्धतीत संवाद खुंटतो त्यामुळे विद्यार्थ्यांवर संस्कार होणार नाहीत असं मत भारतीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांनी व्यक्त केलं आहे. लातूरच्या बाप्पा गणेश मंडळाच्या वतीनं शिक्षण क्षेत्रावर आधारीत संवादातून समृद्धीकडे या विशेष ऑनलाईन परिसंवादात ते काल बोलत होते. शिक्षणासोबतच संस्कार, नीतिमूल्ये शिकवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते, यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. टाळेबंदी नंतरची शिक्षणपद्धती याविषयी बोलताना प्रा डॉ दीपक वक्रांनी यांनी, कोरोनाचा या संकटाला संधी म्हणून बघितले तर संकट निघून जाईल, असं सांगितलं. **** कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारनं राज्यातल्या सहकारी संस्थेचा वार्षिक अहवालाची छपाई खर्च आणि इतर खर्च टाळून या खर्चातली ८० टक्के रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करून घ्यावी, अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. ज्या साखर कारखान्यातून सॅनिटायझर निर्मिती केली जात आहे त्या कारखान्याने संबंधित सभासदांना पाच लिटर मोफत सॅनिटायझर द्याव, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. **** हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं डॉक्टर असोसिएशन आणि शिवसेनेच्या वतीनं काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. यावेळी ९० जणांनी रक्तदान केलं. **** आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा-कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग, तसच बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग आणि पश्चिम बंगाल सिक्कीम आणि ओदिशाच्या काही भागात, नैऋत्य मोसमी पावसाची पुढची वाटचाल होण्यासाठी, येत्या दोन दिवसात परिस्थिती अनुकूल होईल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. कोकणात आज बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. **** शेतातल्या विहिरीतून जलवाहिनी घेण्यासाठी खोदकाम करणाऱ्या जेसीबी यंत्रानं चिरडल्यानं एका शेतकऱ्यासह त्याचा मुलाचा काल मृत्यु झाला. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ६१ नजिकच्या मारफळा तांडा इथं काल पहाटे ही घटना घडली. पहाटेच्या अंधारात, जेसीबी चालकाला ऐनवेळी हे लक्षात न आल्यानं हे यंत्र थेट दोघांच्या अंगावर गेल्यानं वडिलाचा जागीच मृत्यु झाला तर, गंभीर जखमी मुलाचा रुग्णालयात मृत्यु झाला. जेसीबी चालकानं घटनास्थाळावरुन पलायन केलं. **** नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या घुंगराळा गावच्या बस स्थानकाजवळ दुचाकीवर गावाकडे परत जाणाऱ्या वडील आणि मुलीचा अपघातात मृत्यू झाला. या दुचाकीस मालमोटारीने धडक दिली. कंधार तालुक्यातल्या बाचोटी इथं नातेवाईकाच्या लग्नावरुन हे दोघे गावी परत जात होते. *** हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी तिघांचा जामगव्हाण जवळच्या इसापूर धरणात बुडून मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. या तिघांचेही मृतदेह सापडले असून, तिघेही हिंगोलीचे रहिवासी होते. शिवम चौंढेकर, रोहित चित्तेवार आणि योगेश गडप्पा अशी मृतांची नावं आहेत. **** हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारुन साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल काल जप्त केला. चार ठिकाणी छापे मारुन ही कारवाई करण्यात आली असून, या पथकानं दहा जणांना ताब्यात घेतलं आहे. **** परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातल्या जवळा जिवाजी इथून विनापरवाना पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पो बस चालकावर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या पथकानं काल कारवाई केली. या वाहनातून १५ ��्रवासी प्रवास करत होते. वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यात ताडोबा कोअर झोन परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना उघडकीस आली. या आठवड्यातील ही दुसरी, तर मागील तीन महिन���यांतली या परिसरातली ही पाचवी घटना आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. ****
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 May 2020 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ मे २०२० दुपारी १.०० वा. **** राज्यातली सध्याची कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची स्थिती पाहता रेड झोनमधली विमानतळं सुरू करणं अत्यंत धोकादायक आहे, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. लाळेचे नमुने घेऊन चाचणी केल्याशिवाय प्रवाशांचं केवळ थर्मल स्कॅनिंग करणं पुरेसं नाही. रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालवणंही शक्य नाही. त्यामुळे कोरोनाबाधित प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तिथला धोका वाढवणं चुकीचं आहे, असं त्यांनी ट्विटर संदेशाद्वारे म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात विमानसेवा सुरू होणं कठिण असल्याचं स्पष्ट झालं आहे. विमानसेवा सुरू केल्यानंतर प्रवाशांना १४ दिवसांच्या विलगीकरणातून सूट देणं शक्य असल्याचं हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं होतं. पण अनेक राज्यांनी विलगीकरणाचे नियम शिथिल करण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्राबरोबरच पंजाब आणि छत्तीसगड सरकारनंही देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याला विरोध केला आहे. **** भारतीय रेल्वेकडून संपूर्ण देशात एक जूनपासून रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे. प्रवाशांना आरक्षण केलेल्या स्थानकाशिवाय अन्य स्थानकावर रेल्वेतून खाली उतरता येणार नाही. या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवावं लागेल आणि इतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. वातानुकूलित बोगीमध्ये प्रवाशांना बेडशीट, पांघरूण, उशी, बेडरोल हे साहित्य मिळणार नसल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे. **** जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू बधित रुग्णांमध्ये आज आणखी सहा रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा साठ झाला आहे. नवीन रुग्णांमध्ये अंबड तालुक्यातल्या यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिघांचा, जालना शहरातल्या एका खासगी रुग्णालयातल्या महिला कर्मचाऱ्यासह पुष्पकनगरातील एका व्यक्तीचा आणि जालना तालुक्यातल्या निरखेडा इथल्या एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात ४७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** लातूर जिल्ह्यात नातेवाईकांच्या वादाचं रुपांतर मारामारीत झालं आणि यात दोन जणांची हत्या झाली. निलंगा तालुक्यातल्या बोळेगाव इथं आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईला राहणाऱ्या आणि नुकतंच गुजरातहून ट्रक घेऊन आलेल्या एका जणाला घरात अलगीकरणात रहायला सांगितल्यानं वाद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शहाजी पाटील आणि वैभव पाटील अशी मृतांची नावं आहेत. या घटनेसंदर्भात कासारशिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ५ जणांना अटक करण्यात आली आहे. **** सातारा जिल्ह्यात काल ७७ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे साताऱ्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता २७८ झाली आहे. जिल्ह्यात सध्या १५८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ११४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. **** सांगली जिल्ह्यात आणखी ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. सांगलीत आतापर्यंत कोरोनाचे अठ्ठ्याहत्तर रुग्ण आढळले असून, २ जणांचा मृत्यू झाला आहे. ४३ जण बरे झाले आहेत, तर ३३ रुग्ण उपचार घेत आहेत. **** चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे. काल रात्री उशिरा ४ जणांचे अहवाल कोरोनाबाधित असे आले आहेत. यापैकी दोन रुग्ण शासकीय रुग्णालयात आणि दोन रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे, तर इतर १८ जणांवर उपचार सुरू आहेत. **** अमरावती इथं आज पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यात एका पाच वर्षीय बालिकेचा, तर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयात परिचारिका असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १५७ इतकी झाली आहे. **** राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकातून झारखंड राज्यातल्या हातिया स्थानकाकडे श्रमिक विशेष रेल्वे काल रवाना करण्यात आली. जिल्ह्यातून सोडण्यात आलेल्या या चौथ्या श्रमिक रेल्वेतून १ हजार ५४५ मजूर आणि कामगार झारखंडकडे रवाना झाले. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्रवाशांना अन्नाची पाकिटं, पाण्याच्या बाटल्या, मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं. ****
0 notes