Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
औरंगाबाद इथं आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच लोकार्पणासह छत्रपती संभाजीनगर नामफलकाचं अनावरण
राज्यातल्या दुष्काळी पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीवर अनाठायी खर्च-विरोधकांची टीका
राज्यगीतातले शब्द सार्थकी ठरवण्यासाठी सरकार कार्यरत-सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची येत्या सहा ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर सुनावणी
आणि
उद्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन;विभागात विविध कार्यक्रमांना उत्साहात प्रारंभ
****
औरंगाबाद इथं आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन तसंच महानगरपालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीसाठी राज्य मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य, विविध विभागांचे सचिव आणि अधिकारी वर्ग औरंगाबाद शहरात दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे आज सकाळी शहरात येणार असून, नऊ वाजेच्या सुमारास शहरातल्या विविध प्रकल्प इमारतींचं ऑनलाईन भूमीपुजन, लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं ई - भूमीपुजन, सातारा आणि देवळाई परिसरातल्या मलनि:स्सारण योजनांचं ई भूमीपुजन, हसूल इथल्या घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई लोकार्पण आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युमेंट्री फिल्म आणि पोस्टल कव्हर प्रकाशन होणार आहे. छत्रपती संभाजीनगर तालुका-जिल्हा-विभाग नामकरण फलकाचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे.
सकाळी ११ वाजता स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळाची बैठक होईल, आज रात्री क्रांती चौकात होणार्या गर्जा मराठवाडा या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण उद्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
दरम्यान, या कार्यक्रमांमुळे शहरातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
****
राज्यात दुष्काळ असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अनाठायी खर्च होत असून, येणाऱ्या काळात याचा जाब द्यावा लागेल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, २०१६ मध्ये औरंगाबाद इथं मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचं काय झालं, असा सवालही राऊत यांनी विचारला.
काँग्रेस पक्षानेही मंत्रिमंडळ बैठकीसाठी होणाऱ्या खर्चावरून सरकारवर टीका केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने जनतेच्या पैशाची उधळपट्टी करुन स्थानिकांच्या जखमेवर सरकार मीठ चोळत असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
राज्यगीतातले शब्द सार्थकी ठरवण्यासाठी आपलं सरकार कार्यरत असल्याचं, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या औचित्यानं घेण्यात आलेल्या नाट्य स्पर्धेचा पारितोषिरक वितरण सोहळा, काल औरंगाबाद इथं झाला, या सोहळ्यात पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुनगंटीवार बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी नोव्हेंबर महिन्य��त इंग्लंडला जात असल्याचं त्यांनी सांगितलं...
‘‘मी अशा काळामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री झालो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साडे तीनशेवा सोहळा आहे. आणि हे माझं सौभाग्य आहे, की ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ते वाघनखं आणायला आम्ही नोव्हेंबरमध्ये चाललोय. आणि या ऊर्जेतून आमचा महाराष्ट्र, जे राज्यगीत आम्ही निश्चित केलंय, त्याचे शेवटचे शब्द यथार्थ आणि सार्थकी करेल, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा..’’
राज्यात ७५ नाट्यगृह उभारण्यात येत असून, लातूर आणि परभणी इथल्या नाट्यगृहांच्या प्रलंबित कामं पूर्ण केलं जाईल, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं...
‘‘जी नाट्यगृह जीर्ण झालेली आहेत, त्यांना संजीवनी देण्याचा उपक्रम आहे. आपण निर्णय केला की आता ७५ ठिकाणी नवीन सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आता तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा लोकांना असा मंच उपलब्ध व्हावा. लातूर आणि परभणी या दोन्हीही जिल्ह्याची नाट्यगृहं अर्धवट आहेत. ही दोन्ही नाट्यगृहं मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमापासून तुम्ही ताबडतोब पूर्ण करावे, अशा सूचनाही आपण यानिमित्ताने दिल्या.’’
****
शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा असल्याचं प्रतिपादन, राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे 'शिखर सावरकर' पुरस्कार, राज्यपालांच्या हस्ते काल मुंबईत राजभवनात झालेल्या कार्यक्रमात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक लोकांच्या मदतीने किल्ल्यांच्या वारशाचं जतन केल्यास आणि जबाबदार पर्यटनाला चालना दिल्यास त्यातून किल्ल्यांचं संरक्षण होईल, आणि रोजगार निर्मिती देखील होईल, असं राज्यपालांनी सांगितलं. ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया यांना 'शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर मोहन हुले यांना 'शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावर्षीचा 'शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार' ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिरक्षणासाठी कार्य करणाऱ्या 'दुर्गवीर प्रतिष्ठान' या संस्थेला देण्यात आला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं येत्या सहा ऑक्टोबरला सुनावणीसाठी बोलावलं आहे. दोन्ही गटांनी प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत सुनावणीला उपस्थित राहावं असा आदेश आयोगानं दिला आहे. निवडणूक चिन्ह आरक्षण आणि वाटप आदेश १९६८ च्या तरतुदींनुसार या प्रकरणी, आयोग सविस्तर चौकशी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शरद पवार यांनी १९९९ मधे स्थापन केलेल्या या पक्षातून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट वेगळा झाला असून ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा या गटाने केला आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
औरंगाबाद इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठात आज मराठवाडा मुक्तिसंग्रामावर परिसंवाद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या परिसंवादात निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर, निवृत्त न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे, प्राध्यापक सुहास पळशीकर, प्राध्यापक गोपाळ गुरु, आणि मुकुंद कुलकर्णी यांचं सत्र होणार आहे. कांचनवाडी इथं विधी विद्यापीठात हा कार्यक्रम होणार आहे.
औरंगाबाद इथल्या क्रांती चौकातून काल विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. सुमारे पाच हजारावर विद्यार्थी यात सहभागी झाले, या विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती, योगासनं, मुष्टीयुद्ध, तसंच लेझीमची प्रात्यिक्षिकं सादर केली.
वेणुताई चव्हाण कन्या प्रशालेत किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला. वयात येतांना होणारे शारिरीक-मानसिक बदल, मासिक पाळी, आहार, व्यायाम याविषयी मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.
**
मुक्तिलढ्याचे विविध आयाम लक्षात घेतल्याखेरीज मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं महत्त्व समजणार नाही, असं मत, अभ्यासक सारंग टाकळकर यांनी व्यक्त केलं. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. निजामी राजवट आणि मुक्तीसंग्राम याबद्दल टाकळकर यांनी सविस्तर माहिती दिली.
डॉ रश्मी बोरीकर यांचं यावेळी 'लढ्यातील महिला क्रांतिकारक' या विषयावर व्याख्यान झालं. स्वतःच्या जीवाची, अब्रूची पर्वा न करता या महिला स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत शस्त्रास्त्रं पुरवण्याचं काम केलं, आणि मुक्तीसंग्रामानंतर महिलांनी समाजकारण आणि राजकारणात सहभागी होऊन महत्त्वाची भूमिका बजावली, असं बोरीकर यांनी सांगितलं.
****
हैदराबाद मुक्तीच्या लढ्यात मराठवाड्याचा सिंहाचा वाटा असल्याचं, इतिहास तज्ञ प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं, मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रभात फेरीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांना काल प्रारंभ झाला. बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्याच्या प्रमुख ठिकाणी आयोजित होत असलेल्या ‘गाथा मुक्तीलढ्याची’ या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुक्तिसंग्राम दिनानिमित्त परभणी इथं गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. आज विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येत आहे. उद्या सायंकाळी मराठवाड्याची लोकधारा या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे. पाथरी इथं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘पीएम रन फॉर स्कील’ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात 'जिल्हाधिकारी स्वातंत्र्य सैनिकांच्या दारी' ही मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कळमनुरीच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांनी काल आखाडा बाळापूर इथं हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून, प्रभातफेरी काढली, तसंच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुरभाजी पाटील हेंद्रे यांच्या घरी भेट देऊन, त्यांचा सत्कार केला. ��िवंगत स्वातंत्र्यसैनिक कोंडबाराव पाटील जरोडकर यांच्या वारसांचाही जिल्हाधिकारी पापळकर यांनी सत्कार केला.
वसमत इथं मराठवाडी बोलीचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या 'मराठवाडी बोली, बोलू कौतुके' या समूहाच्या सभासदांचा कथाकथन आणि काव्य वाचनाचा कार्यक्रम सादर झाला.
****
नांदेड इथं मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त आज आणि उद्या मॅराथॉन आणि जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. खेळाडू, विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, पुरुष आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात यात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केलं आहे.
****
मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव उस्मानाबाद जिल्ह्यात ���ेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. काल वाकेथॉन” वॉक फॉर नेशन ही प्रभातफेरी काढण्यात आली. विविध ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामाच्या शौर्यगाथा स्वातंत्र्यवीरांच्या इतिहासाचं वाचन करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी पथनाट्याद्वारे मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती दिली जात आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत ७५ दिवे लावून तसंच ७५ हजार वृक्षांची लागवड करून हा उत्सव साजरा केला जात आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्रामातल्या सशस्त्र लढ्याच्या आठवणी अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या आहेत. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात टाकळगाव इथले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक उद्धवराव पिंपळे यांनी या लढ्यात निजामाच्या पोलिस चौक्या उध्वस्त करण्याची जबाबदारी पार पाडली, आज ७५ वर्षांनंतरही ही आठवण सांगताना, त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो. ते सांगतात...
‘‘आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी २२ कॅम्प टाकले. प्रत्येक केंद्रामध्ये ३०/३५ माणसं होते. त्या केंद्रात दारुगोळा सगळा भरपूर होता. तिथून हत्यारं न्यायचे, बॉम्ब न्यायचा, आणि तहसील कार्यालयं उध्वस्त करायचे, करोडगिरी नाके उध्वस्त करायचे, माझ्यासंगट बारा कार्यकर्ते होते. चकलांबा, तलवाडा, गेवराई, पिंपळनेर, आणि बीड पाच पोलिस स्टेशन उध्वस्त केले. आणि मग रझाकारांनी बायांवर अत्याचार सुरू केला. अन मग तिकडून हे हे करत रणगाडे धाड धाड करीत आले अन खटा खटा खटा करत यंत्रणा ताब्यात घेतली, अन १७ सप्टेंबरला हैदराबाद मुक्त झाला.’’
****
राज्यातल्या ७५ नद्यांमधला गाळ काढण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेत नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात सगरोळी इथं, नदी की पाठशाला अंतर्गत, मन्याड नदी किनाऱ्यावरील १५० शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. काल सिद्धदयाळ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते या शिबीराचा प्रारंभ झाला. आमदार जितेश अंतापूरकर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ.जयंत कुळकर्णी, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेत १८ सप्टेंबर पर्यंत तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळणार आहे.
****
माजी मंत्री आदित्य ठाकरे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी पैठण इथं शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
****
लातूर जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यातले सर्व पाणीसाठे हे फक्त पिण्याच्या प्रयोजनासाठी आरक्षित केले आहेत. इतर कोणत्याही प्रयोजनासाठी पाण्याचा वापर करून नये, तसंच नागरिकांनी अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असं आवाहन लातूर पाटबंधारे विभागानं केलं आहे.
****
जालना शहर महानगरपालिकेत काल अभियंता दिवस साजरा करण्यात आला. सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया यांच्या स्मृतिंना अभिवादन करून, महापालिकेच्या विविध विभागातल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मधल्या शेवटच्या सामन्यात काल भारताला बांग्लादेशकडून सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. कोलंबो इथं झालेल्या सामन्यात बांग्लादेशनं प्रथम फलंदाजी करत २६५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला भारतीय संघ शेवटच्या षटकात २५९ धावांवर सर्वबाद झाला.
या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणार आहे.
****
हवामान
औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.
****
0 notes
गर्भधारणा आणि आयुर्वेद
माणसाच्या अस्तित्वाचा विचार करता प्रजोत्पादन म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीला जन्माला घालणे हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानवी जीवनात येतो, आजच्या वेगवान जगात या घटनेचे आयाम जरी बदललेले असले तरी आजही आपल्या आयुष्यात या घटनेचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच वंध्यत्वासारख्या समस्या आजही आपल्यासाठी कधीही गाठ पडू नये अश्या समस्या आहेत. त्यावर वेळोवेळी आपण लेखांच्या माध्यमातून समजून घेतले आहेच, आज समजून घेऊया मातेच्या उदरात गर्भ स्थापित झाल्यानंतर आयुर्वेदात कोणता हिताचा उपदेश केलेला आहे.
गर्भिणी स्त्रियांच्या बाबतीत सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा येतो तो पोषणाचा ! मुळात गर्भिणीचा आहार- विहार (दिनक्रम) यासंदर्भात गर्भाची नऊ महिन्यात विकसित होण्याच्या क्रमानुसार मांडणी आयुर्वेद करते, त्यामुळे गर्भिणी स्त्रीला तिच्या स्वतःच्या आणि गर्भाच्या पोषणासाठी बाहेरून घेतल्या जाणाऱ्या भाराभर व्हिटामिन आणि तत्सम कोणत्याही द्रव्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. आपल्या स्त्रीरोगतज्ञांनी सांगितलेल्या सूचनांसह आपण या दिनक्रमाचा अवलंब सहज करू शकता, त्याशिवाय गर्भिणीच्या लहान मोठ्या सर्वच आरोग्य समस्या जसे की, पहिल्या तीन महिन्यात असलेली मळमळ, उलटी, अन्नावरची वासना नसणे, आम्लपित्त, क्वचितप्रसंगी जुलाब अश्या समस्या गरोदरपणाच्या सुरुवातीपासूनच शास्त्रोक्त आहाराची योजना पाळली असता दूर ठेवता येतात, त्यातूनही काही समस्या उद्भवल्या असता प्रत्येक महिन्या��ा भिन्न अश्या काही मातेच्या आरोग्यास आणि गर्भाच्या पोषणास उपकारक औषधींचा उपयोग अत्यंत प्रभावीपणे आपले वैद्य आपल्यासाठी करू शकतात, या औषधींना मासानुमासिक काढे असे म्हटले जाते, कालानुरूप काढा या माध्यमातून औषधी घेणे ज्यांना असुलभ वाटते त्यांना गोळ्यांच्या माध्यमातून तीच औषधी दिली जाते. या औषधांचा उपयोग सर्वच गर्भिणीसाठी आवश्यक आहे, ज्यांना काही समस्या आहेत त्यांनीच त्याचे सेवन करावे असा लक्षणांवर आधारित हा उपक्रम नाही याची कृपया नोंद घेऊया.
चला तर मग, आपण स्वतः किंवा आपल्या परिचितांपैकी जे कुणी आयुष्याच्या या महत्वाच्या टप्प्यातून प्रवास करीत आहेत त्यांना आयुर्वेदाच्या वाटेवर आणूया आणि त्यांच्या आयुष्यात आरोग्यरूपी प्रकाश आणायला मदत करूया!
शुभं भवतु!
वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
आयुर्वेद वाचस्पती
संपर्क: 9049603419
छत्रपती संभाजीनगर
0 notes