Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 September 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ सप्टेंबर २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· कोरोना विषाणू संसर्गाच्या मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
· राज्यात तीन हजार ६२६ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात सात जणांचा मृत्यू तर १५५ बाधित
· बीड जिल्ह्यातलं माजलगाव धरण १०० टक्के भरलं, नांदेडच्या विष्णुपुरीचे ९ दरवाजे उघडले
· औरंगाबाद शहर अमृत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मिळवून देण्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं आश्वासन
आणि
· चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर १५७ धावांनी दणदणीत विजय
****
कोरोना विषाणू संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत, असे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना दिले आहेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, त्यामुळे जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सण, उत्सव आज साजरे झाले नाहीत तर उद्या नक्की साजरे करता येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. शासनानं वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचं पालन करावं, सार्वजनिक कार्यक्रम टाळावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
****
गर्दी होईल असे राजकीय कार्यक्रम घेण्यास पक्षाच्या वतीनं मनाई करण्यात आली असून, तसे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी पाऊले टाकली पाहिजेत ही पक्षाची भूमिका असल्याचंही, मलिक यांनी स्पष्ट केलं.
****
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना आपण बालकांची पोषणाची गरज पूर्ण करून, सुदृढ कुटुंबाचा पाया रचू या असं आवाहन, केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री स्मृती ईराणी यांनी केलं आहे. पोषण अभियानाअंतर्गत काल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात, त्या बोलत होत्या. प्रत्येक कुटुंबानं, समाजानं गर्भवती आणि बालकांच्या पोषणाची जबाबदारी घ्यायला हवी, पोषण अभियान ही फक्त धोरणात्मक मोहीम नाही, तर जन अभियान आहे असं त्या म्हणाल्या.
****
राज्यात काल तीन हजार ६२६ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ८९ हजार ८०० झाली आहे. काल ३७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३७ हजार ८११ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल पाच हजार ९८८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ७५५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक शून्य नऊ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ४७ हजार ६९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १५५ नव्या कोविड बाधितांची नोंद झाली, तर सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या पाच, तर औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात काल ५४ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ४५, औरंगाबाद २४, जालना १६, लातूर १३, तर नांदेड जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
राज्यभरात काल पोळा सण उत्साहात पारंपारिक पद्धतीनं कोविडचे नियम पाळून साजरा झाला. नांदेड, परभणी सह ग्रामीण भागात सर्वत्र शेतकरी वर्गाने बैलांना सजवून त्यांची पूजा केली.
बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा जिवापाड सांभाळ करणाऱ्या ५१ पशुपालकांचा नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात मालेगाव इथं काल सत्कार करण्यात आला. बैलपोळा सणाच्या निमित्तानं शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी या पशुपालकांना सन्मानित केलं.
****
मराठवाड्यात पावसानं नद्यांना आलेल्या पुरात काल पाच जण वाहून गेल्याची घटना घडली.
बीड जिल्ह्यात रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला, या पावसात वडवणी तालुक्यातल्या पिंपरखेड नदीला मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यात याच गावातले मधुकर रोहिदास खळगे, अजय मधुकर खळगे आणि अजय उजगरे हे तिघे वाहून गेले. पोलिसांना आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर आढळून आले आहेत.
परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या सायाळा-सुनेगाव इथला ४५ वर्षीय शेतकरी काल सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास नदीपात्रात पडून वाहून गेला. सुधाकर सूर्यवंशी असं त्यांचं नाव असून, काल सायंकाळी उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही.
दरम्यान, गोदावरी नदीच्या पात्राच्या बॅक वॉटरच्या पाण्यानं इंद्रायणी नदी दुथडी वाहत आहे. परिणामी सुनेगाव इथल्या नदीपात्रातली वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. रुमणा, जवळा, सायाळा-सुनेगाव, खळी या नदीकाठच्या गावातल्या नागरीकांना धोक्याची सूचना दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात एका व्यक्तीचा काल नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. अण्णासाहेब ठोंबरे असं या व्यक्तीचं नाव असून, ते कन्नड तालुक्यात देवगाव रंगारी इथं शिवना नदीत बैल धुण्यासाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले. काल सायंकाळी त्यांचा मृतदेह सापडला.
बीड जिल्ह्यातलं माजलगाव धरण १०० टक्के भरलं असून, धरणाचे ११ दरवाजे दीड मीटर उंचीनं काल उघडण्यात आले. धरणातून सध्या ६२ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
नांदेड शहरालगतच्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे ९ दरवाजे काल उघडण्यात आले. प्रकल्पाच्या खालच्या भागात गोदावरी नदी दुथडी वाहत आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, नांदेड शहर आणि शासकीय दुध डेअरी शाळेला जोडणाऱ्या संत दासगणू महाराज पुलावर पुराचं पाणी आलं आहे. यामुळे या पुलावरून होणारी रहदारी काल बंद करण्यात आली.
****
राजकीय दृष्ट्या समर्थ असलेला पण जात पात आणि धर्माच्या संर्घषात आकांत बुडलेल्या भारतात, ईस्ट इंडिया कंपनीच्या रुपाने, सतराशे सत्तावन मध्ये एका नव्या शोषकाची भर पडली, त्यानंतर अनितीचा आणि गैरमार्गाचा वापर करुन, ईस्ट इंडीया कंपनीनं आपलं साम्राज्य वाढवलं, असं मत, नांदेड इथल्या पिपल्स महाविद्यालयातले इतिहास विषयाचे प्राध्यापक, डॉ. बालाजी चिरडे यांनी व्यक्त केलं आहे. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं आयोजित आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत डॉ चिरडे यांनी, ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनापासून ते सतराशे सत्ताव्न्न् च्या प्लासीच्या लढाईपर्यंतच्या घडामोडींचा आढावा घेतला. ते म्हणाले..
ईस्ट इंडिया कंपनी १७५७ मध्ये बंगालमध्ये सत्तेत आली. आणि पुढील शंभर वर्षात संपूर्ण भारतावर त्यांनी ताबा मिळवला. राजकीय दृष्ट्या समर्थ असलेला, सामाजिक दृष्ट्या जाती जातीत विभागलेला, दलितांना स्त्रियांना दुय्यम लेखून त्यांचं प्रचंड शोषण करणाऱ्या भारतात एका नव्या शोषकाची भर पडली. कोणतीही दया माया न दाखवता बेमुर्वतखोरपणे सगळ्या अनितेचा गैरमार्गाचा वापर करुन कंपनीने आपले साम्राज्य वाढवले…..
डॉ चिरडे यांचं हे व्याख्यान आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जाणार आहे. तसंच हे व्याख्यान आकाशवाणी समाचार औरंगाबाद - AURANGABAD AIR NEWS या यू- ट्यूब चॅनेलवर ऐकता येईल.
****
औरंगाबाद शहरासाठीच्या नवीन पाणीपुरवठा अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निधी मिळवून देण्याचं आश्वासन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिलं आहे. या प्रकल्पाची काल डॉ कराड यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी, एक हजार ६८० कोटी रुपयांच्या योजनेची माहिती दिली. औरंगाबाद शहराचा महापौर म्हणून काम केलेलं असल्यानं, शहराचा पाणी प्रश्न आपल्याला जवळून माहिती असल्याचं, कराड म्हणाले. महानगरपालिका प्रशासनानं यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी निधी मिळवून देण्याचं आश्वासन देतानांच, कराड यांनी, ही योजना तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत दिले.
****
ओव्हल इथं झालेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तब्बल ५० वर्षानंर भारताला ओव्हल मैदानावर विजय मिळाला आहे. भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करत विजयासाठी ठेवलेल्या ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, इंग्लंडचा संघ २१० धावांवर तंबूत परतला. उमेश यादवनं तीन, तर शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी दोन बळी घेतले. या विजयामुळे भारतानं मालिकेत दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला अखेरचा पाचवा कसोटी सामना येत्या शुक्रवारी १० तारखेपासून मँचेस्टर इथं सुरू होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं संपूर्ण आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्यात येत असून, लसीकरणाची गती वाढवण्यासाठी ८ ते २३ सप्टेंबर दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यात जवळपास दहा लाख नागरिक अजूनही लसीकरणापासून वंचित आहेत, असं जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी सांगितलं.
****
नांदेड इथल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या नियोजित विविध विकास कामांच्या बांधकामासाठी राज्य शासनानं, सात कोटी ८२ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून महाविद्यालयाची तीन मजली इमारत, संलग्नित रूग्णालय, वसतीगृह आदी बांधकाम हाणार आहे.
****
हवामान :
येत्या दोन दिवसात राज्यातल्या सर्व विभागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. या काळात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
0 notes