Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 05 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०५ जून २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारत आपल्या विकासासाठी इतर क्षेत्रांप्रमाणेच पर्यावरणावरही मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्य���त आला, त्यात ते बोलत होते. केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यावेळी उपस्थित होते. सरकारने गेल्या नऊ वर्षांत हरित आणि स्वच्छ ऊर्जेवर भर दिला असून, एकविसाव्या शतकात भारत हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणावर भर देत पुढे जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारतानं हवामान बदलाचा मुद्दा जगासमोर मांडला असल्याचं त्यांनी नमूद केलं.
विकास आणि पर्यावरण या दोन्हीचा मेळ साधत भारत वाटचाल करत असल्याचं भुपेंद्र यादव यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात यादव यांनी पर्यावरण जागरूकतेसाठी तयार केलेल्या माय लाईफ या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं.
पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं १९७३ पासून जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. “प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखा” ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.
***
पर्यावरण दिनानिमित्त औरंगाबाद इथं महानगरपालिका उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीनं, सिडको इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन आणि स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. सहकार मंत्री अतुल सावे, महापालिका प्रशासक जी.श्रीकांत, वृक्षारोपणासाठी कार्य करणाऱ्या जनसहयोग संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पुढे येऊन औरंगाबाद शहर प्रदुषण मुक्त राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आवाहन, सावे यांनी यावेळी केलं. उपस्थितीत सर्वांनी यावेळी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीची शपथ घेतली.
***
आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्यावेळी हा निर्णय झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट संदेशात सांगितलं. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचं राज्य बनवण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरु ठेवण्यासाठी एकत्रित निवडणुका लढवून बहुमताने जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या बैठकीत कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
***
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुलोचना दीदी यांच्या निवासस्थानी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. सुलोचना यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ९४ वर्षांच्या होत्या.
***
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातल्या वाढोणा गावात आगमन झालं. या पालखीत साडेसातशे वारकऱ्यांचा समावेश आहे. पालखीच्या आगमनामुळे हिंगोली जिल्ह्यातही भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
‘हर घर नर्सरी’ उपक्रमाअंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिकांमध्ये रोपवाटीकांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी आज सलग दुसऱ्यांदा दुर्म��ळ वृक्ष असलेल्या पट्ट्यात जाऊन, विविध वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं. लातूर जिल्हा प्रशासन, सह्याद्री देवरा, द संस्कृती फाउंडेशन, लातूर वृक्ष चळवळ यांच्या सक्रिय सहभागानं ही मोहिम पार पडली. हा बीज संकलन उपक्रम रेणापूर, लातूर, चाकूर तालुक्याच्या सीमेवर दव्हेली, जानवळ, वडवळ, झरी या परिसरात राबवण्यात आला. यावेळी मासरोहिणी, आपटा, बेहडा, बहावा, अर्जुन, पळस अशा अनेक दुर्मिळ वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं.
***
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मृत्यू पावलेल्या दोन शिवभक्तांच्या मृत्यूची सखोल चौकशी महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी हे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितलं आहे.
***
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकेचं महाविद्यालयात आज वाटप करण्यात येत आहे. औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळातून महाविद्यालयांना आज सकाळी गुणपत्रिका वितरीत करण्यात आल्या.
***
हुजुर साहिब नांदेड - संबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस आज नांदेडहून उशिरा सुटणार आहे. ही गाडी आज तिच्या दुपारी साडे चार या नियोजित वेळेऐवजी, रात्री आठ वाजता सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
//************//
0 notes
आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगर पालीका, पंचायत समिती सह सर्वच निवडणूका........... राजेंद्र गुंडलवार , संघटनमंत्री, आप ....
राष्ट्रीय स्तरावर अत्यंत अल्पावधीतच झपाट्याने निवडणुका जिंकत जिंकत दिल्ली राज्य व पंजाब राज्य एकतर्फी काबिज करून, गोवा, उत्तराखंड, गुजरात, उत्तरप्रदेश, आसाम, आदीसह अनेक राज्यात आपने किमया साधली व आज भारतात दुस-या क्रमांकावर अग्रेसर कार्य करतच आहे
झरी नगर पंचायत, मारेगांव, राळेगांव सह नगरपंचायती सुद्दा आपने लढविल्या व विरोधकांना चांगलाच घाम फोडला.वणी, आर्णी, सह सर्वच नगरपरिषद सह सर्वच निवडणूका लढणार व जिंकणार सुद्दा, असे ठणकावित पक्ष प्रचाराचे १५००० सदस्यासह बिगूल फुंकले.
1 note
·
View note
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 June 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ जून २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ, मात्र विद्यार्थी बुधवारपासून शाळेत येणार
· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या देहूत जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं लोकार्पण
· धनगर समाजाच्या महामंडळासाठी भरीव तरतूदीची राज्य सरकारची घोषणा पोकळ असल्याचा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ९४६ रुग्ण, मराठवाड्यात नऊ बाधित
· ७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन
· मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही मान्सूनचा चांगला पाऊस
· खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राला आणखी चार सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदकं
आणि
· दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव
****
नव्या शै���्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. मात्र विद्यार्थी प्रत्यक्षात बुधवारपासून शाळेत येणार आहेत. शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश द्यावा, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचं स्वागत करताना शाळेच्या परिसरातल्या सहा ते १४ वयोगटातल्या विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश झाल्याची खात्री करून घ्यावी, असं त्यांनी सांगितलं आहे. यासाठी जवळच्या दगडखाणी, वीटभट्टी, बाजारपेठा, पदपथ, कामगारवस्त्यांमध्ये सर्वेक्षण करावं, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचं, गायकवाड यांनी नमूद केलं.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी राज्यात कधीच शाळेत न गेलेल्या ६ ते १४ वयोगटातल्या बालकांची संख्या, सात हजार ८०६ होती, तर अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या बालकांची संख्या १७ हजार ३९७ होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पुणे जिल्ह्यातल्या देहू इथं जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. संत चोखामेळा यांच्या अभंगगाथेचं प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे. या अभंगगाथेत साडे पाचशे अभंगांचा समावेश आहे. संत चोखामेळा यांच्या कुटुंबाचे सर्व अभंग एकत्र करून ही अभंगगाथा तयार करण्यात आली आहे.
आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान मुंबईत राजभवन इथं, जलभूषण भवन आणि क्रांतिकारकांच्या गॅलरीचंही उद्धाटन करणार आहेत. मुंबई समाचार या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवालाही ते उपस्थित रहाणार आहेत.
****
वीज महावितरण कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ५५७ दशलक्ष युनिट विजेची चोरी उघडकीस आणली. उच्च आणि लघुदाब वर्गवारीमध्ये २२ हजार ९८७ ठिकाणी, ३१७ कोटी ४५ लाख रुपयांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. त्यापैकी १७२ कोटी ४५ लाख रुपयांची वसुली झाली आहे. सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या या विक्रमी कामगीरीमुळे, महावितरणची वीजहानी कमी करण्यासोबत, महसुलामध्ये वाढ होण्यासाठी मदत होत आहे. वीज गळती कमी करण्यासाठी विभागीय स्तरावरील भरारी पथकांच्या माध्यमातून ही मोहीम अधिक प्रखरपणे राबवण्यात येत असल्याचं, महावितरणकडून सांगण्यात आलं.
****
धनगर समाजाच्या महामंडळासाठी भरीव तरतूदीची राज्य सरकारची घोषणा पोकळ ठरली असल्याचा आरोप, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं बीड इथं भारतीय संग्राम परिषदेच्या सत्कार सोहळ्यात ते काल बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यावेळी उपस्थित होते. धनगर समाजातल्या वंचित, होतकरू, गरजुंना या सरकारनं मदत करणं अपेक्षित आहे. हे युवक विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत असताना, सरकार त्यांना पाठबळ देण्याऐवजी फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम करतं, मात्र संग्राम परिषदेच्या माध्यमातून विनायक मेटे या तरुणांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख, दरेकर यांनी केला.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष विधान परिषदेची पाचवी आणि सहावी जागा निश्चितपणे जिंकणार, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला. काल तुळजापूर इथं तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्याला वैभवाच्या शिखरावर नेलं होतं, त्यात आता खंड पडला असल्याचं सांगत, पराभव स्वीकारा, रडीचा डाव खेळू नका अशी टीकाही दरेकर यांनी महाविकास आघाडीवर केली.
दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी न दिल्यानं त्यांच्या समर्थकांनी चौसाळा आणि बीड शहरात दरेकर यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना बाजुला करताना एका पोलिसाला आणि दोन कार्यकर्त्याना किरकोळ मार लागला.
औरंगाबाद इथंही पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली. गोंधळ घालणाऱ्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ९४६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख १० हजार ५७७ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ८७० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८६ शतांश टक्के आहे. काल एक हजार ४३२ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ४६ हजार ३३७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १६ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या चार, नांदेड जिल्ह्यातल्या तीन, तर बीड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं आवाहन, राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्याची खरीपपूर्व आढावा बैठक कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काल औरंगाबाद इथं झाली, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमधे मृग नक्षत्राचा पाऊस झाला असल्यानं, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर काही ठिकाणी पेरणीलासुद्धा सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. यावेळी राज्याच्या तुलनेत मराठवाड्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादन क्षमता खूप कमी आहे, त्यामुळे या पिकांची उत्पादकता वाढावी यासाठी राज्य सरकारनं एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहितीही धीरज कुमार यांनी दिली.
****
मराठवाड्यात काल दुसऱ्या दिवशीही मान्सूनचा चांगला पाऊस झाला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. विभागात काल वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला, तर सात जनावरं दगावली.
औरंगाबाद जिल्ह्याच्या अनेक भागात काल पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे. फुलंब्री तालुक्यात सताळ पिंप्री इथं वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला.
****
जालना शहरासह तालुक्यातल्या अनेक भागात काल दुपारी चार वाजेच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातल्या सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली. जिल्ह्याच्या भोकदरन आणि जाफराबाद तालुक्यातल्या काही भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात शनिवारी रात्री अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह पाऊस झाला. हिमायतनगर इथं ३० वर्षे वयाच्या तरुण शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. तर हिमायतनगर मध्ये एक जनावर दगावलं. लोहा तालुक्यात माळेगाव आणि डोंगरगाव इथं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडल्यामुळे एकुण सहा जनावरं दगावल्याचं वृत्त आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
केंद्र सरकारनं गेल्या आठ वर्षात केलेल्या, संरक्षण क्षेत्रातल्या सुधारणा आणि आधुनिकीकरणाबाबत निवृत्त बिग्रेडिअर हेमंत महाजन यांनी माहिती दिली.
बाईट -हेमंत महाजन
****
हरियाणा इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडुंनी काल चार सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य पदकं मिळाली. तिरंदाजीत साताऱ्याच्या आदिती स्वामीनं सुवर्णपदक जिंकलं, अहमदनगरच्या पार्थ कोरडेला रौप्य पदक मिळालं. टेबल टेनिसमध्ये दीया चितळेनं दुसर्यांदा सुवर्ण पदक पटकावलं. जलतरणात अपेक्षा फर्नांडीसनं दोनदा सुवर्ण कामगिरी केली. मुष्टियुद्धात मुंबईची सिमरन वर्मा, सातार्याची रशिका होले, पुण्याचा आदित्य गौड आणि सई डावखर, अकोल्याचा माणिक सिंग यांनी कांस्यपदकं जिंकली.
दरम्यान, स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आज महाराष्ट्राच्या खो-खो च्या मुला-मुलींच्या संघाचा अंतिम फेरीतला सामना आज ओडीशाबरोबर होणार आहे. काल मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघानं बंगालच्या संघाचा, तर मुलांच्या संघानं दिल्ली संघाचा पराभव केला.
टेबल टेनिसमध्येही महाराष्ट्रानं चांगलं आव्हान उभं केलं आहे. तर हरियाणाचं शक्तिस्थान समजल्या जाणाऱ्या मुष्टियुद्धामध्येच त्यांची आणि महाराष्ट्राची खरी लढाई होणार आहे. कारण महाराष्ट्राचे चार मुष्टियोद्धे गोल्डन पंच मारण्यासाठी सज्ज आहेत.
****
कटक इथं झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा चार गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सहा बाद १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेच्या संघानं १८ षटकं आणि दोन चेंडूत सहा गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
****
मॅक्सिकोत झालेल्या भारोत्तोलन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आकांक्षा व्यवहारे हिने रौप्यपदक पटकावलं आहे. आकांक्षाने चाळीस किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात ५९ किलो तर जर्क प्रकारात ६८ किलो, असं एकूण १२७ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावलं. क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी आकांक्षाचं अभिनंदन केलं आहे.
****
जालना शहरालगत पर्यावरण पूरक वातावरण निर्मितीसह पर्यटनक्षेत्र विकसित करण्यासाठी मुंबईच्या समस्त महाजन ट्रॅस्ट आणि जालन्यातल्या विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं, अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या टप्पा तीन परिसरातल्या पारशी टेकडीवर, ६५ हजार वृक्ष लावगडीचा शुभारंभ, काल जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते झाला. वृक्ष लागवडीच्या या उपक्रमात जालनेकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता.
****
नांदेड जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. एकूण २ हजार ९०९ शाळांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा तालुका स्तरावर करण्यात आला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या टाकरवन इथं विविध विकासकामांचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. स्थानिक विकास निधी, जिल्हा नियोजन निधीतून पूर्ण झालेल्या अनेक कामांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. गावातल्या शाळा खोलीचं बांधकाम पूर्ण झालं असून, गावांतर्गत सिमेंट रस्ताही खुला करण्यात आला आहे. दरम्यान, टाकरवन ते नेर इथल्या पुलाचं लोकार्पणही टोपे यांच्या हस्ते झालं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं सापडलेल्या बॉम्बप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी काल एकास अटक केली. रामेश्वर मोकासे असं त्याचं नाव असून, त्याचा मित्र दिनेश राजगुरू याचकडे मागील दोन वर्षांपासून थकलेली रक्कम परत मिळाण्यासाठी त्यानं हा बॉम्ब राजगुरु यांच्या दुकानासमोर ठेवला होता. मोकासे याला १६ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. जाफराबाद तालुक्यातल्या माहोरा फाट्याजवळ उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दुचाकीवरील शंकर भागचंद महेर, रोहन शंकर महेर या पिता-पुत्राचा मृत्यू झाला तर शंकर यांच्या पत्नी ममता गंभीर जखमी झाल्या.
जालना तालुक्यातल्या तांदुळवाडी शिवारात समृध्दी महामार्गावर झालेल्या अन्य एका कार अपघातात बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथले बळीराम सखाराम खोकले यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जालन्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
0 notes