Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीत २९२ जागांसह एनडीएला बहुमत-इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय
मध्यप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीसह सात राज्यात भाजपला तर मणिपूर आणि चंदीगडसह पाच राज्यांत काँग्रेसला निर्भेळ यश
इंदूरचे भाजप उमेदवार दहा लाखांहून अधिक मतांनी विजयी तर वायव्य मुंबईत रवींद्र वायकरांचा अवघ्या ४८ मतांनी निसटता विजय
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा-१३ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
औरंगाबादहून संदिपान भुमरे विजयी तर बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे तसंच लातूरमधून सुधाकर श्रृंगारे पराभूत
परभणीत संजय जाधव आणि उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर यांनी जागा राखली तर हिंगोलीत नागेश आष्टीकर तसंच नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा विजय
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा आयर्लंडशी सामना
****
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशात लोकसभेच्या एकूण एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं २९२, तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्यावेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.
****
केरळमध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळाला. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश तसंच अंदमानात भारतीय जनता पक्षानं एकहाती विजय मिळवला, तर पंजाब आणि तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्ष १६, भाजप तीन; आसाम - भाजप नऊ, काँग्रेस तीन; छत्तीसगड - भाजप १०, काँग्रेस एक; हरियाणा भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी पाच; झारखंड भाजप आठ, झारखंड मुक्ती मोर्चा तीन, काँग्रेस दोन; ओडिशा भाजप १९, काँग्रेस आणि बीजू जनता दल प्रत्येकी एक; कर्नाटक भाजप १७, काँग्रेस नऊ, धर्मनिरपेक्ष जनता दल दोन; तेलंगणा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ, एमआयएम एक; राजस्थान - भाजप १४, काँग्रेस आठ; गुजरात - भाजप २५, काँग्रेस एक; बिहार - भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १२, लोकजन शक्ती पक्ष पाच, काँग्रेस तीन तर राजद चार; उत्तर प्रदेश - समाजवादी पक्ष ३७, भाजप ३३, काँग्रेस सहा; पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसनं २९, काँग्रेस एक तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत.
काश्मीर - नॅशनल कॉन्फरन्स दोन, भाजप दोन; दादरा नगर हवेली - भाजप एक, अपक्ष एक; गोवा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक; मेघालयात काँग्रेस आणि व्हाईस ऑफ पीपल्स पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली. तामिळनाडूत द्रमुक २२, काँग्रेस नऊ तर माकप आणि भाकप प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाले.
काँग्रेसनं केरळमध्ये सर्वाधिक १४ तर पंजाबात सर्वाधिक सात जागा जिंकल्या. शिवाय, मणिपूरच्या सर्व दोन तसंच चंदीगड, लक्षद्वीप, नागालँड, तसंच पुड्डुचेरी इथल्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. आम आदमी पक्षाला पंजाबात तीन जागांवर समाधान मानावं लागलं.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, अनुरागसिंह ठाकूर, तेजस्वी सूर्या, कंगना राणावत, हेमा मालिनी, आदी दिग्गजांचा विजय झाला, तर स्मृती इराणी, मेनका गांधी, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे या विद्यमान मंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार, सुजय विखे पाटील, नवनीत राणा, उज्ज्वल निकम आदी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
****
मध्य प्रदेशात इंदूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार शंकर लालवाणी यांनी १२ लाखावर मतं मिळवत, दहा लाख आठ हजार मताधिक्यानं विजय संपादित केला, मात्र याच मतदार संघात वरीलपैकी कोणी नाही-नोटा या पर्यायाला सुमारे दोन लाख १८ हजार मतदारांनी पसंती दिली.
****
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीनं ३० जागा जिंकल्या, तर महायुतीला फक्त १७ जागाच मिळवता आल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीनं राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपाला २३, तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँगेसला चार, तर काँगेसला फक्त एक जागा जिंकता आली होती. पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतून १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते, यंदा शिंदे यांचे सात सहकारी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनील तटकरे हे एक खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते, तटकरे यांचा यावेळीही विजय झाला. गेल्या वेळी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला, १३ जागा मिळून तो राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच खासदार राहिले होते, ही संख्या आता नऊ झाली आहे. शरद पवार यांच्याकडेही फक्त ३ खासदार राहिले होते, ती संख्या आता आठ झाली आहे.
****
विदर्भात नागपूर मधून नितीन गडकरी, रामटेक श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोळे, चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, यवतमाळ - वाशिम संजय देशमुख, गडचिरोली-चिमूर नामदेव किरसान, अमरावती बळवंत वानखेडे, वर्धा अमर काळे, बुलडाणा प्रतापराव जाधव, तर अकोला इथून अनुप धोत्रे विजयी झाले.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव, जळगाव मधून स्मिता वाघ, रावेर इथून रक्षा खडसे, दिंडोरी - भास्कर भगरे, नाशिक राजाभाऊ वाजे, तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवाल पाडवी यांचा विजय झाला.
****
सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे, माढा मधून धैर्यशील मोहिते, सांगली इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने, मावळ श्रीरंग बारणे, पुणे मुरलीधर मोहोळ, बारामती सुप्रिया सुळे, शिरुर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, तर शिर्डी इथून भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला.
****
रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे, सिंधुदूर्ग-रत्नागिरीतून नारायण राणे, पालघर हेमंत सावरा, भिवंडी सुरेश म्हात्रे, कल्याण श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के विजयी झाले.
****
उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय झाला.
वायव्य मुंबईतून शिवसेना महायुतीचे रविंद्र वायकर यांचा फेरमोजणीत अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४, तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना चार लाख ५२ हजार ५९६ मतं मिळाली.
****
आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील काल झाली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी तेलगु देसम पक्ष १३५, वायएसआर काँग्रेस ११, तर भाजपनं आठ जागांवर विजय मिळवला.
ओडिशा विधानसभेच्या एकूण १४७ जागांपैकी भाजप ७८, बिजू जनता दल ५१, तर काँग्रेसनं १४ जागा जिंकल्या.
****
मराठवाड्यात आठ पैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर महायुतीला एकमेव औरंगाबादची जागा जिंकता आली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे संदिपाम भुमरे यांनी एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांचा एक लाख ३३ हजार ५५७ मतांनी पराभव केला. भुमरे यांना चार लाख ७४ हजार ४३४, सय्यद इम्तियाज यांना तीन लाख ४० हजार ८७७, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख ९१ हजार ८७० तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना सुमारे ६९ हजारावर मतं मिळाली.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. अनेक फेऱ्यांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करत, अखेरीस सोनवणे यांनी पंकजा मुंडे ��ांच्यावर सहा हजार ५५३ मतांनी विजय मिळवला. मुंडे यांना सहा लाख ७७ हजार ३९७, तर सोनवणे यांना सहा लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली.
जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला, काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांच्यावर सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. दानवे यांना चार लाख ९७ हजार ९३९, तर काळे यांना सहा लाख सात हजार ८९७ मतं मिळाली.
परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचा एक लाख ३४ हजार ६१ मतांनी विजय झाला. जाधव यांना सहा लाख एक हजार ३४३, तर महायुतीचे महादेव जानकर यांना चार लाख ६७ हजार २८२ मतं मिळाली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी एक लाख आठ हजार ६०२ मतांनी विजय मिळवला. आष्टीकर यांना चार लाख ९२ हजार ५३५, तर महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना तीन लाख ८३ हजार ९३३ मतं मिळाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी विद्यमान खासदार भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना पाच लाख २८ हजार ८९४, तर चिखलीकर यांना चार लाख ६९ हजार ४५२ मतं मिळाली.
लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी ६१ हजार ९०० मतांनी विजय मिळवला. काळगे यांना सहा लाख नऊ हजार २१, तर विद्यमान खासदार सुधार श्रृंगारे यांना पाच लाख ४७ हजार १२० मतं मिळाली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा तीन लाख २९ हजार ८४६ मताधिक्यानं विजय झाला. त्यांना सात लाख ४८ हजार ७५२, तर महायुतीच्या अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ मतं मिळाली.
****
जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, भारतीय इतिहासातली ही ऐतिहासिक घटना असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘देशवासियों ने भाजपा पर एनडीए पर पूर्ण विश्वास जताया है। आज की ये विजय दुनिया के सबसे बडे लोकतंत्र की जीत है, ये भारत के संविधान पर अटूट निष्ठा की जीत है, ये विकसित भारत के पर्व की जीत है।’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी मताने हरल्या गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला कदाचित ते कारण पण असू शकेल, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, काही त्रुटी राहिल्या त्या दूर करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, आणि ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळालं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
या निकालानंतर सामान्य माणसाने आपली ताकत दाखवून दिली असून, आम्ही इंडिया आघाडी म्हणून सत्तेचा दावा करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आणखी काही जागांची अपेक्षा होती, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीलाच आम्ही आव्हान देण्याचा विचार करत असल्याचंही ठाकरे म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्तदि ली आहे.
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस पक्षानेही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. देशाने दिलेला कौल हा लोकशाहीचा, जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालाबद्दल पक्ष कार्यकर्ते तसंच जनतेचे आभार मानले.
‘‘जो देश मे चुनाव के रिज़ल्ट आएं हैं, मैं तो पहले कहूंगा ये जो रिज़ल्ट है, जनता के रिज़ल्ट हैं, और ये जनता की जीत है, और लोकतंत्र की जीत है।’’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
‘‘मेरे माइंड मे था के हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खडे होकर लड जाएंगे और ये सच साबित हुवा। मुझे भरोसा था और मै हिंदुस्तान की जनता से, इंडिया गठबंधन पार्टनर्स से, काँग्रस पार्टी के हमारे सब नेताओं और कार्यकर्ताओं से दिलसे धन्यवाद करना चाहता हूं। आपने संविधान को बचाने का पहला और सबसे बडा कदम ले लिया है।’’
काँग्रेस नेते राहुल गांधी
दरम्यान, इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एनडीएचीही आज दिल्लीत बैठक होणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळाचीही आज बैठक बोलावण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. काल या स्पर्धेत नेदरलँड्सनं नेपाळचा सहा गडी राखून, तर अफगाणिस्ताननं युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला.
****
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
देशाच्या खंबीर नेतृत्वासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घोषणा
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं सूत्र निश्चित-काँग्रेसला १७, राष्ट्रवादीला १० तर शिवसेनेला सर्वाधिक २१ जागा
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचं निधन
अहमदनगर जिल्ह्यात बायोगॅसच्या विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू
आणि
मराठवाड्याच्या अनेक भागात काल गारपिटीसह अवकाळी पाऊस
****
देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असल्याने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं. ते काल गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. भाजपकडून आलेले राज्यसभा तसंच विधान परिषदेचे प्रस्ताव नाकारत, आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार असल्याचं सांगत, राज ठाकरे यांनी, इतर सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा देत आहोत, मात्र भाजपच्या ज्या गोष्टी पटणार नाहीत, त्यांना विरोध करणारच, असं त्यांनी नमूद केलं. मनसे कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे थेट निर्देशही राज ठाकरे यांनी यावेळी दिले. आरोग्यसेवकांना निवडणुकीच्या कामाची जबाबदारी देणं योग्य नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
****
महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ४८ मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागा लढवणार आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काल याबाबत घोषणा करण्यात आली. या परिषदेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार तसंच नाना पटोले उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली - चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, उत्तर मध्य मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई या जागा लढवणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, दक्षिण अहमदनगर आणि बीड या जागा लढवणार आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशीम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, या जागा लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.
****
काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा देत, शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. काँग्रेस पक्ष सध्या दबावात असून स्वत: कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाही, असं मत वाघमारे यांनी व्यक्त केलं.
****
अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले आनंद आंबेडकर यांना, ए आय एम आय एम पक्षानं पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. अमरावती लोकसभा जागेवर भाजपनं नवनीत राणा यांना, तर काँग्रेसनं बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली आहे.
****
लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण, यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचं काल हैदराबाद इथं निधन झालं, ते ६१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर हैदराबाद इथं उपचार सुरू होते. मराठवाडा दैनिकातून पत्रकारितेला प्रारंभ केलेल्या माने यांनी, लोकसत्ता तसंच महाराष्ट्र टाईम्स दैनिकांसाठी आणि खासगी वृत्तवाहिन्यांसाठीही काम केलं. ३२ वर्षांच्या कारकिर्दीत अफाट जनसंपर्क आणि व्यासंगाच्या बळावर, राजकारण आणि समाजकारण या विषयांवरील पत्रकारितेसोबतच माने यांनी, क्रीडा पत्रकार म्हणून वेगळा ठसा उमटवला. जिल्हा क्रिकेट संघटनेचे सदस्य तसंच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शालेय समितीवरही ते कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं प्रतापनगर स्मशानभूमीत आज सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
धाराशिवच्या माजी नगराध्यक्ष पुष्पाताई चंद्रहास पाटोदेकर यांचं काल सकाळी धाराशिव इथं निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या. धाराशिव जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान होतं. राज्याचे माजी गृहमंत्री आणि पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी होत.
****
अहमदनगर जिल्ह्यात बायोगॅसच्या विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला. नेवासे तालुक्यात वाकडी इथं ही घटना घडली. या विहिरीत पडलेल्या मांजराला वाचवण्यासाठी काहीजण विहिरीत उतरले, मात्र त्यात साचलेल्या शेणाच्या दलदलीत अडकल्यानं, पाच जणांचा मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली.
लातूर शहर आणि परिसरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. १० ते १५ मिनिटं झालेल्या या पावसामुळे आंब्याचं नुकसान झाल्याची वृत्त आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहर आणि परिसरात काल दुपारी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. सेनगाव तालुक्यात काही भागात गारपीटही झाल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
परभणी जिल्ह्यातही विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह सर्वदूर पाऊस झाल्याचं, तसंच नांदेड शहर परिसरातही हलका पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
विदर्भातही अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा आदी भागात पाऊस तसंच गारपीट होऊन शेतपिकं आणि आंब्याचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं नांदेड जिल्ह्यासाठी येत्या बारा तारखेपर्यंत येलो ॲलर्ट जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची, तसंच विजेच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
हिंदू नववर्षदिन अर्थात गुढी पाडवा काल राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्याचं तसंच रांगोळ्यांची सजावट केल्याचं दिसून आलं. पैठण इथं शककर्ता सम्राट शालिवाहन राजाच्या प्रतिमेची काल मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ढोल ताशांच्या निनादात या मिरवणुकीला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगररातून ग्रामदैवत संस्थान गणपतीपासून शोभायात्रा काढण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते.
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त बीड शहरात काल सकाळी बालाजी मंदिरापासून नववर्ष स्वागत फेरी काढण्यात आली.
गुढीपाडवा सणाचं औचित्य साधून काल महाविकास आघाडीच्या वतीनं लातूर शहरात काँग्रेस भवनासमोर परिवर्तनाची गुढी उभारण्यात आली. काँग्रेस नेते, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यासह, महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
****
परभणी लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं, मतदानाची गुढी, हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये परभणी शहरातल्या शारदा सामाले यांनी मतदानाची गुढी उभारली. मतदानाचं आवाहन करणारी अनेक घोषवाक्यं, मतदान केंद्राची प्रतिकृती आणि मतदान केल्याची शाई लावलेला हात तसंच स्वीपची सुंदर रांगोळी काढून, गुढीभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती.
****
सामान्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी काल नांदेड दक्षिणच्या विष्णुपुरी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या मतदान केंद्रावरच्या सुविधा, मतदार यादी, मतदान यंत्रं आणि इतर साहित्याची त्यांनी तपासणी करून, एकूण तयारीबद्दल समाधान व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्ह्यातली जी विधानसभा क्षेत्रं नांदेड, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदार संघात येतात, त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी येणाऱ्या आठवडी बाजारांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता मतदानाच्या दुसऱ्या दिवशी याठिकाणी बाजार भरणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या महिला बचत गटांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये एक हजार बचत गटातल्या सुमारे एक लाख महिलांनी जिल्ह्यात दारेफळ आणि खांडेगावसह विविध गावांमध्ये मतदान जनजागृतीसाठी फेऱ्या काढल्या, तसंच मतदानाची प्रतिज्ञा दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या येडशी रामलिंगघाट अभयारण्यात गेल्या दहा दिवसांत नऊ माकडं दगावल्याचं समोर आलं आहे. अन्नाच्या विषबाधेतून ही माकडं दगावल्याची शक्यता वनविभागानं वर्तवली आहे. या माकडांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, विभागीय वनाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार माकडांचा वावर असलेल्या भागांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
****
येत्या सोळा ते पंचवीस एप्रिल या कालावधीत नांदेड इथं विविध खेळांसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबीर सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थी खेळाडूंसाठी नि:शुल्क असणार आहे.
****
0 notes