Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 October 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
राज्य सरकारी अराजपत्रित कर्मचाऱ्यांना साडे बारा हजार रुपये उत्सव अग्रीम मंजूर
हैदराबाद मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी नवीन मंत्रिमंडळ उपसमिती
एसटीच्या प्रवासी दरात २१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी दहा टक्के हंगामी भाडेवाढ
नक्षल चळवळीचा आरोपी जी.एन. साईबाबा याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून निर्दोष मुक्तता; निकालाला राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान
मराठवाड्यात परतीच्या पावसाशी निगडित घटनात दोघांचा मृत्यू तर एक जण बेपत्ता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना, नॅक मूल्यांकन बंधनकारक
आणि
महिलांच्या फीफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात;नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलला ��ुवर्णपदक
****
राज्य शासनातल्या अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. काल झालेल्या निर्णयामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच, गट क आणि गट ब या अराजपत्रित संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून, १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम देण्यात आला होता.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी मराठवाड्यातल्या सगळ्या मंत्र्यांची नवीन मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीमध्ये रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार-इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा समावेश असेल. औरंगाबादचे विभागीय आयुक्त या समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अनुषंगानं विविध कार्यक्रमांच आयोजन करुन, यासाठी येणार्या सुधारित खर्चाचा आराखडाही सादर करणार आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे कालव्याचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून, या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. निळवंडेच्या डाव्या कालव्याचं काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचं काम ७२ टक्के पूर्ण झालं आहे.
****
पहिली राष्ट्रीय कोळसा परिषद उद्या १६ आणि परवा १७ ऑक्टोबरला दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. भारतीय कोळसा क्षेत्र-आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं शाश्वत खनिकर्म, या संकल्पनेतून ही परिषद आणि यासंबंधी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. ऊर्जा क्षेत्रातली इंधन स्वयंपूर्णता, कोळसा खाण क्षेत्रात तंत्रज्ञान, आणि पोलाद निर्मितीत आत्मनिर्भरता, या तीन प्रमुख विषयांवर या परिषदेत चर्चा होईल तसंच यावर आधारित साधनं प्रदर्शनात ठेवण्यात येतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबईत अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. रमेश लटके यांचा गेल्या मे महिन्यात मृत्यू झाल्यानं अंधेरी विधानसभा मतदारसंघातली ही जागा रिक्त झाली आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेनं ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारल्याचं पत्र काल सकाळी त्यांना दिलं. त्या मुंबई महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत होत्या.
****
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आणि श्रीवर्धनचे माजी आमदार अवधूत तटकरे यांच्यासह मीरा भाईंदर इथल्या तीन नगरसेवकांनी, काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचं स्वागत केलं. अवधूत तटकरे हे बारा वर्ष रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या प्रवासी दरात १० टक्के हंगामी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी ही हंगामी भाडेवाढ असेल. सदर भाडेवाढ परिवर्तन, निमआराम शिवशाही बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलं आहे, त्यांच्याडून संबंधित वाहक आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातल्या फरकाची रक्कम वसूल करेल. ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तिथं प्रवास, तसंच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पाससाठी लागू केली जाणार ���ाही.
****
नक्षल चळवळीचा मुख्य सुत्रधार असल्याच्या आरोपातून गोकरकोंडा नागा उर्फ जी.एन. साईबाबा याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. २०१७ मध्ये जी.एन. साईबाबा याला गडचिरोली सत्र न्यायालयानं दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, त्यानं या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. नागपूर खंडपीठानं सत्र न्यायालयाचा हा निर्णय रद्दबातल ठरवत, साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना निर्दोष म्हटलं आहे.
या निकालाला राज्यसरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल न्यायालयाच्या निकालानंतर ही माहिती दिली. भक्कम पुरावे असताना, फक्त विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे या व्यक्तीला सोडून देण्याचा निर्णय, हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजना - डी पी डी सी मधून मिळणार आहे. मत्स्य व्यवसाय विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. यामुळे मत्स्यबीज केंद्र आणि संवर्धन केंद्रात मत्स्य मत्स्यबीज निर्मिती कार्यक्रम राबवणं शक्य होणार असून, मत्स्योत्पादनात वाढ होणार आहे. राज्यात सध्या एकूण ६७ मत्स्यबीज उत्पादन केंद्र आणि संवर्धन केंद्र आहेत.
****
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृत्यू झाला आहे. घोरपडे हे गुरूवारी पुण्यातल्या कार्यालयातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता होते. पथकराचा फास्टटॅगचा मेसेज आणि सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासातून पोलिसांनी सातारा जिल्ह्यात नीरा नदीपात्रात शोध घेतला असता, काल सकाळी घोरपडे यांचा मृतदेह सापडला.
****
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं काल नागपूर इथं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. २००६ पासून ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हैसाळकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
मराठवाड्याच्या बहुतांश भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागात यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. बीड जिल्ह्यात सिरसाळा - मोहा रस्त्यावर ओढ्याला आलेल्या पुरात पिकअप व्हॅन वाहून गेल्यानं एक जण बेपत्ता झाला आहे. काल दुपारी ही घटना घडली. माजलगाव तालुक्यातल्या दिंद्रुड इथले शेख रईस अन्सार अत्तार, शेख अकील अत्तार आणि दीपक चोरघडे हे पिकअप वाहनातून अंबाजोगाईला जात असताना गव्हाडा ओढ्यात पुराच्या ही गाडी वाहून गेली. स्थानिकांच्या प्रयत्नामुळे दोघांना वाचवण्यात यश आलं, मात्र शेख रईस अन्सार अत्तार हे वाहून गेले. त्यांना शोधण्याचं काम काल उशीरापर्यंत सुरु होतं. आज पुन्हा शोधकार्य सुरु करणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या चिटमोगरा इथं हलुबाई काळेकर या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली.
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातही एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. सरफगव्हाण इथं ही घटना घडली. तुकाराम काळे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आणि धरणात पाण्याची आवक सुरु असल्यानं धरण ९५ टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणातून कधीही पाणी सोडलं जाण्याची शक्यता असल्यानं, मांजरा धनेगाव प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून ५६ हजार ५९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली तसंच परभणी जिल्ह्यात कालही जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठं नुकसान झालं आहे.
येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालयांना, नॅक मूल्यांकन बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक विद्यापीठ प्रशासनानं जारी केलं असून, पुढील सहा महिन्यात महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करणं अनिवार्य असेल, अन्यथा महाविद्यालयांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणार्या औरंगाबाद, बीड, जालना, आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्नित ४६४ महाविद्यालयं आहेत. यापैकी फक्त १४६ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलं आहे तर, ५५ महाविद्यालयांना अद्याप पाच वर्ष पूर्ण झाली नसल्यानं, ती नॅक मूल्यांकनासाठी पात्र नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव उद्यापासून १९ ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठ परिसरात होणार आहे. सहा विभागात ३६ कला प्रकारात हा महोत्सव रंगणार असून सात रंगमंचावर आयोजनाची जय्यत तयारी सुरु आहे.
****
महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल ७१ स्टार्टअप उद्योजकांनी नोंदणी केली, यापैकी ३७ जणांनी नवं कल्पनाचं सादरीकरण केलं. यामध्ये कृषी, आरोग्य, शाश्वत विकास, ई-गव्हर्नंस, पायाभूत सुविधा आदि विषयांवरच्या सादरीकरणाचा समावेश आहे. यावेळी विद्यार्थी तसंच नव उद्योजकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळाही झाली. यामध्ये कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुरेश वऱ्हाडे, यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केलं.
****
कोणताही उद्योग करतांना यशाची हमी ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितलं. महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लातूर इथं काल जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरणाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या १५ उमेदवारांनी सादरीकरण केलं.
महाराष्ट्र् स्टार्ट अप यात्रेअंतर्गत बीड इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्राला काल प्रारंभ झाला. जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संकल्पना सादरीकरणाच्या या कार्यक्रमातील विजेत्यांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.
****
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय -घाटीत पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचं, पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितलं. ते काल घाटी रुग्णालयाच्या आढावा बैठकीत बोलत होते. घाटीच्या सुपर स्पेशालिटी इमारतीत परिचारिका, डॉक्टर तसंच पॅरामेडिकल स्टाफ, आणि प्रसुती विभागात अतिरिक्त खाटाच्या उपलब्धेसाठी प्रशासकीय मान्यता आणि निधी देण्या��� येईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
भूकंप पूर्वतयारीत युवकांची भूमिका या विषयावर काल लातूर इथं एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यावेळी उपस्थित होते. या राष्ट्रीय कार्यशाळेत नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय भूकंप शास्त्र विभागातले वरिष्ठ शास्त्रज्ञ रविकांत सिंग, कॉन्फिडरेशन ऑफ रिस्क रिडक्शन प्रोफेशनल या संस्थेचे सदस्य तन्मय गोंड, तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेत देशभरातून जवळपास ६०० पेक्षा जास्त पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभागी झाले.
****
महिलांच्या फीफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत काल भारताचा पहिला साखळी सामन्यात मोरोक्कोकडून तीन - शून्य असा पराभव झाला. याआधी अमेरिकेत सोबत झालेल्या सामन्यात देखील भारताचा पराभूत झाल्यानं भारतीय संघाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा शेवटचा साखळी सामना सोमवारी ब्राझील विरुद्ध होणार आहे.
****
इजिप्त इथं सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलनं दहा मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. यासोबतच त्याने २०२४ मध्ये होणार्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
****
बांग्लादेशात सुरु असलेल्या आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणार आहे. दुपारी एक वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
ऑस्ट्रेलियात उद्यापासून सुरू होत असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड करण्यात आली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह या स्पर्धेतून बाहेर पडला. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचीही अतिरिक्त खेळाडू म्हणून संघात निवड करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात भोगाव शिवारात कापसाच्या पिकात असलेली गांजाची जवळपास ४० झाडं पोलिसांनी काल छापा टाकून जप्त केली. हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या पथकानं ही कारवाई केली.
****
बीड जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी रेड रिबन क्लब अंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बलभीम महाविद्यालयाच्या संघाने प्रथम, स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय तर मिल्लीया वरिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये तसंच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
0 notes