Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सायंकाळी दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करणार
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एक हजार १२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात, बीडमधून सर्वात जास्त ४१ उमेदवार
पूर्वसूचना न देता सामूहिक रजेवर गेलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे २५ वरिष्ठ कर्मचारी बडतर्फ
आणि
छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या सरी तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सायंकाळी राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या आधी २२ एप्रिलला राष्ट्रपतींनी तीन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण तसंच ५५ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते.
****
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकूण एक हजार १२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या वेळेच्या ८६७ उमेदवारांच्या तुलनेत त्यात २९ टक्क्यांची वाढ झाली असली तरी १३ विद्यमान खासदारांना मात्र यंदा लोकसभेत जाण्याची संधी मिळणार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही बीडमधून सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्यावेळी ३६ उमेदवार या ठिकाणी उभे होते तर आता ४१ जण आपलं नशीब आजमावत आहेत. परभणी, मावळ, हिंगोली, शिरुर, माढा, नाशिक आणि उस्मानाबादमधल्या उमेदवारांची संख्या ३१ ते ३४ च्या दरम्यान आहे, तर गडचिरोली, पालघर, दिंडोरी या तीन मतदारसंघांमध्ये १० उमेदवार रिंगणात आहेत.
****
एअर इंडिया एक्सप्रेसनं त्यांच्या २५ वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वरिष्ठ कर्मचारी सामुहिक रजेवर गेल्यानं एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान उड्डाण सेव���वर परिणाम झाला आहे. आतापर्यंत सुमारे ऐंशी उड्डाणं रद्द करावी लागली असून आजही ८५ हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली.
उड्डाण रद्द झाल्यामुळं संबंधित प्रवाशांना तिकीटाचा पूर्ण परतावा मिळू शकतो अथवा ते आगामी तारखेसाठी त्यांच्या प्रवासाचं पुन्हा नियोजन करू शकतात, असं एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं. दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनी त्यांच्या मुळ एअर इंडिया या कंपनीच्या मदतीनं २० प्रवासी मार्गांवर २८३ उड्डाणं करणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेले आहेत आणि ते काँग्रेसच्या विचाराशी सहमत असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे.
****
अदानी, अंबानी कोणाचे मित्र आहेत हे संपूर्ण देशातल्या जनतेला माहित असून जसे निवडणुकीचे टप्पे होत आहेत तसे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. ते आज सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५व्या पुण्यतिथीनिमित्त ते अभिवादन करण्यासाठी सातारा इथं आले होते. भविष्यात राजकारणात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाशी एकत्रित राहावं, असा माझा विचार होता, प्रादेशिक पक्षांचे काँग्रेस पक्षात विलणीकरण करावं असा माझा विचार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी अदानी आणि अंबानी यांच्याकडून पैसे घेत असतील आणि याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती असेल तर ही मनीलाँड्रिंग आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ ईडीमार्फत या उद्योगपतींची चौकशी करायला हवी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी अहमदनगर इथं आले, त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारनं लावलेला ४० टक्के कर त्वरित बंद करावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे विनंती करावी, अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. छत्रपती संभाजी नगर इथं आज पत्रकार परिषदेत ते वार्ताहरांशी बोलत होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ ते आज शहरांमध्ये आले होते. यंदाच्या निवडणुकीत मताचं विभाजन होणार नाही, यामुळं राज्यासह देशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या कमी होणार असल्याचंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवू तसंच औद्योगीकरणावरही भर देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक येत्या १३ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या वतीनं शहरात वेगवेगळ्या सहा पथकांनी संचलन केलं. राजाबाजार, किराणा चावडी, शहागंज, सिटीचौक, मछलीखडक, औरंगपूरा, गुलमंडी, निराला बाजार, सिल्लेखाना आणि क्रांतीचौक या परिसरात हे संचलन करण्यात आलं. आज सायंकाळी पुन्हा शहरातील विविध भागात संच���न करण्यात येत आहे.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालना लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज जालन्यात पत्रकार परिषद घेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं ही घोषणा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. त्यामुळे तापमानात घट झाली. उकाडा कमी होऊन वातावरण थंड झाल्यानं नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी एकनंतर हलक्या सरी कोसळल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, क्रांती चौक, उस्मानपुरा, हडको - सिडको या भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
नागपूर शहरातही आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला. आज हवामान खात्याकडून नागपूरसाठी आँरेंज अलर्ट तर उद्या आणि परवा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत शहरात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या रब्बी हंगामातील धान पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पालघर लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
जालना लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफ्राबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी, अंबड तालुक्यातल्या जामखेड, जालना तालुक्यातल्या रामनगर आणि गोलापांगरी इथले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. या गावांमध्ये भरवण्यात येणारा आठवडी बाजार हा अन्य दिवशी भरवण्यात यावा, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
आज नांदेड इथून सुटणारी हुजूर साहिब नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस तिच्या नियमितवेळेपेक्षा ११ तास उशीरानं म्हणजेच रात्री साडेआठ वाजता नांदेड रेल्वेस्थानकाहून अमृतसरला रवाना होईल. तसंच नांदेडहून आज दुपारी साडेचार वाजता सुटणारी नांदेड-विशाखापट्टनम् एक्स्प्रेस अडीच तास उशीरानं म्हणजेच सायंकाळी सात वाजता सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
राज्यात काल मालेगाव इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक सहा अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. सोलापूर, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भात तापमान चाळीशीपार होतं. परभणी इथं ४१ पूर्णांक तीन, बीड इथं ४० पूर्णांक सात, नांदेड इथं ४० पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४० पूर्णांक दोन तर धाराशीव इथं ४० पूर्णांक एक अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
महिला क्रिकेट टी ट्वेंटी मालिकेत भारत आणि बांग्लादेश यांच्यातला पाचवा आणि अंतिम सामना बांग्लादेशच्या सिलहट क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत पाच बाद १५६ धावा करत बांग्लादेशला विजयासाठी १५७ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात बांग्लादेशच्या महिला संघानं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा १२ षटकांत ५ खेळाडु बाद ७९ धावा केल्या होत्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघात सामना होणार आहे. धरमशाला इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
भारताची अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिनं जेद्दाह इथं सुरू असलेल्या सौदी स्मॅश स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला.
****
0 notes
जरा त्यांचा मार्ग अनुसरा...
जरा त्यांचा मार्ग अनुसरा…
सध्या आपल्या भारतात चलनी नोटांवर कोणाचे चित्र असावे, कोणाचे चित्र नसावे, यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. लोक अत्यंत तावातावाने विविध पर्याय सुचवत आहेत. त्यावरुन तयार केलेली काही व्यंगचित्रे देखील समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. या सर्व गदारोळात मला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला आजपासून 25 वर्षांपासून कवीवर्य कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध अस्या “स्वातंत्र्यदेवतेची विनवणी” या फटका स्वरुप…
View On WordPress
0 notes